
पक्ष्यांच्या विश्वातील अद्भुत गोष्टींबद्दल पक्षी अभ्यासक आणि पक्षीप्रेमींमुळे अनेकदा माहीत होत असते. पक्षी विश्वाबद्दल अधिक माहिती व्हावी आणि त्यांच्यावर सुरू असलेले संशोधन आणि संवर्धनात्मक कामाचा आढावा घेणारा हा लेख, दि. 5 ते दि. 12 नोव्हेंबरदरम्यान साजरा केल्या जाणार्या पक्षी सप्ताहानिमित्त...
पक्षी जाय दिगंतरा...बाळकांसी आणी चारा, घार हिंडते आकाशी...झाप घाली पिल्लापाशी, मज पक्षी व्हावे वाटते’ अशा अनेक बालकवितांमध्ये अनेकांचे बालपण गेले. त्यामुळे पक्ष्यांविषयीचा जिव्हाळा बालमनावर संस्कार घडवण्यापासूनच सुरू होतो. ‘द बर्डमॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले डॉ. सलीम अली आणि पक्ष्यांवर उल्लेखनीय संशोधनात्मक काम करणारे मारुती चितमपल्ली यांसारख्या अनेक पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासकांचं काम पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून पक्षी सप्ताहाची संकल्पना अस्तित्वात आली. अरण्यऋशी म्हणून ओळख असलेले मारुती चितमपल्ली यांचा रविवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी असलेला वाढदिवस आणि पक्ष्यांविषयी अद्वितीय काम केलेले ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ डॉ. सलीम अली यांची रविवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी असलेली जयंती यांची सांगड घालून हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जाऊ लागला.
असा आहे पक्षी सप्ताहाचा इतिहास...
‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ या संस्थेने प्रथम पक्षी सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली होती. 2017 मध्ये विदर्भातील वर्धा येथे झालेल्या पक्षी मित्र संमेलनात आणि आंबेजोगाई येथे झालेल्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात शासन स्तरावर ही पक्षी सप्ताह साजरा केला जावा यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता. 2020 साली हा प्रस्ताव मंजूर होऊन यासंबंधीचा ‘जीआर’ निघाला आणि राज्य स्तरावर पक्षी सप्ताह साजरा केला जाऊ लागला.
परिसंस्थेत अत्यंतमहत्त्वाची भूमिका बजावणारे पक्षी अन्नसाखळीमध्ये दुय्यम भक्षत किंवा सर्वोच्च स्थानावरील भक्षक आहेत. परिसंस्थेमध्ये बीजप्रसार, परागीभवन, सफाई कामगार, नैसर्गिक कीटकनाशक अशा वेगवेगळ्या भूमिका पक्षी निभावत असतात. त्यांच्या अधिवासानुसार त्यांचे प्रकार पाडायचे ठरवले, तर जंगलात राहणारे, गवताळ प्रदेशात राहणारे, पाण्यात राहणारे, गोड्या पाण्याजवळ राहणारे, समुद्रात राहणारे, बेटावर राहणारे, डोंगरात राहणारे असे कितीतरी प्रकार करता येतील. आपल्या सभोवताली विविध प्रकारचे पक्षी, प्राणी वावरत असतात. अनेकदा आपल्याला त्यांची नावे सांगता येत नाहीत. पण हे पक्षी आपल्याला वेगळाच आनंद देत असतात. विविध रंगांचे, विविध आवाज काढणारे, गाणारे, नाचणारे पक्षी निसर्गात आहेत. फक्त ते पाहण्यासाठी आपल्याला वेळ काढण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त बुलबुल, वटवट्या, सूर्यपक्षी, मुनिया, सुतार, तांबट, धनेश, चष्मेवाला, शिंपी, नाचरा, हळद्या, घुबड इत्यादी निवासी पक्षी आढळतात. अंगठ्यावर मावणार्या छोट्या हमिंग पक्ष्यापासून ते प्रचंड असा शहामृग पक्षी असे अनेक प्रकार या पक्षी जगतात आहेत. भारतात असलेला सर्वात छोटा पक्षी हा फुलटोचा आहे आणि सर्वात मोठा पक्षी सारस आहे. पिवळ्या रंगाची टोकाकडे किंचित बाकदार मोठी चोच असलेला पांढरट गुलाबी रंगाचा सुंदर पक्षी चित्रबलाक (Painted Stork) हा करकोचा जातीचा पक्षी असून पाणथळ जागी याचा अधिवास असतो. चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
महाराष्ट्राचा राज्यपक्षी
कबूतरवंशातील हरियाल (शास्त्रीय नाव: Teron phoenicoptera) हा पक्षी महाराष्ट्राचा ’राज्यपक्षी’ म्हणून ओळखला जातो. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मीळ झाला आहे. पक्ष्यांची लोकप्रियता, सांस्कृतिक महत्त्व आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन त्याला राज्य पक्षी म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी, पिवळ्या पायांचे हिरवे कबूतर हा महाराष्ट्रातील जैवविविधता, संस्कृती आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारा एक अद्वितीय आणि महत्त्वाचा पक्षी आहे.
दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय वगैरे पाण्यातील जीव खातो. बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतच अधिवास मिळतो. ‘प्लवर’ सारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी (इबिस), चमचा हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके स्थलांतर करून इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा असतात.
पाणथळ पक्ष्यांसोबत गवताळ आणि रानांत आढळणारे पक्षी पण मोठ्या संख्येने आहेत. एकेकाळी पक्ष्यांचा राजा बनण्याच्या शर्यतीत असलेला गवताळ प्रदेशात आढळणारा माळढोक पक्षी आता दुर्मीळ झाला आहे. महाराष्ट्रात माळढोक पक्षी नान्नज (सोलापूर जिल्हा) आणि वरोरा (चंद्रपूर जिल्हा) येथे आढळल्याची नोंद होती. पण मागच्या वर्षी झालेल्या पक्षी गणनेत एकही माळढोक पक्षी आढळला नाही. महाराष्ट्रातून माळढोक पक्षी नामशेष झाला की काय? तर, तणमोर हा पक्षी अकोला आणि वाशिम या भागातील माळरानात आढळतो. तणमोरांची संख्याही आता बोटावर मोजता येईल इतकीच राहिली आहे. तसेच गंगापूर, पुणे, कोल्हापूर या शहरात एखादा तणमोर पक्षी आढळला आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आढळणार्या सारस पक्ष्यांची संख्याही आता फार कमी झालेली आहे. पिंगळा महाराष्ट्रात त्यांची संख्या जवळपास शंभर सव्वाशे होती. हा पक्षी मुख्यत: सातपुडा पर्वतरांगेत आढळतो. परंतु, जगात त्याची संख्या फार कमी दिसून येत आहे. याचे मुख्य कारण गवताळ प्रदेशाकडे झालेले दुर्लक्ष... मुख्यत्वे गवताळ प्रदेश म्हणजे पडीत जमीन म्हणून बघितली जाणारी एक दुर्लक्षित परिसंस्था.
आता गवताळ प्रदेश संवर्धनाची मोहीम राबवली जात असली ही सकारात्मक बाजू असली तरी त्याबाबत अद्याप जनजागृती कमी प्रमाणात आहे. वनविभाग, पक्षिमित्र संस्था आणि पक्ष्यांचा अभ्यास करणार्या व्यक्ती, संस्थांकडून महाराष्ट्रात पक्ष्यांची नोंद केली जाते. त्यानुसार आतापर्यंत साधारण 550च्या वर पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे. ‘EBird’ या अॅपवर 568 प्रजातींची नोंद दाखवली गेली आहे. पण गेल्या तीन वर्षांत वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्याकडून झालेल्या पाहणीनुसार, ही संख्या लक्षणीयरित्या घटल्याचे आढळून आले आहे. नोंद असलेल्या पक्ष्यांपैकी 50 प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत..या प्रजाती वाचवण्यासाठी वनविभाग आणि ‘बीएनएचएस’कडून प्रयत्न केले जात आहेत. पक्षी वाचवण्यासाठी आपल्यालाही काही उपाय करायला हवेत. उन्हापासून बचावासाठी पक्षी पाणवठ्यांचा आधार घेतात; थंडावा देणार्या वड, पिंपळ, कडूनिंब वृक्षांचा आसरा घेतात... उष्माघातापासून बचाव व्हावा, यासाठी पक्षी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. वाढत्या तापमानात पक्षी भरपूर पाणी पितात. तसेच, ज्या ठिकाणी थंडावा असेल असे पाणवठे, डेरेदार वृक्ष, गर्द वनराई अशा ठिकाणी आश्रय घेतात. यामुळे उकाड्यापासून ते आपला बचाव करतात त्यासाठी आणि पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी आपण जास्तीत जास्त झाडे जपली पाहिजे आणि झाडे लावली पाहिजे तसेच छोटे पाणवठे ही तयार केले पाहिजेत.
शालेय मुलांमध्ये पक्ष्यांसंदर्भात जनजागृती होण्यासाठी माहितीपर व्याख्याने आयोजित करायला हवीत. नागरिकांनी आपल्या आपल्या गच्चीवर किंवा अंगणात मातीच्या भांड्यात पाणी ठेवायला हवे जेणेकरून आकाशात उंच उडणार्या घारीसारख्या पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी मिळेल.
- सीमा तंगडपल्लीवार
(शब्दांकन : समृद्धी ढमाले)