यंदा ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर भूषविणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्याचा वेध घेण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न...
‘आकाशाशी जडले नाते’ म्हटलं की, मराठी माणसाच्या मनात ‘गीत रामायणा’च्या ओळी रुंजी घालू लागतात. पण, डॉ. जयंत विष्णू नारळीकरांनी मराठी मनात याच नावाने स्थान निर्माण केले आणि त्याला थेट अंतराळात घेऊन गेले. विज्ञान आपल्या मायबोलीतून अगदी सामान्य माणसाला समजेल असं सहज सोपं करून त्याच्यासमोर अख्खा पटच उलगडून ठेवला, तो डॉ. जयंत नारळीकरांनी! १९९८ साली मी जेमतेम २३ वर्षांची असेन, जेव्हा या पुस्तक रूपाने सध्या सोप्या भाषेतील अंतराळ आमच्याच नव्हे, तर अनेक मराठी घरांमध्ये सहज हाताशी आले. विज्ञान हे केवळ ’शेखी’ मिरविण्याचे साधन नसून, तसेच ते सहज समजून-उमजून शिकण्याचे नव्हे, तर आनंद घेण्याचे एक अतिशय साधे सोपे साधन आहे, हे नारळीकरांनी त्यांच्या लेखनातून प्रत्येकाला जाणवून दिले. ’विज्ञानसाक्षर’ बनविण्यासाठी नारळीकरांनी आपल्या लेखणीला वळण दिले आणि साहित्यविश्वात नवे दालन उघडले.
१९३८ साली जन्माला आलेले नारळीकर आपल्या परिवाराचा वारसा पुढे चालवणे म्हणजे फक्त त्या परिवारातला पैसा किंवा घरदार पुढे नेणेच नाही, तर त्या परिवारातली बुद्धिमत्ता, आचारविचार हेसुद्धा पिढ्यान्पिढ्या वाढतील असेच त्यांचे आचारविचार. त्यांचे वडील निष्णात गणितज्ञ, तर आई संस्कृतविदुषी. वडिलांकडून गणित आणि विज्ञानाबद्दल प्रेम मिळाले, तर आईकडून भाषेची समृद्धी. आपल्या जीवनात या दोघांची सांगड डॉ. नारळीकरांनी फार सुंदर घातलेली दिसते.
त्यांचे उच्चशिक्षण केम्ब्रिज विद्यापीठात झाले. तिथे त्यांना ’रँग्लर’ ही पदवी मिळाली, तसेच ‘टायसन’ या पदवीनेसुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या वडिलांनंतर हा सन्मान मिळणारे ते पहिलेच भारतीय ठरले. वारसा असा पुढे चालविला जातो, हे नारळीकरांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले.
विज्ञान आणि साहित्य याची सांगड घातली जाऊ शकते, त्याला आपल्या मातृभाषेतून सहज, सोप्पं करून मांडलं जाऊ शकतं, हे फक्त नारळीकरच करू शकतात, असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. त्यांचं पहिलंच पुस्तक ’यक्षांची देणगी’ याच्या प्रस्तावनेत ‘मी विज्ञान कथा लिहायला कशी सुरुवात केली?’ याच छोट्याशा प्रसंगावरून घडलेली सत्यघटना ते आपल्यासमोर पारदर्शकपणे ठेवतात. त्यांच्या स्वभावतला मोकळेपणा इथे जाणवतो. त्याचबरोबर ‘मी विज्ञानकथा का लिहावी?’ याचं फार सखोल उत्तर ते अगदी सहज देतात. त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त आहे. मराठी साहित्याला नवं दालन खुलं झालं, याचंच हे द्योतक!
शास्त्रीय बैठक लाभलेल्या, मनोरंजक आणि उद्बोधक कथांना सिद्धांताचा जसा आधार आहे, तसेच कल्पनाशक्तीचे परिणामही! ‘यक्षांची देणगी’, ‘कृष्णविवर’, ‘उजव्या सोंडेचा गणपती’, ‘गंगाधरपंतांचे पानिपत’, ’धूमकेतू’, ‘पुनरागमन’, ‘दृष्टीआड सृष्टी’, ‘धोंडू’, ‘पुत्रवती भव’, ‘ट्रॉयचा घोडा’, ‘नौलखा हाराचे प्रकरण’, ‘अखेरचा पर्याय’ या कथा वाचकाला अद्भुत विश्वात घेऊन जातात.
कथालेखनामागचा उद्देश स्पष्ट करताना नारळीकर सांगतात, “विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल, तर त्याला साखरेचे ‘कोटिंग’ म्हणजे कथेचे रूप देणे योग्य ठरेल. विज्ञानकथा अशा उद्देशाने लिहिल्या जाव्यात, असे मला वाटते. निदान मी लिहितो त्या कथा तरी याच उद्देशाने लिहिलेल्या आहेत.”
त्यांच्या कथेचे शीर्षक पण अतिशय समर्पक, वाचणाऱ्याला मोहात पडणारे, जितक्या सोप्या भाषेत रोजच्या जगण्यातले विज्ञान समोर ठेवले तेवढेच आकर्षक त्याचे शीर्षकही!
कठीण विषय आहे म्हणजे तो क्लिष्ट पद्धतीनेच मांडला पाहिजे, असे नाही. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. दूरवर नजर जाईल तोपर्यंत आकाश आपली सोबत करते. कधी अमावस्येचा मिट्ट काळोख बनून, तर कधी लखलखती पौर्णिमा होऊन. कधी शेपटीवला तारा दिसतो, तर कधी सूर्यसुद्धा पूर्ण झाकोळून भर दुपारी काळोख होतो. या आकाशात दडलंय तरी काय काय आणि कुठे कुठे? हा आणि असे प्रश्न सामान्यांना भेडसावत असतात. हे पुस्तक त्याचे समाधान आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नारळीकर अगदी पुस्तकाच्या कल्पनेपासून ते त्याच्या पुस्तक रूपांतरापर्यंत सगळ्या गोष्टी मोकळेपणाने सांगतात. पुस्तकात काय वाचावं, ते अगदी कुठे वाचावं आणि प्रत्येकाचे सहज ऋणनिर्देष भरभरून करतात.
आपण देवाला नैवेद्य दाखवताना अगदी मनापासून म्हणतो -
त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये।
नारळीकर म्हणतात :
‘त्वदीयं वस्तु हे धीमन तुभ्यमेव समर्पये।
काव्यशास्त्रविनोदाबरोबरच विज्ञानाला आपलंसं करणाऱ्या वाचकवर्गाचा गौरव इतक्या सुंदर शब्दात गौरव, नारळीकर तुम्हाला सलाम...!
- सोनाली तेलंग
९८८११३२३९३