मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर येत्या दोन-तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत सर्वच विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्र काँग्रेसने आघाडीत लोकसभा निवडणूकीत मोठा भाऊ होण्याचा मान मिळवला. पंरतु आता काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. प्रदेश कमिटी उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीचे यासंदर्भातील पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ते पत्र तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार हे पत्र पाठवण्यात आले असून आमदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २० हजार रुपये पक्षनिधी द्यावा लागणार आहे.
अर्जात दिलेल्या नियमावलीनुसार, इच्छुक उमेदवारांने दि. १० ऑगस्ट २०२४ आधी अर्ज काँग्रेस प्रदेश कमिटी कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. तसेच अर्जासोबत सर्वसामान्य वर्गासाठी २० हजार रुपये आणि अनु.जाती, अनु.जमाती आणि महिला उमेदवारांना १० हजार रुपये पक्षनिधी रोख अथवा डी.डी स्वरुपात प्रदेश कमिटीला द्यावा लागणार आहे. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या सूचनेनुसार हे पत्रक जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांपर्यंत पोहचवावे, असे ही या पत्रात लिहण्यात आले आहे.