ठाणे : मृग नक्षत्रात दडी मारलेल्या पावसाने जून महिन्याच्या अखेरीस धुवाँधार बरसण्यास सुरुवात केल्याने ठाणे शहरात पाणी तुंबण्यासोबतच पडझड झाली. शहरात ३१ ठिकाणी पाणी तुंबल्याने नालेसफाईची पोलखोल झाली. महापालिकेकडून काही ठिकाणी पंपाद्वारे पाणी उपसा करण्याची यंत्रणा उभी करूनही अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने वाहतुक मंदावली होती. बुधवारी दिवसभरात १४९ मि. मीटर पावसाची नोंद ठामपा आपत्कालीन कक्षाकडे झाली. संततधार पावसामुळे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह संपूर्ण प्रशासन ऑनफिल्ड सज्ज होते.
ठाणे शहरात बुधवारी पावसाने सकाळपासूनच दमदार हजेरी लावली असून पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतूक मंदावली होती. सखल भागात पाणी साचल्याने वाहने चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.पहिल्याच पावसात घोडबंदर रोड, नौपाडा, सिव्हील रूग्णालय परीसरात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तर मध्य व पश्चिम आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत होत्या.राममारुती रोडवरील भले मोठे झाड कोसळल्याने पदपथ उखडला गेला. मुंब्रामध्ये रेतीबंदर येथील रमाबाई इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील रूमचा स्लॅब कोसळल्याने संपूर्ण इमारत धोकादायक घोषीत करून रिकामी करण्यात आली. दरम्यान, पावसाळ्यामध्ये पाणी तुंबू नये यासाठी शहरातील नाल्यांची सफाई पुर्ण करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. तसेच शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्यास तो काढून टाकण्यासाठी शहरातील महत्वाच्या भागात पंप बसवण्यात आले होते. परंतु प्रशासनाचे हे दावे पावसाच्या पाण्यात वाहुन गेले.
नालेसफाईचे पितळ उघडे
ठाणे महापालिकेकडून यंदा एप्रिल महिन्यापासून नालेसफाईची कामे हाती घेऊनही किंबहुना वारंवार आयुक्तांनी नाल्यांची पाहणी करूनही पाणी तुंबल्याने नालेसफाईचे पितळ उघडे पडले आहे. जूनच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाने सखल भाग पाण्याखाली गेल्याने नागरिकाचे हाल झाले. कळवा, मुंब्रा आदी भागात नाल्यांचे पाणी अनेकांच्या घरांमध्ये शिरल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सुदैवाने जिवितहानी झाली नसल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.
गुडघाभर पाणी साचले !
मुसळधार पावसाचा फटका संपूर्ण ठाणे शहराला बसला. कळवा दत्तवाडी येथे गुडघाभर पाणी साचले होते.तर, सह्याद्री शाळेजवळ चक्क रस्त्यावरून नदी वाहत असल्याने शाळकरी मुलांनी पावसाचा आनंद घेतला. ठाण्यातील वृंदावन परिसर पाण्याखाली गेला होता. दर पावसाळ्यात हा परिसरात पाणी शिरते मात्र त्या भागात प्रशासनाने दुर्लक्ष केले असून वृंदावन परिसरातील सोसायट्यांमध्ये पार्क केलेल्या गाड्या देखील पाण्याखाली होत्या.
धुंवाधार पावसाने उडवली दाणादाण
घडलेल्या दुर्घटना आकड्यांमध्ये -
ठाणे मनपा आपत्ती विभागाकडे एकुण तक्रारी - ५९
शहरात झाडे पडणे - १५
झाडांच्या फांद्या पडणे - ०४
धोकादायक अवस्थेतेतील झाडे - ०५
संरक्षण भिंती पडणे - ०२
शहरात पाणी साचणे - ३१
झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान - ०६