क्रांतिवीर डावरे बंधू

    27-May-2021
Total Views | 461
पुण्यात स्थायिक असलेल्या क्रांतिकारक डावरे कुटुंबातील तीन बंधू: गोविंदराव (१८३६-१८७९), माधवराव (१८४१-१८९६) आणि बळवंतराव (१८४७-१८९६). डावरे बंधूंचे वडील नारायणराव (१८१५-१८६५) यांनी १८५७च्या प्रथम स्वातंत्र्ययुद्धाला महाराष्ट्रामधून साहाय्य केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील शौर्याची ही कहाणी...

DORE_1  H x W:
 हुतात्मा गोविंदराव डावरे, यांचे बडोद्याच्या मकरपुरा राजवाड्यातील तैलचित्र. बडोद्याच्या मकरपुरा-राजवाड्यातील मूळ तैलचित्राची मीनाक्षी श्रीकृष्ण डावरे यांनी केलेली प्रतिकृती.
 
 

SAAVRKAR DECPREMI_1 
 
वायपर बेटावरील प्रचंड फाशीघर, त्या तुरुंगाचा सध्याचा एकमेव अवशेष.
सावरकर बंधू, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर (तात्याराव, १८८३-१९६६) आणि डॉक्टर बाळाराव हे माझे आजोबा धर्मवीर विश्वासरावांच्या (१८८८-१९५७) भेटीसाठी डावरे वाड्यात अनेक वेळा आलेले, मी लहानपणी पाहिलेले आहे. हिंदुस्थानातील पारतंत्र्याविरुद्धच्या क्रांतियुद्धामध्ये तात्यारावांची तीन प्रमुख स्फूर्तिस्थाने असल्याचे ते सांगत: (१) क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके (१८४५-१८८३), (२) क्रांतिवीर डावरे बंधू आणि (३) तात्यारावांचे मोठे बंधू क्रांतिवीर गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर (१८७९-१९४५). पुण्यात स्थायिक असलेल्या क्रांतिकारक डावरे कुटुंबातील तीन बंधू: गोविंदराव (१८३६-१८७९), माधवराव (१८४१-१८९६) आणि बळवंतराव (१८४७-१८९६). डावरे बंधूंचे वडील नारायणराव (१८१५-१८६५) यांनी १८५७च्या प्रथम स्वातंत्र्ययुद्धाला महाराष्ट्रामधून साहाय्य केले होते. डावरे बंधूंपैकी थोरले बंधू हुतात्मा गोविंदरावांनी वासुदेव बळवंतांच्या इंग्रज सरकारविरुद्ध लढ्याला मदत केली होती. वैध मार्गांनी पकडता आले नाही म्हणून इंग्रज सरकारने पुणे येथे न्यायालयीन कच्च्या कैदेत (कस्टडी) असताना गोविंदरावांना १३ डिसेंबर, १८७९ रोजी जीवंत जाळून मारले होते. इंग्रज सरकारविरुद्ध कोळ्यांनी केलेल्या उठावास मदत केल्याच्या आरोपावरून माधवराव आणि बळवंतराव या बंधूद्वयींना जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानच्या काळ्या पाण्यावर २१ वर्षे (१८७३-१८९४) पाठविले होते.
 
हुतात्मा गोविंदराव डावरे
 
त्यावेळेच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ सरकारने सन १८५२ मध्ये ‘इनाम-कमिशन’ची स्थापना केली. ‘इनाम कमिशन’ने जहागिरदार आणि वतनदारांना ‘अचूकपणा तपासण्यासाठी’ मूळ सनदा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु, ‘इनाम कमिशन’ सनदांच्या सत्यतेबद्दल शंका घेऊ लागले. मूळ कागदपत्रे दाखल केल्यानंतरही, ती मिळाली नसल्याची बतावणी करून, ‘इनाम कमिशन’ पुन्हा मूळ कागदपत्रे मागत असे. परिणामतः वतनांवरचे त्यांचे अधिकारच धोक्यात आले. कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही, अशी तरतूद कायद्यामध्ये केलेली असल्यामुळे, जहागिरदार आणि वतनदारांना दाद मागता येईना.
 
