ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना राज्यपालांच्या हस्ते आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

    24-Aug-2023
Total Views | 58

Vijay Vaidya


मुंबई :
मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. पत्रकार संघाच्या सभागृहात हा समारंभ पार पडला. यावर्षी आचार्य अत्रे यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे.
 
यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून हल्लेखोर कितीही प्रभावशाली असले तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी नगरपाल डॉ जगन्नाथ हेगडे, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की, साधारण १९९५ नंतर देशात इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणात आली. गेल्या दशकात त्यासोबत डिजिटल व समाज माध्यमे देखील आली. परंतु, ही सर्व माध्यमे एकमेकांना पूरक ठरली आहेत. माध्यम जगातील क्रांतीनंतरदेखील वृत्तपत्रांनी आपली विश्वसनीयता टिकवून ठेवली असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
 
तसेच पत्रकार हे समाजाचे कान आणि डोळे असतात. ते लोकशाहीचे पहारेकरी व जनसामान्यांचे हितरक्षक असतात. आज माध्यमांना आपली प्रासंगिकता व निष्पक्षता टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सामान्य जनतेशी निगडित बातम्या दिल्या पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.
 
एखाद्या व्यक्तीविषयी वृत्तपत्रामध्ये बदनामीकारक बातमी छापली तर त्या व्यक्तीला मोठा मनस्ताप होतो. अशा मनस्तापाचा आपण स्वतः अनुभव घेतला असल्याचे राज्यपालांनी सांगितले. खोट्या बातमीमुळे आंदोलने होतात, जाळपोळ व हिंसा होते. त्यामुळे पत्रकार म्हणून जबाबदारीने काम केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच माध्यमांनी अनुसूचित जाती, आदिवासी, मागास वर्गीय, दिव्यांग, अल्पसंख्याक, शेतकरी व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्याने स्थान दिल्यास माध्यमांची विश्वासार्हता टिकून राहील, असे राज्यपालांनी सांगितले.
 
विजय वैद्य यांच्याविषयी बोलताना राज्यपाल म्हणाले की, विजय वैद्य यांनी पत्रकारितेला व्यापक समाजसेवेचे माध्यम बनवले. त्यांच्याकरिता पत्रकारिता अंतिम ध्येय नव्हते तर देशातील सामान्य माणसांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्याचे ते एक साधन होते. एक व्यक्ती आपल्या जीवनात किती मोठे काम करू शकतो याचे विजय वैद्य हे उत्तम उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. विजय वैद्य यांना देण्यात आलेला ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून तो मानवी चेहऱ्यासह पत्रकारितेच्या मोठ्या परंपरेचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
 
आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला याचा अतिशय आनंद झाला असल्याचे विजय वैद्य यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व कार्यवाह संदीप चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन विष्णू सोनवणे यांनी केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121