हैद्राबाद : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच काँग्रेस पक्षात असलेली अस्वस्थता उफाळून येताना दिसत आहे. कर्नाटकाला लागून असलेल्या आंध्र प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये होत असलेल्या दुर्लक्षामुळे रेड्डी नाराज होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे. काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे पत्रात त्यांनी लिहिले होते. त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण मात्र स्पष्ट केलेलं नाही.अविभाजित आंध्र प्रदेशचे अखेरचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम किरणकुमार रेड्डी यांच्या नावावर आहे. किरण कुमार रेड्डी, हे आंध्र आणि तेलंगणाच्या विभाजनाच्या वेळी अविभाजित राज्याचे मुख्यमंत्री होते.
किरण कुमार रेड्डी भाजपच्या वाटेवर?
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. रेड्डी हे सध्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असून वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या बैठकाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.