स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती, म्हणाले...
15-May-2025
Total Views | 39
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असून या निवडणूका महायूती एकत्रित लढणार की, वेगवेगळ्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्हाला या निवडणूका महायूती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिघे जण एकत्रित आहोत आणि आमची महायूती आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने काही अपवादात्मक ठिकाणी वेगळे लढावे लागले तरी एकमेकांवर टीका न करता आम्ही सकारात्मक प्रचार करू. पण जास्तीत जास्त ठिकाणी महायूती करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची तयारी सुरु केली आहे. आम्ही वेळेत या निवडणूक घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याकरिता निवडणूक आयोग आणि आम्ही गरज पडल्यास वेळ मागू. पण या निवडणूका वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असेही ते म्हणाले.
प्रशासकीय सुधार आणण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा!
"महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार यावा, ई गव्हर्नन्सचा वापर, प्रशासकीय कार्यक्षमता वाढणे यादृष्टीने विविध टप्प्यांवर अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा आणि संवाद करण्याचा निर्णय आम्ही घेतला. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही कार्यशाळा झाली. आम्ही काही गट तयार करतो आणि मी स्वत: एकेका गटाशी एक एक तास चर्चा करतो. त्यांच्या अडचणी, आमच्या अपेक्षा आणि नवीन काय करता येईल याचा विचार आम्ही करतो. सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच या कार्यशाळा होत असून यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत," असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितले.
नेशन फर्स्ट भूमिकेवर ठाम राहा!
पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकी आली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "ज्या व्यापाऱ्यांनी नेशन फर्स्ट ही भूमिका स्विकारली त्यांचे मनापासून अभिनंदन आहे. पहलगामला झालेला हल्ला हा केवळ भारतीयांवर नसून मानवतेवर झालेला हल्ला होता. त्यामुळे या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहे. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उध्वस्त करणारा भारत आहे. त्यामुळे कुणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नसून आम्ही सर्वांना सुरक्षा देऊ. सर्वांनी नेशन फर्स्ट या भूमिकेवर ठाम राहावे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.