बालनाट्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि करियर निवडीला चालना : नीलम शिर्के-सामंत

    09-Aug-2024
Total Views | 88
Neelam Shirke-Samant
 
“बालनाट्यांमध्ये सहभागी झाल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते. बालनाट्यांमध्ये काम केल्यामुळे मुलांना करियरच्या दृष्टीनेही फायदा होऊ शकतो,” असे मत बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले. २०२४ पासून दरवर्षी दि. २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिन’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा नीलम शिर्के-सामंत यांनी केली होती. त्यानुसार काही ठिकाणी हा दिन उत्साहात साजराही करण्यात आला. त्यानिमित्ताने बालकलाकार, बालप्रेक्षक यांच्यासाठी बालरंगभूमीची भूमिका, पालकांकडून, शाळांकडून अपेक्षा या विषयावर नीलम शिर्के-सामंत यांची घेतलेली ही विशेष मुलाखत...


‘अखिल भारतीय नाट्य परिषदे’ची ‘बालनाट्य परिषद’ ही एक शाखा. तेव्हा, बालनाट्यांसाठी एक वेगळी परिषद असावी, या बालनाट्यांचा वेगळा विचार व्हावा, ही गरज कधी आणि का निर्माण झाली?

‘बालरंगभूमी परिषद’ असावी किंवा बालकलाकारांसाठी एक रंगमंच असावा, हा विचार साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वी झाला. चळवळ आधीपासूनच सुरू होती, कार्यक्रमसुद्धा होत होते. पण, एक वेगळा रंगमंच किंवा स्वत:ची परिषद असावी, असा विचार झाला. यामागचा उद्देश असा होता, जे बालकलाकार असतील, त्यांना कला सादर करता यावी. परिषदेची स्थापना झाल्यानंतर ‘कोविड’ची महामारी आली. त्यामुळे ‘कोविड’च्या काळात थोड्या धीम्या गतीने काम सुरू होतं. पण, आता परिषदेचे काम जोमाने सुरू आहे. ‘बालरंगभूमी म्हणजे फक्त बालनाट्य नाही, तर सर्व प्रकारच्या सादर करता येतील अशा कला’ अशी भूमिका घेऊन आम्ही आता काम करत आहोत.


दि. २ ऑगस्ट १९५९ रोजी ‘मधू-मंजिरी’ हे पहिलं मराठी बालनाट्य सादर झालं होतं. त्या नाटकाने मराठी बालनाटकांची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हा, १९५९ ते आज २०२४ या प्रदीर्घ कालखंडातील मराठी बालनाट्य क्षेत्रातील बदलांकडे आपण कसे बघता?

त्यावेळी जेव्हा पहिले बालनाट्य सादर झालं, तेव्हाचा बालप्रेक्षक आणि आताचा बालप्रेक्षक यांच्यामध्ये खूप तफावत आहे. तेव्हा करमणुकीची साधने फार कमी होती. त्यामुळे मुलांना काहीतरी वेगळे पाहता यावं, त्यांच्यावर वेगळे संस्कार व्हावे, या उद्देशाने पालक मुलांना बालनाट्य पाहायला घेऊन जायचे. पण, आताचा बालप्रेक्षक आम्हाला तयार करावा लागतो. ओटीटी आणि अन्य डिजिटल माध्यमांकडून तो प्रेक्षक आम्हाला बालनाट्यांकडे वळवावा लागतो. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात मुलींचा सहभाग फार नसायचा. नाटकांमध्ये बरेचदा मुलेच मुलींची पात्रे साकारायची. पण, आता मुलींचा सहभागसुद्धा वाढला आहे.

तुमच्या मते, बालनाट्यं मुलांनी का पाहावीत किंवा त्यांनी त्यात का सहभागी व्हायला हवे?

