‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे यश यातून अधोरेखित झाले आहे. भारताची शस्त्रसज्जता पाहून संपूर्ण जग चकित झाले असले, तरी विरोधकांनी मात्र नेहमीचाच गोंधळ घालायला सुरुवात केली.देशाचा हा गौरव साजरा करण्याचे भानही विरोधकांकडे नाही, हे दुर्दैवच!!!
भारताने पाकविरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानला स्पष्ट संदेश मिळाला आहे की, भारत केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतूनही ठोस प्रत्युत्तर देतो. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर केवळ 15 दिवसांत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवादी तळांवर केलेली कारवाई ही भारताच्या शौर्य, संयम आणि दूरदृष्टीचे उत्कृष्ट उदाहरण ठरावी. भारताने प्रत्येक पातळीवर पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. एकीकडे कारवाईत अचूक सैनिकी यश संपादन केले, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय समुदायात भारताची प्रतिमा उदात्त राहील, याची पुरेपूर काळजी घेतली. मात्र पाकने पुन्हा एकदा आपली जुनी खोड दाखवली. 1948, 1965 आणि 1971 मधील पराभवांनंतरही त्यांनी विजयाच्या वल्गना केल्या होत्याच, आजही त्याच पद्धतीने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या थेट परिणामांना टाळण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पाकी पंतप्रधानांचे भाषण हे त्यांच्या हतबलतेचे जिवंत उदाहरण ठरले. भारताने केलेली कारवाई इतकी परिणामकारक ठरली की, पाकला मध्यस्तीसाठी अमेरिकेसह सौदी अरेबियाचे पाय धरावे लागले.
पाकिस्तानची उक्ती आणि कृती यांमध्ये आजही फरक आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढे केलेला मैत्रीचा हातही या देशाने त्यांना धोका देऊन झुगारला होता. त्यामुळे ‘विश्वास’ हा शब्द पाकिस्तानविषयी वापरताच येत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कारगिल असो की उरी, पुलवामा असो की पहलगाम प्रत्येकवेळी भारताने संयम दाखवला आणि पाकिस्तानने विश्वासघात केला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळीही पाकने वेगळे काहीही केले नाही. मात्र, यावेळी भारताने पाकला चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्या सैनिकांचा आणि सार्वभौमत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही, हे भारताने ठामपणे सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने शस्त्रसंधीला संमती दिली, याचा अर्थ माघार घेतली असा मुळीच नाही. भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचे आपले लक्ष्य अचूक साध्य केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की केली. तसेच, पाकने पुरस्कृत केलेले दहशतवादी कृत्यही भारताविरोधातील लढा असेच मानले जाईल, असा स्पष्ट संदेश दिला. युद्ध दीर्घकाळ चालू देणे हे परवडणारे नाही, हे सत्य स्वीकारतानाच वेळीच कारवाई करून उद्दिष्ट गाठणे हे अधिक महत्त्वाचे असते. मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय सामरिकदृष्ट्या अचूक आणि रणनीतीदृष्ट्या अत्यंत परिपक्व ठरला. या कारवाईत भारताने वापरलेली शस्त्रसामग्री, विशेषतः ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे आणि भारतीय बनावटीचे ड्रोन यांची अचूकता आणि प्रभावीपणा, यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणाच्या यशावर शिक्कामोर्तब झाले. ही तीच योजना आहे, ज्यावर टीका करताना काँग्रेसी नेते राहुल गांधी यांनी ‘बब्बरशेर’ अशा शब्दांत त्याची खिल्ली उडवली होती. मात्र, आज त्याच ‘आत्मनिर्भरते’मुळे भारताने जागतिक मंचावर आपली सैनिकी ताकद दाखवून दिली आहे. भारताच्या या यशानंतर विरोधकांनी सुरुवातीला संयमाचे आणि राष्ट्रहिताचे ढोंग केले.