सुलेखन-विद्येमध्ये (कॅलिग्राफी) पारंगत, गोविंदरावांनी अनेकांना कॅलिग्राफी-प्रशिक्षण दिलेले होते. सनदांच्या प्रती करून देऊन, अन्यायाविरुद्ध मदत करावी, अशी विनंती काही जहागिरदार आणि वतनदारांनी गोविंदरावांना सन १८६३ मध्ये केली होती. तसे करण्यात अनेक धोके असल्यामुळे गोविंदरावांनी ती विनंती नाकारली होती. खंडेराव गायकवाड महाराज १८५६ पासून १८७० पर्यंत बडोदा संस्थानचे राज्यकर्ते होते. व्यवसायामुळे डावरे बंधूंचा त्यांच्याबरोबर उत्तम परिचय होता.
 
काही जहागिरदार आणि वतनदारांना मदत करावी, अशी विनंती १८६५ मध्ये खंडेराव महाराजांनी गोविंदरावांना केली. अशी विनंती पूर्वीच नाकारल्याचे गोविंदरावांनी महाराजांना विदित करून, त्यांतील धोके दाखवून दिले. महाराजांच्या आग्रहास्तव आणि गोपनीयतेची हमी दिल्यानंतर, गुप्त योजना बनविली. ‘कॅलिग्राफी’तज्ज्ञांकडे सनदांच्या प्रती बनविण्याची जबाबदारी दिली होती. त्यांचे अस्तित्व आणि कार्यपद्धती डावरे कुटुंबालाही ज्ञात नव्हती. अनेक जहागिरदार आणि वतनदारांची वतने वाचली. परंतु, गुप्तता भंग झाल्याने, इंग्रज सरकारची वक्र नजर गोविंदरावांवर आली. परंतु, कागदोपत्री पुरावा न मिळाल्याने, इंग्रज सरकार गोविंदरावांविरुद्ध काही करू शकले नाही.
 
सन १८५८ पासून १८६७ पर्यंत चार वेळा प्रयत्न करूनही इंग्रज सरकार गोविंदरावांविरुद्ध एकही अभियोग उभा करू शकले नाही. १८६५ मध्ये पुण्यामध्ये ‘पूना बँके’ची स्थापना करणार्‍या संस्थापक-संचालकांपैकी गोविंदराव असूनही, ‘पूना बँके’ला फसवल्याच्या खोट्या आरोपांवरून इंग्रज सरकारने गोविंदरावांसह १४ प्रतिष्ठित नागरिकांवर सप्टेंबर-ऑक्टोबर १८६७ मध्ये अभियोग चालविला. पुणे सत्र न्यायालयात सर्व जण निर्दोष ठरून, त्यांना सन्मानपूर्वक सोडण्यात आले.
 
इंग्रज सरकारच्या दडपशाहीविरुद्ध मिळविलेल्या न्यायालयीन विजयाप्रीत्यर्थ पुण्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गोविंदरावांना घोड्यांच्या बग्गीमधून संगमपुलावरील सत्र न्यायालयापासून भवानीपेठेतील डावरे वाड्यापर्यंत मिरवणुकीने नेले. इंग्रज सरकारविरुद्ध क्रांतिकारकांनी विजय प्राप्त केल्याची ही अद्वितीय बातमी पुण्यातील ‘ज्ञानप्रकाश’ आणि कलकत्त्यातील ‘अमृत बझार पत्रिका’ या वृत्तपत्रांत प्रकाशित झाली होती. त्यावेळी इतके पेढे वाटले होते की, पुण्यातील हलवायांकडील पेढे संपले होते.
 
