मुंबई: मुंबईतील मोकळ्या जागा झोपड्या व उंच इमारतींनी व्यापलेल्या आहेत. मुंबईत आगीच्या नागरिकांना प्रसंगांना नेहमीच सामोरे जावे लागते. चिंचोळ्या गल्ल्या, अरुंद रस्ते यातून मार्ग काढण्यास अग्निशमन दलाला अनेक अडचणी येतात. त्यामुळे जलद गतीने आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने ‘फायर बाईक्स’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या २४ बाईक्स प्रायोगिक तत्त्वावर खरेदी केल्या जाणार आहेत. याआधी कोलकत्यातील कंपनीने एक बाईक मुंबई अग्निशमन दलाला वापरण्यासाठी दिली होती मागील दोन महिन्यांत या बाईकचा वापर केल्यानंतर तिचा आग विझवण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो, हे लक्षात आले. त्यामुळे या बाईक्स अग्निशमन दलाच्या ताफ्यात महत्त्वाच्या ठरणार असल्याने प्रशासनाने या बाईक्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्याधुनिक बाईक अग्निशमन दलाच्या गाडीप्रमाणे सायरन व लाईट असून बाईकसोबत 40 लीटर क्षमतेचे वॉटर टँकर आणि 20 मीटर लांबीचे पाईप व इलेक्ट्रिक सप्लाय कटिंग करण्यासाठीही सुविधा असणार आहे. अग्निशमन दलाकडे एखाद्या ठिकाणी आग लागल्याचा कॉल आल्यावर या ‘फायर बाईक्स’ पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचणार आहेत. आणि अगदी चिंचोळ्या गल्लीत लागलेली आग विझवण्यासाठीसुद्धा या ‘फायर बाईक्स’ मदतीसाठी धावणार आहेत.
शिवाय मुंबई अग्निशमन दलात एक रोबो याआधीच दाखल झाला होता आणि नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोबोचा वापरसुद्धा करण्यात आला. त्यामुळे आता अग्निशमन दलात आणखी दोन रोबो आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील एका रोबोची किंमत १ कोटी दहा लाख इतकी आहे.