मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना राज्यात दुसरे काही दिसत नाही. देवेंद्र द्वेषाने राऊत आणि ठाकरे पछाडले आहेत, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आमदार दरेकर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय त्यांना राज्यात दुसरे काही दिसत नाही.
राज्यातील प्रश्न, विकासावर ते बोलत नाही. देवेंद्र द्वेषाने संजय राऊत, उद्धव ठाकरे पछाडलेले आहेत. टोकाची, जनतेला उबग आलाय अशी वक्तव्य संजय राऊत, उद्धव ठाकरे करताहेत. त्यांना त्याचा राणाभीमदेवी थाट वाटत असेल परंतु जनतेच्या मनातून उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी फडणवीसांवर व्यक्तिगत केलेल्या टिकेमुळे उतरले आहेत ही वस्तुस्थिती आहे. तसेच दळभद्री विचाराचा नेता असला की त्याला सगळे तसेच दिसते.
संजय राऊत दळभद्री विचाराचे झालेत ते रोज सकाळी गरळ ओकताना दिसतात, असा टोलाही दरेकरांनी राऊत यांना लगावला. दरेकर पुढे म्हणाले की, भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही ही आपल्यात म्हण आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही ते होते, मविआचे सरकार होते तेव्हाही ते होते, सत्तेतून यांना बाहेर काढले पुन्हा फडणवीसांनी सरकार बनवले, सरकारमध्येही राहिले. देवेंद्र फडणवीस कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार. उद्धव ठाकरेंना आपले अस्तित्व शोधावे लागेल. त्यांना जो गर्व आलाय तो महाराष्ट्रातील जनता निश्चितच उतरवेल, अशी टिकाही दरेकरांनी केली.