आपल्या मनातील कल्पना सत्यात उतरताना पाहण्यासाठी मुलांनी बालनाट्यं जरुर पाहावीत. त्यांनी ती नुसती पाहू नयेत, तर त्यात सहभागी होण्याचाही प्रयत्न करावा. बालनाट्यांमध्ये सहभागी झाल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो त्यांना होतो तो म्हणजे, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास खूप मदत होते. बालनाट्यांमध्ये काम केल्यामुळे मुलांना करियरच्या दृष्टीनेही फायदा होऊ शकतो. कारण, बालनाट्य म्हणजे अभिनय नाही. नेपथ्य, संगीत, तंत्रज्ञ, लेखन, दिग्दर्शन अशा अनेक जबाबदार्‍या बालनाट्यांमध्ये असतात. त्यातून आपल्याला काय आवडतं, हे मुलं ठरवू शकतात.त्यादृष्टीने भविष्यात काय करायचे, यांची त्यांना कल्पना येऊ शकते आणि ही आवड कळल्यावर त्यांनी पुढे नाटकांमध्येच काम करावे, असेही काही नाही. या कौशल्यांचा वापर ते अन्य क्षेत्रांतही करू शकतात. म्हणजे एखाद्याला प्रकाशयोजनेची आवड असेल, तर पुढे तो ‘डेकोरेशन’ किंवा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये सुद्धा करियर करूच शकतो.
 
 
बालनाट्यांकडे पालक करियरच्या दृष्टिकोनातून पाहतात का? जे पालक आपल्या मुलांना बालनाट्य शिकायला पाठवतात, त्यांना आपल्या मुलाने अभिनेता/अभिनेत्री व्हावं असं खरंच वाटत असतं की फक्त ते अभिनयाकडे एक छंद म्हणून पाहतात? तुमचा अनुभव काय सांगतो?

बर्‍याच वर्षांपूर्वी असं होतं की, जी मुलं अभ्यासात ढ आहेत, त्यांना दुसरं काही जमत नाही किंवा त्यांच्या अंगी नकला खूप आहेत, तीच मुलं नाटकात किंवा अभिनयक्षेत्रात जातात, असा एक मोठा गैरसमज होता. पण, आता तो राहिलेला नाही. आता नाट्यक्षेत्र किंवा एकंदरीत अभिनय क्षेत्राकडे एक संधी म्हणून पाहिलं जातं. नाटकात किंवा मोठ्या पडद्यावर ‘ग्लॅमर’ आणि बर्‍यापैकी पैसाही मिळतो, हे लोकांच्या लक्षात येऊ लागलंय. नाट्य शिबिरांमध्ये किंवा प्रशिक्षणवर्गांमध्ये जे पालक आपल्या मुलांना पाठवतात, त्यापैकी २० टक्के पालकांना वाटतं असतं की, आपल्या मुलाने वेगळं काहीतरी शिकावं, त्याने इतर मुलांमध्ये वावरावं, ५० टक्के पालकांना असं वाटत असतं की, आपल्या मुलाचा जो वेळ आहे तो घरी राहून वाया जाऊ नये. त्याला कुठेतरी तो व्यतीत करता यावा आणि उरलेल्या ३० टक्के पालकांना आपल्या मुलाला मोठ्या स्क्रीनवर पाहायचं असतं, त्याला ते ‘ग्लॅमर’ मिळावं, अशी त्यांची इच्छा असते. म्हणून ते त्याला या वर्गांमध्ये किंवा शिबिरांमध्ये पाठवतात.


बालनाट्यांची सुरुवात होऊन आता ६० वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण, आजही तेवढ्या प्रमाणात बालनाट्यनिर्मिती होत नाही, म्हणजे शाळांमध्ये किंवा अन्य ठिकाणी होणार्‍या स्पर्धांमध्ये बालनाट्यं सादर होतात, पण एक नाट्यगृहात सादर होणार्‍या बालनाट्यांची संख्या आजही तुलनेने कमी आहे . तर यामागे नेमकी काय कारणं आहेत?

