महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार - एकनाथ शिंदे

- विरोधकांनी राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी व्हावे

    07-Mar-2025
Total Views |

 Eknath Shinde on Maharashtra development
 
मुंबई: ( Eknath Shinde on Maharashtra development ) राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विरोधकांनी जनतेच्या कामांमध्ये राजकारण न आणता विकासयात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केले.
  
विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या विकासाचं जे स्पष्ट चित्र मांडलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या नव्या सरकारची सुरूवातही दमदार झाली आहे. पहिल्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंबही दिसेल. आम्हाला दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने राज्याचा विकास करायचा आहे. राज्यातला जनतेचं कल्याण करायचे आहे. महायुतीच्या गेल्या अडीच वर्षांच्या काळात ऐतिहासिक अशी विकासकामे केली आणि कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिल्याने आणची जबाबदारी अधिक वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.
 
वाहनांसाठी हाय सिक्यूरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याविषयी देखील विरोधकांकडून चुकीची माहिती दिली जात आहे. महाराष्ट्राची इतर राज्यांशी तुलना केली तर हे दर आपल्या राज्यात जास्त नाहीत. इतर राज्यांमध्ये दर हे २०२०-२१ या कालावधीत निश्चित केले आहे. पण राज्याचे दर हे आता ऑक्टोबर २०२४ मध्ये निश्चित झाले आहेत. तसेच, महाराष्ट्राचे दर हे जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस धरून आहेत. आपण जर इतर राज्यांची तुलना केली तर आपल्याकडच्या नंबर प्लेटचे दर हे कमी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
  
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. शिवरायांचा, शंभूराजांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही. विरोधकांनी उद्योगाबाबतच्या सामंजस्य कराराबाबतत अपप्रचार केला आहे त्यावर बोलताना श्री. शिंदे म्हणाले हे करार कागदावरचे नाहीत. महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या नऊ महिन्यात झाली आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
  
परवडणाऱ्या घरांसाठी धोरण
  
सामान्यांना परवडणारी घरे मिळाली पाहिजे याला आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी आम्ही धोरण तयार केले आहे. मुंबईतल्या पुनर्वसन प्रकल्पांना आम्ही गती दिली आहे. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेत धघरे बांधण्यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही जे केलं ते यापूर्वी कधीच झाले नाही. १६ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली आहे. आमचं हे नवीन सरकार आल्यापासून मदत पुनर्वसन विभागाने २ हजार २४६ कोटींची मदत दिली आहे. राज्यात सोयाबीन खरेदीला दोन वेळा मुदतवाढ देणारं एकमेव राज्य असल्याचे सांगत शेतकरी नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे आणखी मुदतवाढ देण्याची विनंती केंद्राला केली आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा यावर्षीची सोयाबीन खरेदी सर्वाधिक आहे. ५ लाख ११ हजार ६५७ शेतकऱ्यांकडून ११ लाख २१ हजार ३८५ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.