अहमदाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ ( Batenge to Katenge ) ही घोषणा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. आता तर ही घोषणा गुजरातमध्ये एका लग्न पत्रिकेवरही छापण्यात आली आहे.
गुजरातमधील भावनगर येथील एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या भावाच्या लग्न पत्रिकेवर हा नारा अथवा ही घोषणा छापली आहे. याशिवाय कार्डवर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्रई योगींच्या फोटोसह स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला आहे. दि. २३ नोव्हेंबर रोजी हे लग्न होणार आहे. या अनोख्या कार्डमुळे हे लग्न चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हरियाणाच्या निवडणुकीदरम्यान हिंदूंना एकत्र करण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होता. आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही या घोषणेची चर्चा होत आहे. ही घोषणा लग्नपत्रिकेवर छापणार्या कार्यकर्त्याने यासंदर्भात आपले मतही व्यक्त केले आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींचा स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण लग्न पत्रिकेवर ही घोषणा छापल्याचे त्याने म्हटले आहे.