कोळ्यांच्या उठावाला मदत केल्याच्या आरोपावरून माधवराव आणि बळवंतराव या बंधूद्वयींना जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानच्या काळ्या पाण्यावर १८७३ मध्ये पाठविल्यावर इंग्रज सरकारला वाटले की, आपण गोविंदरावांना नामोहरम केले. परंतु, गोविंदरावांच्या राष्ट्रकार्यात खंड पडला नाही.
 
१८७० मध्ये खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर मल्हारराव महाराज बडोदा संस्थानचे राज्यकर्ते झाले. इंग्रज रेसिडंट कर्नल फेअरच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपांवरून इंग्रज सरकारने १८७४ मध्ये मल्हारराव महाराजांना पदच्युत करून अटक केली आणि चौकशी बसविली. मल्हारराव महाराजांजवळ कायदेशीर बचाव करण्यासाठीसुद्धा द्रव्य नव्हते. त्यावेळी सार्वजनिक काकांनी (गणेश वासुदेव जोशी) पुण्यामध्ये एक लाख रुपये निधी जमविला. एवढी मोठी रक्कम पाठवून इंग्रज सरकारचा रोष कोण ओढवून घेणार? त्यावेळी गोविंदरावांच्या पेढीवरून हुंडी पाठवून, मल्हारराव महाराजांकडे रक्कम पोहोचविली होती.
 
वासुदेव बळवंतांच्या इंग्रज सरकारविरोधी मोहिमांना गोविंदरावांचे साहाय्य होते. सन १८७५-७६ मध्ये दक्षिणेकडे पडलेल्या दुष्काळाच्या वेळी रयतेला मदत करण्यामध्ये वासुदेव बळवंतांना गोविंदरावांची मोठी मदत झाली. एक दंतकथा सांगितली जाते की, वासुदेव बळवंतांना सैन्य उभे करण्यासाठी गोविंदरावांनी करन्सी नोटा छापल्या होत्या. परंतु, इंग्रज सरकारच्या ‘कार्यक्षम’ गुप्तहेर संस्थेला तसा पुरावा कधीही मिळाला नाही. क्रांतिकार्याच्या मदतीकरिता गोविंदरावांनी अनेक दालने उघडून, आर्थिक व इतर मदतही भरपूर केली. महर्षी विनायक रामचंद्र (अण्णासाहेब) पटवर्धन यांना हैदराबाद संस्थानामध्ये बँक स्थापन करण्यासाठी गोविंदरावांनी १८७८ मध्ये साहाय्य केले होते.
 
क्रांतिवीर वासुदेव बळवंतांना दि. २० जुलै, १८७९ रोजी अटक झाली. वासुदेव बळवंत आणि त्यांच्या सहकार्‍यांना पुण्यातील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. अपिलात मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा कायम केली.इंग्रज सरकारने त्या सर्वांना शिक्षा भोगण्यासाठी एडनच्या तुरुंगात पाठविले. गोविंदरावांवर बनावट आरोप ठेवून नोव्हेंबर १८७९ मध्ये चौकशीसाठी कच्च्या कैदेमध्ये ठेवले होते.
 
त्यांच्या न्यायालयीन कस्टडीची मुदत १३ डिसेंबर, १८७९ रोजी संपत होती. त्या दिवशी आरोपपत्र दाखल करता न आल्यामुळे इंग्रज सरकारला क्रांतिवीर गोविंदरावांना मुक्त करणे भाग होते. परंतु, इंग्रज सरकारने पुण्यातील मामलेदार कचेरीजवळील कस्टडीच्या इमारतीला उत्तररात्री आग लावून, गोविंदरावांना जीवंत जाळून मारले.
 
