गेल्या हजार वर्षांत हिंदू समाजाने अनेक वेळा मानवतेचा व्यापक विचार करून हिंदू-मुस्लीम परस्परसंबंध सौहार्दपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ‘आपण या देशावर राज्य केले आहे,’ या मानसिकतेतून बाहेर पडून जोवर मुस्लीम समाज सहअस्तित्वाच्या भावनेतून वागायला तयार होणार नाही, तोवर हा संघर्ष संपणारा नाही.
भारत व पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्चर्यकारकरित्या एक शहाणपणाचे विधान केले. “भारत आणि पाकिस्तान हे हजार वर्षे लढत असून त्यांचे ते आपसात पाहून घेतील,” असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्याची बरीच चेष्टाही केली गेली. परंतु, त्याच्या नकळतपणे ते सत्य बोलून गेले. कारण, या युद्धाला पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे जे भाषण झाले, त्यात त्यांनी हीच भूमिका मांडली होती. ‘हिंदू आणि मुस्लीम हे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असून, ते एकत्र राहू शकत नाहीत,’ या फाळणीच्या द्विराष्ट्रवादाच्या सैद्धांतिक पायाची त्यांनी आठवण करून दिली. आपल्या पुढच्या पिढीलाही या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देण्याचे त्यांनी आवाहन केले.
त्याचेच व्यवहारिक प्रतिबिंब म्हणजे पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी केलेल्या केवळ पुरुषांच्या हत्या. त्यामागे कोणताही स्त्रीदाक्षिण्यवादी विचार नसून, पुरुष गेल्यावर महिला आमच्या जनानखान्यात राहू शकतात, हा घृणास्पद विचारही दडलेला आहे. 30-40 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये ‘हमे चाहिऐ आजादी काश्मिरी पंडितों के बिना, लेकिन काश्मिरी पंडित महिलाओं के साथ’ अशा घोषणा दिल्या जात होत्या किंवा भिंतीवर लिहिल्या जात होत्या. पण, गेल्या काही वर्षांत काश्मीरमधील परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. मात्र, पहलगामला जे नृशंस कृत्य झाले, ते त्याचेच विकृत एक रूप होते. म्हणूनच या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे जे समर्पक नाव दिले गेले, ते कुंकवाचं सामर्थ्य काय असतं, याची त्या विकृत मनोवृत्तीला प्रचिती देणारे होते.
आपल्या भाषणात असीम मुनीर हजार वर्षांच्या युद्धाची आठवणही करून देत होते. पाकिस्तानने आपल्या विविध क्षेपणास्त्रांनाही ‘बाबर’, ‘घोरी’, ‘गझनी’ अशी मुस्लीम आक्रमकांची नावे दिली आहेत. त्याचेही कारण ही हजार वर्षे लढण्याची मानसिकता त्यात आहे.
कारगील, पहलगाम हे सर्व काश्मीरला पुन्हा एकदा जगाच्या व्यासपीठावर आणण्याचे पाकिस्तानचे खेळ आहेत. उरीच्या नापाक हल्ल्यानंतर पाकवर केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’, बालाकोटच्या हल्ल्यानंतर केलेला ‘एअर स्ट्राईक’ आणि आता ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रूपाने भारताने दिलेले सडेतोड प्रत्युत्तर, ही चढत्या क्रमाने भारताने दिलेली प्रत्युत्तरे आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारताच्या पाकिस्तान विषयक धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्याचे महत्त्व कळण्याआधी 1971 सालानंतर झालेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा विचार केला पाहिजे.
मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ‘रॉ’ या आपल्या गुप्तचर विभागाने कहुटा येथे पाकिस्तान अणुबॉम्ब बनविण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती आणली होती व ते केंद्र उद्ध्वस्त करण्याची इस्रायलने तयारीही दाखविली होती. परंतु, मोरारजींनी त्याला नकार दिला व ती माहिती झिया यांच्यापर्यंत पोहोचू दिली. त्यावेळी जर ते केंद्र उद्ध्वस्त झाले असते, तर पुढचे दहशतवादी हल्ले करण्याचे धाडस पाकिस्तानला झाले नसते. त्यानंतर इंद्र कुमार गुजराल पंतप्रधान असताना, त्यांनी पाकिस्तानमधील ‘रॉ’ या गुप्तहेरखात्याची यंत्रणाच बंद करून टाकली. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, भारत बलुचिस्तानच्या लढ्याला पाठिंबा देणार नाही, हे मान्य करून टाकले. असे भारताचे पंतप्रधान असताना मिळालेल्या मोकळ्या रानाचा फायदा पाकिस्तानने घेतला नसता तरच आश्चर्य! त्यामुळे गेली 25 वर्षे आम्ही अण्वस्त्रांचा उपयोग करू, अशी धमकी देत पाकिस्तान भारताला व जगाला ब्लॅकमेल करत आहे. हे सर्व घडण्यात भारताच्या नेतृत्वाचाही मोठा वाटा राहिला आहे. आता आपण अशा भावनिक व डावपेचात्मक ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही, हे भारताने उरी, बालाकोट व ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने दाखवून दिले आहे.