याला मुख्य कारण म्हणजे, बालनाट्य सादर करण्याची वेळ आणि खर्च. आठवडाभर शाळा आणि इतर गोष्टींमुळे मुलं नाटक पाहायला येऊ शकत नाहीत. त्यामुळे बालनाट्य शनिवार आणि रविवारीचं ठेवावी लागतात. पण, शनिवारी, रविवारी दुपारच्या आणि रात्रीच्या सत्रात नाटक सादर करण्याचा खर्च सकाळच्या सत्रापेक्षा जास्त असतो. त्यामुळे नाट्य संस्थांना तो परवडत नाही आणि सकाळच्या सत्रात नाटक ठेवले, तर सुट्टी असल्यामुळे लवकर उठून नाटक पाहायला जाणं मुलांना आवडत नाही. बालनाट्यनिर्मितीसाठी लागणारा खर्चसुद्धा खूप असतो आणि तो वसूल होत नाही. त्यामुळे वेळ आणि खर्च यांच्या गणितामुळे सादर होणार्‍या बालनाट्यांची संख्या कमी आहे.


बालनाट्यं अनेक प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकवली जातात, अनेक शिबिरेसुद्धा आयोजित केली जातात. पण, अजून शालेय पातळीवर त्यांची फारशी दखल घेतली जात नाही. खूप कमी शाळा आहेत जिथे बालनाट्य किंवा अभिनय शिकवला जातो किंवा जरी बालनाट्य होत असतील, तर ती फक्त स्पर्धांपुरती मर्यादित राहतात, तर शाळांकडून याबाबतीत काय प्रयत्न केले गेले पाहिजेत?

शाळेतील सर्व कामे सांभाळून मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे, हे महत्त्वाचे काम शिक्षकांकडे असते. साहजिकच त्यासाठी त्यांना खूप तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे त्यांना त्यात आणखी एक व्याप वाढवून नको असतो आणि खेळात यश मिळवल्यावर जसे मुलांना जसे वाढीव गुण मिळतात, तसे ते बालनाट्यात मिळत नाहीत. म्हणून कदाचित शाळा त्याची फारशी दखल घेत नसतील. पण, बालनाट्यांची दखल शाळांनीही घेतली पाहिजे. शाळेमध्ये अभिनयासाठी वेगळा शिक्षक नेमला गेला, तर फक्त मुलांचाच फायदा होणार नाही, रोजगारनिर्मितीही वाढेल. बालरंगभूमी असे अधिकाधिक प्रशिक्षक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

‘आज्जीबाई जोरात’ या बालनाटकात सर्वप्रथम ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा प्रयोग केला गेला आणि हल्लीची पिढी ही खूप तंत्रस्नेही आहे. तेव्हा असे प्रयोग अधिकाधिक झाले तर ही पिढी नाटकांकडे वळण्यास हातभार लागेल का?

आताच्या पिढीला अशा गोष्टी खूप आवडतात आणि नाट्यसंस्थांच्या दृष्टीनेही ते फायद्याचे आहे. ज्या ठिकाणी नाटकाचा सेट प्रत्यक्ष घेऊन जाणे शक्य नसते, त्या ठिकाणी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर होऊ शकतो आणि मुलांची आवड लक्षात घेऊन, त्या दृष्टीने काम केलं तर बालप्रेक्षक नक्की पुन्हा नाटकाकडे वळेल.

दि. २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिन’ म्हणून साजरा केला जाणार असं तुम्ही काही दिवसांपूर्वीच घोषित केलं आहे, तर आता ‘बालरंगभूमी परिषदे’ची याबाबत भविष्यात काय भूमिका असणार आहे?
 
मुलांना लोककलेची ओळख व्हावी, यासाठी आता ‘लोककला महोत्सव’ सुरू आहे. त्याला मुलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बालरंगभूमी ही सर्व मुलांची आहे. त्यामुळे आम्ही विशेष मुलांचा महोत्सवही आयोजित केला आहे. सर्व प्रकारच्या अक्षमता असणार्‍या विशेष मुलांसाठी हा महोत्सव असणार आहे. या वर्षीच्या नाट्यसंमेलनात बालरंगभूमीला तीन दिवस दिलेले आहेत, त्या तीन दिवसांत आम्हाला सादरीकरण करायचे आहे आणि डिसेंबरमध्ये बालरंगभूमी परिषदेचं स्वत:चं संमेलन आहे. याशिवाय इतरही नियमित उपक्रम आम्ही आयोजित करीत असतो. मुलांच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील, असे अनेक उपक्रम आम्ही राबवित आहोत आणि भविष्यातही ते करत राहू.

दीपाली कानसे 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121