क्रांतिवीर माधवराव आणि बळवंतराव डावरे
 
डावरे बंधूंचे वडील नारायणराव यांनी भवानीपेठेतील त्यांच्या राहत्या डावरे वाड्याजवळ बुरडी पुलासमोर, १८६५ मध्ये डावरेमारुती आणि डावरेतालीम यांची स्थापना केली. डावरेतालमीच्या उद्घाटनाचे भाषण करताना नारायणराव म्हणाले होते की, “आपल्या देशामध्ये दुर्बल आणि आजारखातू लोक जास्त नजरेस येतात. आपल्या तरुणांना मजबूत आणि ताकदवान बनविल्याशिवाय देशाची उन्नती होणार नाही.” शरीराबरोबच मनालाही शक्तिवान बनविण्यासाठी, डावरे बंधू तरुणांना स्फूर्ती देत असत. डावरेतालमीमध्ये तरुणांना मल्लविद्या आणि शरीरसौष्ठवाच्या प्रशिक्षणाबरोबरच राष्ट्रीयत्वाचेही धडे दिले जात असत. कणखरमनाचा प्रशिक्षित मल्ल शत्रूच्या दहा सैनिकांना भारी असल्याचे मल्ल विद्यागुरू बळवंतराव शिकवीत होते. बळवंतरावांनी पुण्यामध्ये अनेक मल्लविद्या आणि शरीरसौष्ठव स्पर्धा घडवून आणल्या, तसेच मुंबई परिसरामध्ये ‘तालीम महासंघा’ची (जिम्नॅस्टिक फेडरेशन) स्थापना केली. समाजातील अंधविश्वासाचे निर्मूलन करून, समाजसुधारणा करण्याचे कार्य ते करीत होते. ‘इंग्रज इंटेलिजन्स सर्व्हिस’चे गुप्तहेर डावरेतालमीवर आणि डावरे वाड्यावर नजर ठेवून होते.
 
कोळ्यांचा उठाव
 
१८१८ मधील पेशवाईच्या अंतापासून १८५८ पर्यंत हिंदुस्थानमध्ये ‘ईस्ट इंडिया’ कंपनीचे राज्य होते. राणीच्या जाहीरनाम्यानंतर १८५८ मध्ये ब्रिटनच्या व्हिक्टोरिया राणीचे सरकार आले. १८१८-१८७० या काळात देशात अनेक दुष्काळ पडले होते. पश्चिम हिंदुस्थानावर इंग्रजी सत्ता स्थापन झाल्यापासून डोंगरी आणि वनवासी जमाती इंग्रजांविरुद्ध बंड करीत आलेल्या आहेत. भिल्ल, रामोशी आणि कोळी यांनी केलेले उठाव प्रामुख्याने इंग्रजी राज्य, जमीनदार आणि सावकार यांच्याविरोधात असल्यामुळे, इंग्रजी राज्य हादरून गेले. त्यावेळच्या गुन्हेगार जमाती कायद्यान्वये (क्रिमिनल ट्राईब्स अ‍ॅक्ट, १८७१), ४२ जाती-जमातींना गुन्हेगार ठरवून, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्यकर्त्यांना अगणित अधिकार देण्यात आले. त्या ४२ जाती-जमातींच्या लोकांना जन्मतःच गुन्हेगार घोषित केले गेले. इंग्रज सरकारच्या दडपशाहीविरुद्ध जाती-जमातींच्या मनात असलेला असंतोष धुमसत गेला.

ANDY_1  H x W:  
 
पुणे जिल्ह्यातील जांबोरी गावाचे रहिवासी भागोजी नाईक केंगळे हे इंग्रज सरकारच्या पोलीस खात्यात होते. तात्या टोपे आणि महादेव कोळी यांच्याबरोबर १८५७च्या स्वातंत्र्यसमरात ते लढले होते. १८५८ पर्यंत इंग्रज सरकारविरुद्ध त्यांनी लढा दिला. भागोजींचे पुत्र होन्या कोळी यांच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी १८७० मध्ये इंग्रज सरकारविरुद्ध पुन्हा उठाव केला. पुणे, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उठाव झाला. कोळी तरुणांनी डावरेतालमीत प्रशिक्षण घेतल्याचे गुप्तहेरांच्या निदर्शनास आले. कोळी उठावाला असलेले डावरे कुटुंबीयांचे साहाय्य इंग्रज सरकारला खटकत होते. परंतु, माधवरावांच्या कडक नियमावलीमुळे इंग्रज गुप्तहेरांना कागदोपत्री पुरावा मिळत नव्हता.
 
