मुलुंड कचराभूमी लवकरच मोकळा श्वास घेणार - आतापर्यंत ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण; महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

    12-Jun-2025   
Total Views | 6

मुंबई, एकेकाळी कचऱ्याच्या डोंगराखाली दबलेली मुलुंड क्षेपणभूमी आता मोकळा श्वास घेणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या क्षेपणभूमीवरील सुमारे ७ दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी 'बायो-मायनिंग' प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाने आतापर्यंत ४.८१ दशलक्ष मेट्रिक टन, म्हणजेच तब्बल ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करून ही जागा मोकळी केली आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवार, दि. १२ जून रोजी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली आणि उर्वरित कचरा जलदगतीने निष्कासित करण्याचे निर्देश दिले. येथील बायो-मायनिंग प्रकल्पाला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. कचरा प्रक्रियेच्या कामाची गती आणि प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रक्रिया कशी चालते?


- मुलुंड क्षेपणभूमीवरील कचरा निष्कासित करून मूळ जागा पुनर्प्राप्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अथक प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुलुंड येथील क्षेपणभूमीवरील सुमारे ७ दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायो-मायनिंग प्रकल्प राबविला जात आहे.

- या प्रकल्पांतर्गत कचऱ्यातील माती, ज्वलनशील पदार्थ तसेच राडारोडा किंवा दगडासारख्या घटकांचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. ऑक्टोबर २०१९ पासून हा प्रकल्प कार्यरत असून याठिकाणी आतापर्यंत ४.८१ दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.

- आयुक्त गगराणी यांनी भेटीदरम्यान मुलुंड क्षेपणभूमीवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या यंत्रसामग्रीची बारकाईने पाहणी केली. तसेच, कचऱ्यावरील प्रक्रियेबाबतही त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. या प्रकल्पामुळे मुलुंड क्षेपणभूमीचा कचरामुक्त होऊन लवकरच एक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक जागा म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121