मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मागील वर्षभरात 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' अभियान राबवण्यात आले होते. या अभियानाची सांगता 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानाने होणार आहे.
'गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकजुट दाखवण्यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे', अशी पंचप्राण शपथ असलेला भारत पुढील काही वर्षात घडवायचा आहे.
यासाठी 'मेरी माटी, मेरा देश' या अभियाना अंतर्गत देशाच्या सर्व छोट्या-मोठ्या खेड्यातून, शहरातून मातीचे संकलन करण्यात येणार आहे. या संकलित केलेल्या मातीपासून दिल्ली येथे 'अमृत वाटिका' तयार करण्यात येणार आहे. ही अमृत वाटिका 'एक भारत, श्रेष्ठ भारत' याचे प्रतीक असेल.
म्हणूनच महाराष्ट्रातील नागरिकांनी लवकरच 'मेरी माटी, मेरा देश' या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.