क्रांतिवीर माधवराव आणि बळवंतरावांवर त्वरित अभियोग आणि जन्मठेप
डावरेतालमीत येणार्‍या तरुणांवर गुप्तहेर संस्थेने आपले जाळे पसरले. द्रव्याचे आमिष देऊन, फितुरांद्वारे गुप्तहेर संस्थेने ऑक्टोबर १८७३ मध्ये डावरेतालमीमध्ये कागदपत्रे लपविली. दुसर्‍या दिवशी डावरेतालमीतून दोषारोप-करण्याजोगी कागदपत्रे जप्त करून, त्यांनी माधवराव आणि बळवंतरावांना अटक केली. देशद्रोह आणि इंग्रज-राणी व तिचे सरकार यांच्याविरुद्ध युद्ध पुकारणे (Sedition and waging war against the Queen and her Government) या आरोपांखाली नोव्हेंबर १८७३ मध्ये माधवराव आणि बळवंतरावांवर अभियोग चालविला.
 
सरकारपक्षाची मदार तरुण फितूर आणि गुप्तहेरांचे ‘पित्ये’ यांच्या साक्षींवर होती. १८६७ मध्ये ‘पूना बँक’अभियोगातून गोविंदरावांच्या झालेल्या निर्दोषमुक्ततेपासून धडा घेतलेल्या इंग्रज सरकारने बचावाची संधी मिळू न देता, केवळ ३० दिवसांमध्ये अभियोग निकाली काढून, माधवराव आणि बळवंतराव या बंधूंना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यश मिळविले. माधवराव आणि बळवंतरावांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. परंतु, ते नाकरले गेले. माधवराव आणि बळवंतराव बंधूद्वयींना जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी १८७३ अखेरीस काळ्या पाण्यावर अंदमानला पाठविले.
 
राष्ट्रीयवृत्तीच्या नागरिकांना फार मोठा हादरा बसला. त्यामुळे हताश झालेले एक अनुयायी गोविंदरावांना म्हणाले की, “आपण इंग्रज सरकारविरुद्ध लढाई हरलो.” गोविंदरावांनी उत्तर दिले, “होय, आपल्यामधील फितुरांमुळे आपला अनेक वेळा पराभव होतो. विदेशी शक्तींपेक्षा फितूर आपले मोठे शत्रू आहेत. विदेशी शक्तींवर आपण विजय मिळवू शकतो. परंतु, फितुरांवर मात करण्यासाठी आपल्याला समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. फितुरीच्या दुष्परिणामांची जाणीव समाजामध्ये वाढवून राष्ट्रीयवृत्तीची जोपासना केली पाहिजे. निश्चितच आपण एक मोठी लढाई हरलो आहोत. परंतु, युद्ध अजून चालू आहे आणि आपण जिंकेपर्यंत ते चालत राहणार!” आपला लढा पुढे चालू ठेवण्यासाठी राष्ट्रीयवृत्तीच्या नागरिकांना गोविंदरावांचा दिलासा स्फूर्तिदायक होता.
अंदमान बेटांवरील कैद्यांची-वसाहत
 
