आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवनक्रम आचरणारे,तारुण्यात असताना मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून देणारे स्वातंत्रसैनिक आणि तोच सेनानीपणा समाजकार्यात जपणारे सच्चे नागरिक म्हणजे अर्थात चित्रतपस्वी ‘राजदत्त.’
मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात एक कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. त्यावेळी सिनेसृष्टीतील योगदानासाठी अनेकांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर एकेक कलाकाराचे मनोगत सुरु झाले. सर्वात शेवटी व्यासपीठावरील एका वयस्कर व्यक्तीचा नंबर आला. ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. भाषेतील गोडवा आणि सहजसोपी वाक्ये बोलून व शुभेच्छा देऊन अवघ्या एक मिनिटांत त्यांनी माईक खाली ठेवला. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा जोरदार टाळ्यांचा वर्षाव झाला. त्या व्यक्तीला कळले होते, कार्यक्रमास खूप उशीर झाला आहे. जास्त भाषण लांबवण्यात मजा नाही. ही समज असणे म्हणजे ग्रेटच! कार्यक्रम संपल्यावर सगळे फोटो घेण्यात व्यस्त होते. विंगेच्या एका बाजूला मगाशी माईकवर मोजकं बोलणारी, ती व्यक्ती म्हणजे ते ‘अध्यक्ष’ शांतपणे उभे होते.
साधा नेहरू, पांढरी पॅन्ट आणि हाताला शबनम अशी ती साधीसुधी व्यक्ती. मी जाऊन त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी आदराने विचारपूस केली. मी त्यांना माझ्या लिहिलेल्या कथेबद्दल सांगितले. तेव्हा त्यांनी मला “घरी स्क्रिप्ट घेऊन ये, मग बोलू असे,” सांगितले. दुसर्या दिवशी मी त्या महान व्यक्तीच्या घरी पोहोचलो. ‘अत्यंत साधी राहणी, पण उच्च विचारसरणी’ असणारा हा मनुष्य. त्यांच्या घराचा संपूर्ण हॉल सन्मानचिन्हे, मानपत्रे व विविध छायाचित्रे यांनी भरून गेला होता. माझी नजर घरभर फिरायला लागली. त्यांनी मला पाणी आणून दिले. मी माझी स्क्रिप्ट त्यांच्या हातात दिली. त्यांनी त्या स्क्रिप्टला नमस्कार करून देवाजवळ ठेवली आणि वाचून झाली की, फोन करतो, असे बोलले. त्यावेळी मला माझ्याच स्क्रिप्टचा हेवा वाटायला लागला. एक एवढा मोठा माणूस असून त्यांचे पाय जमिनीवर आहेत, याची प्रचिती मला आली आणि आजही ते आपल्या कामाला दैवत मानतात हे पाहून भरून आले. तेव्हा मी त्यांना मनोमन दोन्ही हात जोडत नमस्कार केला. ते महान व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक ‘राजदत्त.’
आपल्याला परिचित असणारे राजदत्त चित्रपटसृष्टीत ‘दत्ताजी’ या नावाने ओळखले जातात. पण, त्यांचे पाळण्यातले नाव ‘दत्तात्रय.’ विदर्भातील धामणगाव या लहानशा गावात जन्मलेल्या दत्तात्रय अंबादास मायाळू यांच्या आईचे नाव प्रभावती. वडील अंबादास मायाळू रेल्वेत नोकरी करत असल्यामुळे लहानग्या दत्ताजींचे शालेय शिक्षण अनेक गावांतून पार पडले. पण, मॅट्रिक व त्यानंतरचे बी.कॉम पदवीपर्यंतचे शिक्षण मात्र वर्ध्यातील जी. एस. महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असतानाच त्यांनी नाटकांमधून आवड म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा पुढे आपण या क्षेत्रात आपली कारकिर्द घडवू, अशी पुसटशी कल्पनाही त्यांना आली नाही. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात ते जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात २ महिने १८ दिवस त्यांनी कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणापासून गणेशोत्सव, मेळा, शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रज यांच्या ‘दूरचे दिवे’, आचार्य अत्रे यांच्या ‘उद्याचा संसार’, ‘साष्टांग नमस्कार’मधील भूमिका चांगल्या झाल्या. विशेषतः ‘साष्टांग नमस्कर’ मधली कवीची भूमिका खूप छान जमली होती. शिवाय बाळ कोल्हटकरांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ मध्येही त्यांनी काम केले.
