"तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर..."; तिरंगा यात्रेतूनत प्रविण दरेकरांचा पाक आणि चीनला इशारा
21-May-2025
Total Views | 9
मुंबई : हा नवीन भारत आहे. तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर तुमच्यावर बॉम्बचा वर्षाव केला जाईल, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पाकिस्तान आणि चीनला दिला आहे. ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी निवृत्त सैनिक रमेश चंद्रा, विजयप्रताप सिंग, नरेंद्र कुमार, मंगेश कदम, माजी आ. रमेश सिंग ठाकूर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ निशा परुळेकर, मंडळ अध्यक्ष अविनाश राय, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिरवडकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तिरंगा यात्रेच्या समारोपीय भाषणात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, "पहलगाम येथे आपल्या माता भगिनींचे सिंदूर पुसले गेल्याने देशात संतापाची लाट निर्माण झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, तुमच्या अपेक्षेपेक्षाही मोठी शिक्षा पाकिस्तानला देणार. ऑपरेशन सिंदूर झाल्यावर दहशतवाद्यांचे अड्डे कसे उध्वस्त केले हे सगळ्या जगाने पाहिले आहे. त्यामुळे देशवासियांच्या मनात प्रचंड आत्मविश्वास आहे. पंतप्रधान मोदींच्या हाती देश सुरक्षित आहे. मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी कसाबने ज्या ट्रेनिंग सेंटर मधून प्रशिक्षण घेतले तो अड्डाही उध्वस्त करण्याचे काम आपल्या सैन्याने केले असून याचा आम्हाला गर्व आहे. भारताची शक्ती काय आहे हे आज संपूर्ण जग पाहते आहे. चीनही पडद्याआडून पाकिस्तानला पाठींबा द्यायचा प्रयत्न करत आहे. पण चीननेही लक्षात ठेवावे आता फक्त मिसाईल गेले, जेव्हा भारताचे बॉम्ब पडतील तेव्हा चीनही राहणार नाही. हा नवीन भारत आहे. तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर तुमच्यावर बॉम्बचा वर्षाव केला जाईल," असा इशारा त्यांनी दिला.
विरोधकांचे आभार!
"विरोधी पक्षातील लोकांचेही मी आभार मानतो. विरोधकांचे आणि आमचे राजकीय मतभेद असतील. पण आम्ही सरकार आणि लष्करासोबत आहोत असे ते बोलले. हा आपला भारत आहे. सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी देशभरात सर्वत्र तिरंगा रॅली होते आहे. आपल्याला देशाप्रती प्रेम असल्याने अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही पायाखालची जमीन सरकली. आपल्या अमेरिकेचे काय होईल ही भीती त्यांना सतावू लागली आहे. हा आपला भारत आहे. आपल्या देशाप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी, सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी जात, पात विसरून सर्व पक्षीय लोक सैनिकांच्या सन्मानासाठी रस्त्यावर, मैदानात उतरलेत. ही भारताची ताकद आहे," असेही ते म्हणाले.
...तर तुमचे १०० जण मारले जातील!
"तसेच दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे मुंबई त्रासली होती तेव्हा सरकार वेगळे होते आता सरकार वेगळे आहे. गरज पडल्यास अणूबॉम्बने उडवण्याची ताकद आपल्या सैन्यात आहे. आज आपल्याला सैनिकांच्या शौर्याचे महत्व समजते आहे. जे लष्करात काम करतात ते तळहातावर जीव घेऊन दुश्मनांच्या विरुद्ध लढताहेत. ही ताकद अबाधित ठेवण्यासाठी मोदी सरकारला आशीर्वाद देण्याची गरज आहे. पाकिस्तानची स्थिती हातात कटोरा घेऊन भीक मागण्याची आहे. खाण्याचे वांदे असलेल्या पाकिस्तानचा रुबाब मोठा आहे. मात्र त्यांना माहिती नाही की,आपल्याकडे मोदी आहेत. तुम्ही आमच्या एका माणसाला खरचटवलात तर तुमचे १०० जण मारले जातील. ‘अभी तो झाकी है हिंदुस्थान की ताकद देखना पाकिस्तान और दुनिया बाकी है’. आगामी काळात ही ताकद दिसून येईल," असा विश्वासही प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.