 
१७८९ मध्ये ताबा मिळविल्यापासून, अंदमान-निकोबार बेटांचा समूह ‘ब्रिटिश-बर्मा’चा भाग होता. १८५७च्या प्रथम स्वातंत्र्यसंग्रामातील कैद्यांना ठेवण्यासाठी इंग्रजांनी अंदमान बेटावर कैद्यांची वसाहत निर्माण केली. पोर्टब्लेअरच्या पश्चिमेला चार किलोमीटरवर असलेल्या ‘वायपर बेटा’वर तुरुंगाचे बांधकाम केले. मेजर (पुढे कर्नल) जेम्स वॉकरला कैद्यांच्या वसाहतीचा प्रथम सुपरिटेंडेंट नेमले. ‘एस. एस. सेमीरामिस’ नावाच्या बोटीतून पोर्टब्लेअर येथे पहिली २०० बंदीवानांची तुकडी १० मार्च, १८५८ रोजी उतरली, पाठोपाठ अनेक बोटींतून कैदी आले. ‘वायपर’ आणि ‘रॉस’ बेटांवरील तुरुंगांचे बांधकाम जेम्स वॉकरने कैद्यांकडूनच करून घेतले.
 
जेम्स वॉकरच्या कडक आणि क्रूर वर्तणुकीमुळे अनेक कैद्यांचे बळी पडले. पायांतील बेड्यांच्या साखळ्या काढताच काही कैद्यांनी पलायनाचा जीवघेणा प्रयत्न केला. म्हणून कामासाठी पायांतील बेड्यांच्या साखळ्या काढत नसत. वायपर बेटावरील ‘चेन-गँग्ज’ इतिहासप्रसिद्ध झाल्या. पुन्हा पकडलेल्या कैद्यांना ताबडतोब फाशी दिली जाई. एके दिवशी ८६ कैद्यांना फाशी दिले होती. वायपर बेटावरील प्रचंड फाशीघर आजही अस्तित्वात आहे. हाती सापडलेल्या कैद्यांना मनुष्यभक्षक वनवासींनी मारले. बोडन क्लॉस नावाच्या ब्रिटिश लेखकाने ‘द इंग्लिश ऑब्झर्वर’मध्ये लिहिले होते : सहा
 
अंदमान बेटांना ‘डेव्हिल्स आयलंड’ (काळे-पाणी) नाव पडले. राजकीय कैद्यांना हिंदुस्थानपासून शारीरिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या दूर ठेवण्यासाठी हा तुरुंग निवडला. रोगट हवामानामुळे तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. घनदाट अरण्ये तोडणे, विटा व चुन्याच्या भट्यांमध्ये कामे इत्यादी कष्टाची कामे कैद्यांकडून करून घेतली जातात. वायपर बेटावर विषारी सर्प सापडतात.
 
कैद्यांची संख्या १८६४ मध्ये ३,२९४ आणि १८७४ मध्ये ९,६०३ होती. सन १८८४ मध्ये वायपर आणि रॉस बेटांवरील तुरुंगांमध्ये कैद्यांची संख्या मावेना. म्हणून चीफ कामिशनर आणि सुपरिटेंडेंट थॉमस कॅडेल यांनी दोन शिफारसी केल्या :
 
(१) दहा हजार कैदी ठेवता येतील, असा मोठा तुरुंग ग्रेट-अंदमान बेटावर बांधावा.
 
(२) वायपर आणि रॉस बेटांवरील तुरुंगांमधील दहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगलेल्या चांगल्या वर्तणुकीच्या कैद्यांना तुरुंगाबाहेर (त्याच बेटावर) खुल्या तुरुंगाप्रमाणे वस्ती करून राहण्याची सवलत द्यावी.
 