तरुण वयात नोकरीच्या शोधात दत्ताजी मद्रासला गेले होते. तिथे त्यांना ‘चांदोबा’ या मुलांच्या मासिकाच्या संपादकाची नोकरी मिळाली. राजा परांजपे यांना मद्रासच्या चित्रपटाची ‘ऑफर’ आल्यामुळे ते तिकडे गेले, तेव्हा मराठी समजणारा असिस्टंट हवा म्हणून त्यांनी दत्ताजींना ‘साहाय्यक दिग्दर्शक’ म्हणून घेतले. राजाभाऊंचा प्रभाव दत्ताजींच्या विषय निवडीपासून ते काम करण्याच्या पद्धतीवर पडलेला दिसतो. मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असताना त्यांच्या ओळखींमुळे इथल्या ‘एव्हीएम’च्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी त्यांचे नाते जोडले गेले. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे ‘बाप बेटे’ चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ १३ चित्रपटांसाठी राजाभाऊंचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम केले.
त्यात प्रामुख्याने ‘देवघर’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘आधी कळस मग पाया ’, ‘हा माझा मार्ग एकाला’, ‘पाठलाग’, ‘पडछाया’ इ. चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट ‘मधुचंद्र’ आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला; हिंदीत संगीतकार असलेले एन.दत्ता यांना मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायला लावले. पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही. अशावेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला ‘घरची राणी.’ राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १९६९ साली ‘अपराध’ चित्रपटाला पुन्हा एकदा ‘राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर सतत २८ चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यापैकी नऊ चित्रपटांना प्रथम, तीन चित्रपटांना द्वितीय, दोन चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण १४ पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले ‘राजदत्त’ हे एकमेव दिग्दर्शक आहेत.
त्यांचा संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा ‘देवकी नंदन गोपाला’ हा चित्रपट महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, तामिळनाडू मध्येही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही प्रदर्शित झाला. ‘ताश्कंद फेस्टिव्हल’मध्येही तो दाखवण्यात आला. ‘शापित’ चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी ‘इरिया’ हा हिंदी चित्रपटही केला. त्यात शर्मिला टागोर, मार्क जुबेर यांच्या भूमिका होत्या. चित्रपटाच्या बरोबरच दूरदर्शन मालिका आणि अनेक टेलिफिल्मचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.. ‘एक कहाणी’ ही हिंदी मालिका त्यातील ‘गोकुळ’ ही मधू मंगेश कर्णिक यांची कथा ही मालिका युनेस्कोच्या लायब्ररीत आहे. समाजातल्या प्रश्नांबाबत चर्चा करणारी ‘इन सर्च ऑफ सोल्युशन’ हीसुद्धा हिंदीतील मालिका. ही मालिका करण्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजदत्त यांना सांगितले होते . जनसामान्यात अतिशय लोकप्रिय झालेली मालिका ‘गोट्या’ या मालिकेला ‘रापा पुरस्कार’ मिळाला आहे.