पाकिस्तानची युद्धविरामाची याचना स्वीकारताना यापुढे दहशतवादी हल्ला झाला, तर ते भारताविरुद्धचे युद्ध मानले जाईल, असा भारताने इशारा दिला आहे. भारत जसा इशारा देतो तसा तो वागतो, हा आताचा अनुभव असल्याने जर पाकिस्तानने हा इशारा गांभीर्याने घेतला नाही, तर त्याची फळे पाकिस्तानला भोगावी लागतील. उरी हा एका ठिकाणावर हल्ला होता, बालाकोट हा पाकिस्तानची सीमा ओलांडून केलेला हवाई हल्ला होता, ‘ऑपरेशन सिंदूर’ने हल्ल्याचे क्षेत्र अधिक व्यापक करून पाकव्याप्त काश्मीर सोबत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवाद्यांची केंद्रेदेखील उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन व अन्य हवाई साधनांनी प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याचा यशस्वी प्रतिकार केला व आपली संरक्षण क्षमता सिद्ध केली व पाकिस्तानच्या विविध शहरांतील संरक्षण व्यवस्थेवर प्रतिहल्ला करून आपली मारक क्षमताही दाखवून. भारताने पुढे हल्ला झाला तर ते युद्ध समजले जाईल, या इशार्याचा अर्थ म्हणजे यापुढचा प्रतिहल्ला केवळ दहशतवाद्यांच्या तळापर्यंत मर्यादित राहणार नाही, तर त्यात संरक्षण व्यवस्थेचाही समावेश असेल. या संरक्षण व्यवस्थेवरील हल्ला म्हणजे, पाकिस्तानवर सत्ता गाजविणार्या लष्करी नेतृत्वावरचाच हल्ला! ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या गुप्तहेर खात्याने मिळविलेल्या विश्वासार्ह माहितीपासून निश्चित केलेल्या ठिकाणांचा अचूक वेध घेण्याची भारतीय लष्कराची क्षमताही जगासमोर आली. त्यामुळे पुढच्या एकाच हल्ल्यात पाकिस्तानची आघात क्षमता नष्ट करण्याचा भारताचा प्रयत्न असेल, हे निश्चित!
याच बरोबर पाकिस्तानसोबतचा सिंधू नदीच्या पाण्यासंबंधीचा जलकरार संस्थगितीचा आपला दृष्टिकोनही भारताने स्पष्ट केला आहे. गेल्या हजार वर्षांत हिंदू समाजाने अनेक वेळा मानवतेचा व्यापक विचार करून हिंदू-मुस्लीम परस्परसंबंध सौहार्दपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ‘आपण या देशावर राज्य केले आहे,’ या मानसिकतेतून बाहेर पडून जोवर मुस्लीम समाज सहअस्तित्वाच्या भावनेतून वागायला तयार होणार नाही, तोवर हा संघर्ष संपणारा नाही. धर्माच्या आधारे फाळणी होऊनही पाकिस्तान व बांगलादेश एकत्र राहू शकले नाहीत. आपल्याच धर्मबांधवांकडून जे अत्याचार झाले, त्यातून मुक्तता मिळविण्यासाठी बांगलादेशला भारताची मदत घ्यावी लागली. तोच बांगलादेश आता पुन्हा धर्मांध नेतृत्वाच्या मागे लागून पाकिस्तानप्रमाणे दिवाळखोरीची वाट चालू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, भारतातील मुस्लीम समाजाने आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. पाकिस्तान, बांगलादेशप्रमाणे दिवाळखोरीच्या मार्गाने जायचे की हिंदू समाजासोबत प्रामाणिक सहअस्तित्वाच्या भावनेने राहून भारताच्या विकासयात्रेत सामील व्हायचे, हा त्यांच्यापुढचा पर्याय आहे. त्यासाठी गेल्या हजार वर्षांच्या परस्पर संघर्षाच्या इतिहासाशी फारकत घेऊन नव्या इतिहासाचे पान उघडावे लागेल. मोरारजी देसाई, इंद्र कुमार गुजराल, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेतृत्वाचे दिवस आता संपले आहेत. शौर्य, संख्या, आर्थिक बळ अशा सर्वच क्षेत्रांत वरचढ असूनही, आजवर हिंदू नेतृत्वाचा मानसिक कमकुवतपणा हीच पाकिस्तानी नेतृत्वाची प्रमुख शक्ती होती.
भारताचे नेतृत्व त्या कमकुवतपणातून बाहेर पडले आहे, हा नव्या संघर्षाचा इशारा आहे. आपला वरचष्मा असतानाही भारताने आपली शस्त्रे खाली ठेवली , याबद्दल अनेक जण नाराज आहेत. पण, हजार वर्षांचा संघर्ष अशा एखाद्या चकमकीने संपत नसतो. ती लढाई धैर्य, शक्ती, योग्य डावपेच आणि संयम या आधारे लढावी लागते. या सर्व गोष्टी आपल्यापाशी आहेत, हे भारताच्या राजकीय व लष्करी नेतृत्वाने सुसंघटितपणे सिद्ध केले आहे. ही या संघर्षातील महत्त्वाची उपलब्धी आहे.