हिंदुस्थानातील इंग्रज सरकारने दोन्ही शिफारसींना मान्यता दिली. त्यानुसार पोर्टब्लेअरजवळील सध्याच्या ‘सेल्युलर जेल’चे बांधकाम १८९६ मध्ये सुरू होऊन १९०६ मध्ये पूर्ण झाले. सात कारावासामध्ये ११ वर्षे अनन्वित हालांमध्ये शिक्षा भोगल्यानंतर माधवराव आणि बळवंतराव बंधूंना कारावासाबाहेर वायपर बेटावरच राहण्याची सवलत मिळाली. दूषित हवामान आणि मनुष्यभक्षक वनवासींच्या वास्तव्यामुळे, अशा सवलतीचा वापर करणारे फार थोडे कैदी वाचत असत. अनेक धोके असूनही आणि मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरकडून नकार मिळाला असतानाही, बळवंतरावांच्या पत्नी गीताबाईंनी पतीबरोबर वास्तव्य करण्याची परवानगी कलकत्त्याच्या इंग्रज गव्हर्नर जनरलकडून मिळविली. माधवरावांची पत्नी सोनुबाई यांच्यासह, गीताबाई अंदमानातील धोकादायक वायपर बेटावर राहाण्यास १८८५ मध्ये गेल्या.
 
पुढे आठ वर्षांमध्ये त्या दोघी वीरपत्नींनी, त्या काळात दुरापास्त असलेला, पुणे-अंदमान-पुणे (कलकत्तामार्गे) प्रवास तीन वेळा केला. अंदमानातील वायपर बेटावर ७ नोव्हेंबर, १८८८ रोजी बळवंतराव आणि गीताबाईंचे पुत्र, विश्वासराव (पुढे ‘धर्मवीर’) यांचा जन्म झाला. काळ्या पाण्यावरील २१ वर्षांची खडतर कारावासाची शिक्षा भोगून क्रांतिवीर माधवराव आणि बळवंतराव १८९४ मध्ये पुण्यात परतले, तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्यांचे स्वागत केले होते. डावरे बंधूंच्या सुटकेनंतर १२ वर्षांनी पोर्टब्लेअरमधील सेल्युलर जेलचे बांधकाम सुरू झाल्यामुळे, सेल्युलर जेलच्या ‘मानपटा’वर डावरे बंधूंची नावे नाहीत. पुढे दुर्दैवाने १८९६ मधील ‘ब्युबॉनिक प्लेग’च्या साथीमध्ये डावरे कुटुंबाच्या इतर सहा सदस्यांसह त्या दोघा क्रांतिवीरांचाही अंत झाला.
 
सावरकर-डावरे कुटुंबीयांमध्ये स्नेह असून, ‘सशस्त्रक्रांती’, ‘अभिनव भारत’, ‘हिंदू महासभा’, ‘हिंदुस्थानी तरुणांचे सैनिकीकरण’, ‘हैदराबाद सत्याग्रह’ अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक अभियानांना धर्मवीर विश्वासरावांचा सक्रिय पाठिंबा होता.
 
संदर्भ:
(१) हुतात्मा गोविंदराव डावरे, परम मित्र प्रकाशन, ठाणे, विनायक पुरुषोत्तम डावरे (विंग कमांडर-निवृत्त), दुसरी-आवृत्ती २०१७. या पुस्तकाची प्रथमावृत्ती १९५२, नेर्लेकर-प्रकाशन, पुणे, अ‍ॅडव्होकेट पुरुषोत्तम विश्वासराव डावरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रोत्साहनाने लिहिली होती.
website:
https://www.akshardhara.com/en/charitra-aitihasik/३१३७०-Hutatma-Govindrao-Davray-Vinayak-Davray-Param-Mitra-Publication-buy-marathi-books-online-at-akshardhara.html
(२) Q-६०७५: Report Submitted to the British Parliament, १८५६.
(३) ज्ञानप्रकाश, पुणे, २४ ऑक्टोबर १८६७; Amrut-Bazar-Patrika, Calcutta, २५ Oct, १८६७.
(४) Hunter, William, The Imperial Gazetteer of India, १८७९, p. ३९१.
(५) One Hundred Years of Penal Colony at Andaman Islands, Ramchandra Kapse, Lieutenant-Governor of Andaman and Nicobar Islands (२००४-२००६).
(६) Boden Kloss, The English Observer, vol.१८६०.
(७) Order No.४२३, dated ३०th September १८९३,The British Administration, India.
- विनायक डावरे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121