राजदत्त यांच्यासारखा माणूस चित्रपटसृष्टीत असणे हेच मुळात आश्चर्य आहे. खादीचा अर्ध्या बाह्यांचा सदरा, धुवट धोतर, खांद्याला झोळी, दाढी वाढलेली अशा अवतारातील ही असामी शूटिंगच्या कुठल्यातरी कोपर्यात एखाद्या बाकड्यावर डोळे मिटून चिंतन करताना दिसायची. कधी फिल्मसिटीतल्या एखाद्या झाडाखाली दुपारची चक्क झोपलेली दिसायची. प्रत्यक्ष सेटवरही खूप हळू आवाजात बोलत सावकाश काम करताना दिसायची. शूटिंग सुरु असलेल्या चित्रपटाचे हे दिग्दर्शक आहेत, हे कुणाला सांगूनही खरे वाटले नसते. या माणसाचे दिग्दर्शकीय मोठेपण असे की, ज्या काळात मराठी चित्रपटांना घरघर लागली होती, वर्षातून दहा ते बारा चित्रपट कसेबसे बनायचे आणि मराठी चित्रपट हा अनेकांच्या थट्टेचा विषय व्हायचा, त्या काळात त्यांनी उत्तम चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टीची लाज राखली. ऐंशीचे दशक होते. ‘राघूमैना’, ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’, ‘देवकीनंदन गोपाला’, ‘माझं घर माझा संसार’, ‘हेच माझं माहेर’, ‘अरे संसार संसार’, ‘मुंबईचा फौजदार’ असे वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेअर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला. राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेली चित्रपट कथेबद्दलची विलक्षण समज. आपला मुद्दा ते शांतपणे, अनाग्रही राहत तरीही प्रभावीरीत्या समजून देतात. त्यांच्या साधेपणाचेही अनेकांवर दडपण येते. दुसरी त्यांची खासियत म्हणजे, सामाजिक प्रश्नांविषयी त्यांना असलेली कमालीची आस्था. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘संस्कार भारती’चे ते अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्या ठायी अभिनिवेश कधीच नसतो. ‘वनवासी कल्याण आश्रमशाळां’साठी ते ज्या तळमळीने फिरतात, मुलांमध्ये काम करतात ते पाहून चित्रपटक्षेत्र अधिक प्यारे आहे की समाजसेवा, असा प्रश्न पडतो. त्यांना ‘गदिमा पुरस्कार’ मिळणे म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पुरस्कार जाणे आहे. स्वामी चिन्मयानंद पुरस्कार, सुधीर फडके स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वरतीर्थ पुरस्कार’, ‘चित्रभूषण पुरस्कार’, ‘लोकमान्य टिळक व्याख्यानमाले’चा ‘तेजस पुरस्कार ’, महाराष्ट्र राज्याचा ‘जीवन गौरव पुरस्कार’, दूरदर्शन सह्याद्रीचा ‘चित्ररत्न पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी ’राजदत्त’ यांना सन्मानित करण्यात आले.
आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवनक्रम आचरणारे चित्रतपस्वी म्हणजे राजदत्त. तारुण्यात असताना मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि तोच सेनानीपणा समाजकार्यात जपणारे सच्चे नागरिक म्हणजे राजदत्त. याव्यतिरिक्त त्यांना स्वरतीर्थ, गदिमा, जनकवी पी. सावळाराम, झी मराठी वाहिनी व झी चोवीस तास जीवनगौरव, रामडवरी आदी पुरस्कारही मिळाले आहेत. राजदत्त यांना पत्नी दया यांची साथ लाभली, तर मोठी मुलगी श्रद्धा दूरदर्शनवर काम करत असून लहान मुलगी भक्ती मालिकांची व चित्रपटांची संकलक म्हणून काम करत आहेत. राहण्या-वागण्या-बोलण्यातील साधेपणा, समाजात घडणार्या व सामान्य माणूस म्हणून दुखवणार्या, तरी तारतम्य भावाने विचार करायला लावणार्या घटना सूक्ष्म निरीक्षणांद्वारे शोधणे, त्या घटनांना अभिव्यक्त करतील अशा कथानकांचा शोध घेणे, आपल्या दिग्दर्शीय दृष्टिकोनातून त्या लालित्यपूर्ण पण सामाजिक आशय संप्रेषित करणार्या बनवणे व त्या प्रेक्षकांसमोर ठेवणे अशी अनेक पातळीवरची कसरत राजदत्त यांनी आपल्या कारकिर्दीत सातत्याने व यशस्वीपणे केलेली आहे, अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा.
- आशिष निनगुरकर