खानिवडे: ‘विवेक व्यासपीठा’च्या ‘संस्कृती, संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान’च्यावतीने संस्कृत भाषेतील जागतिक स्तरावरील संस्कृत गुरुकुल ‘वेदिक हेरिटेज कॉन्क्लेव्ह’ वसईत साकारले जात असून मंगळवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या गुरुकुलाचा शुभारंभ एका शानदार कार्यक्रमाद्वारे करण्यात आला.
पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील मुंबई-कर्णावती जुना ८ नंबर व आताचा अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातून साकार झालेल्या मुंबई दिल्ली चेन्नई व कोलकाता या चारही प्रांतांना जोडणारा म्हणजेच देशाचा ‘सुवर्ण चतुष्कोण’ असलेल्या अत्यंत वर्दळीच्या ४८ नंबर महामर्गावरील ‘सेवा विवेक’च्या भालिवली प्रकल्पावर हे गुरुकुल साकारले जात आहे. प्रकल्पावरील स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झालेल्या ‘विचार कुंभ’ या समारंभाला देशातील अनेक राज्यांतून तसेच, विदेशातील इटली, स्पेन, नेपाळ आदी देशातील कुलगुरू उपस्थित होते .
सनातन संस्कृतीत सर्वात महान समजली जाणारी गुरुशिष्य परंपरा म्हणजे काय, गुरुकुल का आवश्यक आहे, हे यावेळी आलेल्या देश-विदेशातील प्रत्येक कुलगुरूंनी आपल्या ओघळ वाणीने प्रस्तुत केले. त्याचा थोडक्यात सार असा आहे की, गुरू-शिष्य संबंध हे चार प्रकारचे असत - भौतिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. गुरूचे शिष्यावर पुत्रवत प्रेम असते. विशुद्ध प्रेम, वात्सल्य, त्याला शिकवण्याची तळमळ. आत्यंतिक कणव, प्रसंगी अत्यंत कठोर, शिष्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीतून तावूनसुलाखून लावणारी शिक्षणपद्धती म्हणजेच गुरुकुल. त्या गुरुकुलाचे कर्तेधर्ते म्हणजेच कुलगुरू.
आपल्या संस्कृतीत व्यास हे अखिल जगाचे गुरु आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म-अध्यात्म-वाङ्मय अशा सर्वच विषयांतील गुरु आहेत. त्यामुळे आपली संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला आपल्या मातापित्यांची आणि गुरूंची पूजा करण्याची प्रथा आहे. गुरु-शिष्याचे नाते म्हणजे दोन आत्म्यांचे परस्परांशी असलेले अनोखे, अतूट नाते आहे. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो.
शिष्याला भवसागरातून पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुपाशीच असते. केवळ ज्ञान, न्याय, नीती या विद्यांचा अभ्यास करताना गुरूची आवश्यकता असते असे नाही. ६४ कलांतील कोणतीही कला साध्य करतानाही गुरूचे मार्गदर्शन आवश्यक असते. संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यांत यशस्वी ठरलेल्या कलावंतांनी नेहमीच आपल्या गुरूचा गौरव केलेला आहे.
प्रसिद्ध निवेदिका समीरा गुर्जर यांच्या सूत्रसंचालनाने झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात ही उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचा परिचय आणि स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून ‘संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, संस्कृत भाषा संवर्धनात उल्लेखनीय कार्य करणार्या राष्ट्रपती पदक प्राप्त विद्यमान कार्यकारी अध्यक्षा डॉ. कला आचार्य, ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी’चे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, ‘पितांबरी उद्योग समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, ‘श्री श्री युनिव्हर्सिटी, कटक’, ओडिशाचे कुलगुरू डॉ. बी. आर. शर्मा, ‘जे. के. युनिव्हर्सिटी’चे कुलगुरू डॉ. एस. रामरत्नम, राष्ट्रीय संस्कृत संस्थांचे माजी उपकुलगुरू राधावल्लभ त्रिपाठी, प्रोफेसर ऑफ फिलॉसॉफी, पॅरिस ८ युनिव्हर्सिटी, इटलीचे डॉ. पावलो बॅरोने, स्पेनचे डॉ. मारियानो इतुरबे, ‘युनिव्हर्सिटी ऑफ सुंदरलॅण्ड अॅण्ड फाऊंडर ऑफ संस्कृती सेंटर लंडन’च्या प्रोफेसर रघूसुधा वेंजामुरी, व्ही. एन. राजशेखर पिल्लई, ‘सेवा विवेक’चे प्रदीप गुप्ता यांच्यासह अनेक संस्कृत दिग्गज उपस्थित होते.