मात्र, शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर लगेचच त्यांनी टीका सुरू झाली. विरोधकांचे राष्ट्रप्रेम फक्त ‘ट्विटर’पुरतेच मर्यादित राहते, हे पुन्हा एकदा उघड झाले. काँग्रेसी पी. चिदंबरम आणि शशी थरूर यांच्यासारखे वरिष्ठ नेते सरकारच्या भूमिकेचे कौतुक करत असताना, त्यांच्याच पक्षातील इतर नेते मात्र सरकारविरोधात आगपाखड करण्यात धन्यता मानत आहेत. काँग्रेससारख्या पक्षाकडे एवढ्या गंभीर मुद्द्यावरही एकवाक्यता नाही, हेच यातून सिद्ध होते. सरकारने शस्त्रसंधी पलीकडे कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नसताना केवळ शक्यतांना प्रमाण मानत सरकारवर टीका करणे हा दूधखुळेपणा तर आहेच, त्याशिवाय गंभीर अशा राष्ट्रीय मुद्द्यांवरील त्यांची अपरिपक्वता दर्शवणारे आहे. भारताचे ‘सैनिकी ऑपरेशन’ सुरू असताना देशभरात एकात्मता होती. मात्र, शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर विरोधकांच्या उसन्या अवसानाचे फुगे फुटले. भारतीय वायुदलाने स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरूच आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सैनिकी मोहीम नव्हती. ही एक राजनैतिक, सामरिक आणि तांत्रिक परिपक्वतेची कसोटी होती. यात भारत पूर्णपणे यशस्वी झाला. आता प्रश्न लढाईचा नव्हे, तर सज्जतेचा आहे. भारत नुसताच सज्ज आहे असे नव्हे, तर आत्मनिर्भर शस्त्रसज्जतेसह, राजनैतिक परिपक्वतेसह आणि जागतिक विश्वासासह तो जगाचे नेतृत्व करायला तयार आहे. भारतीय लष्कराच्या यशात एक गोष्ट ठळकपणे दिसून आली, ती म्हणजे स्वदेशी शस्त्रसज्जतेचे सामर्थ्य. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये ‘ब्रह्मोस एरोस्पेस’ प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्याच प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “ब्रह्मोस’ची ताकद काय आहे, हे पाकिस्तानला विचारा. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांचा अचूक प्रहार, स्वदेशी बनावटीच्या ड्रोनचा वापर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणा आणि उपग्रह आधारित लक्ष्यभेदन प्रणाली यांचा प्रभावीपणे वापर करून, भारताने एका रात्रीत लक्ष्ये उद्ध्वस्त केली. केवळ पाकिस्तान नव्हे, तर संपूर्ण जग भारताच्या या समन्वित लष्करी कारवाईने थक्क झाले.
ही केवळ सामरिक ताकद नव्हे, तर भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा आर्थिक विजय आहे. ‘ब्रह्मोस’, ‘आकाश’, ‘तेजस’ अशा अनेक स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांना जगभरातून मागणी येऊ लागली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतीय शस्त्रांची प्रभावीता प्रत्यक्ष सिद्ध केली असून, त्यामुळे येत्या काळातही भारताची संरक्षण निर्यात मोठ्या प्रमाणात वाढेल, यात शंका नाही. संयुक्त राष्ट्र, अमेरिका, फ्रान्स, जपान यांसारख्या देशांनी भारताच्या संयम आणि कारवाईचे समर्थन केले आहे. याचाच अर्थ भारताने केवळ सामरिक नव्हे, तर आर्थिक, तांत्रिक आणि राजनैतिक पातळीवरही पाकवर विजय मिळवला आहे. पाकिस्तान वारंवार दाखवून देतो की, तो विश्वास ठेवण्याजोगा देश नाही. मग तेथे कोणताही शासक असो, कोणाचेही सरकार असो. ‘ऑपरेशन सिंदूर’कडे भारताच्या सामरिक दृष्टिकोनातील एका महत्त्वाच्या वळणबिंदूप्रमाणे पाहायला हवे. भारतीय वायुदलाने केलेली आक्रमणे केवळ सामरिक नव्हती, तर ती स्पष्ट धोरणात्मक भाषा होती. आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जाऊनही जबाबदारीने बोलली गेली. भारताने केवळ पाकिस्तानच्या हवाई सीमांची नव्हे, तर त्याच्या आत्मविश्वासाचीही चिरफाड केली.
ही कारवाई शाब्दिक धमक्यांपेक्षा कितीतरी पटींनी प्रभावी ठरली. ही कारवाई नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता, धोरणात्मक संयम आणि कारवाईचे प्रावीण्य यांचा सर्वोत्कृष्ट मिलाफ साधत पार पडली. चीनचा अपवाद वगळता सर्वच देशांनी भारताला पाठिंबा दिला. भारताने आपल्या कारवाईतून दृढ इच्छाशक्ती, रणनीतिक संयम आणि स्वदेशी सामर्थ्याची यशस्वी त्रिसूत्री जगासमोर ठेवली. पाकिस्तानसारखा शेजारी वारंवार विश्वासघात करत राहतो, हे लक्षात घेता, भारताने स्पष्ट संदेश दिला आहे, दहशतवादाची किंमत केवळ रणभूमीत नाही, तर धोरणात्मक, आर्थिक आणि राजनैतिक पातळीवरही चुकवावी लागेल. ही शस्त्रसंधी नव्हे; ही शक्तिशाली शांततेची पूर्वतयारी आहे. आज भारताने केलेल्या अचूक कारवाईमुळे जग अचंबित आहे. मात्र, देशाचा हा गौरव साजरा करण्याचे भानही विरोधकांकडे नाही हे दुर्दैवच. राजकीय स्वार्थासाठी बोंबा मारण्यापेक्षा विरोधकांनी आत्मभान राखणे हीच काळाची गरज आहे.