मुंबई : २०१४ पासून डिजिटल इंडियाचं जे वारे वाहत आहे त्याने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल केले. भारतात ऑनलाईन पेमेंटमध्ये झालेली क्रांतीही यांचं डिजिटल इंडियाची देणं आहे. अशीच क्रांती आता परदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्टमध्ये होत आहे. यापुढे परदेशी जाणाऱ्या नागरिकांना ई-पासपोर्ट मिळणार आहे. त्यामुळेच ई-पासपोर्ट म्हणजे काय? ई-पासपोर्ट कसा काम करेल? ई-पासपोर्टचे फायदे काय? तुम्हाला ई-पासपोर्ट कसा मिळवता येणार? या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या लेखातून मिळणार आहेत.
ई-पासपोर्ट म्हणजे इलेक्ट्रानिक पासपोर्ट. या पासपोर्टमध्ये एक ६४ केबीची चिप असेल. यांचं चिपमध्ये प्रवाशांचा सर्व डाटा सेव्ह असेल. त्यासोबतच प्रवाशाचा परदेशी प्रवासाचा इतिहास एका सर्व्हरवर कायमस्वरूपी सेव्ह होईल. त्यामुळे जुन्या पुस्तकी पासपोर्ट प्रमाणे या पासपोर्टचे नुतनीकरण करण्याची गरज भासणार नाही. आजपर्यंत जो पासपोर्ट आपल्याला मिळायचा त्याला ३६ किंवा ६० पेज असायचे. त्याला आपण पासपोर्ट पुस्तिका म्हणत. हे पेज संपल्यावर आपल्याला पासपोर्टचे नूतनीकरण करावे लागतं पण ई-पासपोर्टमध्ये या नूतनीकरणापासून सुटका मिळणार असल्यामुळे सतत परदेशी वाऱ्या करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
जुन्या पासपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारच बायोमेट्रिक वेरिफिकेशन नसल्यामुळे यात मोठ्या प्रमाणात बनावट पासपोर्ट बनवले जात. याचं बनावट पासपोर्टचा वापर करुन अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं कारवाईपासून वाचण्यासाठी या देशातून त्या देशात असा सतत प्रवास करत. पण ई-पासपोर्टमुळे ते शक्य होणार नाही. ई-पासपोर्टची बनावट करणं सध्यातरी अशक्य आहे. त्यासोबत ई-पासपोर्ट बनवताना आता हातांच्या सर्व बोटांचे बायोमेट्रिक केले जाणारं आहे. यासोबत डोळ्यांचे आणि चेहऱ्याचे जिओमेट्रीक इमेज घेतली जाणार आहे. यासोबत सुरक्षेच्या दृष्टीने ई-पासपोर्टमध्ये ४१ फिचर्स अॅड करण्यात आले आहेत. त्यामुळेच बनावट पासपोर्ट बनवण आता शक्य होणार नाही. कोणी तसा प्रयत्नही केल्यास ते इमिग्रेशनवेळी सुरक्षा अधिकाऱ्यांना सहज लक्षात येईल.
जगभरात हवाई वाहतूकीचे नियमन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) स्थापन करण्यात आलेली आहे. याच संस्थेने पुढाकार घेऊन जगभरात एकाच प्रकारचा डिजिटल पासपोर्ट असावा. यासाठी नियम आणले होते. या नियमांचे सध्या १४१ देश पालन करतात. यासर्व देशात हा पासपोर्ट वैध असेल. या ई-पासपोर्टमुळे या देशात जाणाऱ्या प्रवाशांची इमिग्रेशनची औपचारिकता काही मिनिटात पुर्ण होईल. याआधी इमिग्रेशनची औपचारिकता पुर्ण करण्यासाठी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असे.
या चिप असलेल्या ई-पासपोर्टच्या सर्व तांत्रिक चाचण्या जवळपास पूर्ण केल्या आहेत. नाशिक येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसला ४.५ कोटी ई-पासपोर्ट बनवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यात आपल्याला ई-पासपोर्ट मिळतील. त्यासोबत ज्यांच्याकडे आधीपासून पासपोर्ट आहे त्यांनाही नूतनीकरण करते वेळी ई-पासपोर्टच दिला जाईल. ज्या नागरिकांकडे जुना पासपोर्ट आहे आणि त्याचे पेज रिकामे आहेत. अशा लोकांना पण अर्ज केल्यावर नविन पासपोर्ट मिळणार आहे.