निसर्गमित्र

    21-Feb-2025
Total Views | 254

Founder of Jividha Ngo Rajiv S. Pandit
 
समाजात विविध प्रकारची लोकोपयोगी कार्य करणारी खूप माणसं आहेत. मात्र, आज काळाची गरज ओळखून निसर्गाला आपले मित्र बनविणार्‍यांपैकी राजीव पंडित हे खासच! त्यांच्याविषयी...
 
पुण्यानजीकच्या ग्रामीण भागात बालपण आणि नंतर पुण्यात येऊन जैवविविधता, पर्यावरण आणि वृक्ष-जलसंवर्धनासाठी तसेच, निसर्गाशी मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे राजीव पंडित यांची वाटचाल ही सर्वांना अंतर्मुख होऊन चांगला विचार करायला लावणारी आहे. त्यांची ही कामगिरी पाहून नक्कीच आपल्याला भरभरून देणार्‍या निसर्गासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, यासाठी सर्व उद्युक्त होऊ यात शंका नाही.
 
राजीव पंडित यांचे लहानपण पुण्याजवळच्या औंध गावात गेले. नदी, शेतं, मैदाने, तिथले चतुर, फुलपाखरे, पक्षी आणि सापांच्याही सान्निध्यात ते काही काळ रमले. बारावीनंतर ‘इंडस्ट्रियल पदविका’ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना सातारा पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळाला. तिथे त्यांच्या चार मित्रांचा एक मस्त ग्रुप जमला. यावेळी मार्गदर्शनपर शिबिरे घेताना ट्रेकिंग करीत रायगड, राजगड, हरिश्चंद्रगड पाहिले.
 
सातार्‍याजवळचा वासोटा किल्ला, कोयना-कांदाट नद्यांच्या खोर्‍यातले घनदाट जंगल, तिथली अस्वले याबद्दल वाचनात आल्यावर राजीव यांच्या कुतूहलवृत्तीस बहर येत गेला. या जंगलातील अनुभव त्यांच्यासाठी खूपच भीतीदायक होता. त्यामुळे कधीही या जंगलात जायचे नाही, असा त्यांनी निश्चय केला. मात्र, या जंगलाने घातलेली मोहिनी इतकी प्रभावी होती की, ते पुन्हा पुन्हा तिथे जात राहिले. मित्र, शेखर नानजकरने कोयना अभयारण्यातले जंगल वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी कल्पना मांडली आणि मग दि. १५ ऑगस्ट १९८९ रोजी ‘वाईल्ड’ या संस्थेची स्थापना झाली.
 
या संस्थेच्या माध्यमातून पुढची सहा वर्षे ते वन्यजीव संरक्षण-संवर्धनाच्या अनेकविध कार्यांत सहभागी झाले. वन्यजीव प्रशिक्षण वर्ग, वन्यजीवांची माहिती देणारी प्रदर्शने आयोजित करणे, अवैधरित्या विक्री होत असणारे पक्षी, सरपटणारे प्राणी वाचवणे असे उपक्रम सुरू झाले. राजीव पंडित हे आता पुणे आणि जवळजवळ महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपर्‍यात निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय असणारे व्यक्ती म्हणून परिचित होत आहेत. सध्या ते पुण्यातील ‘जीविधा’ संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.
 
लोकशिक्षण व जनजागृतीच्या माध्यमातून भारतातील जैवविविधता संवर्धनार्थ प्रयत्नशील राहतानाच ते सस्तन प्राणी, भूविज्ञान व इकोलॉजी या विषयांचे अभ्यासक म्हणूनही ख्यात आहेत. विविध मराठी वर्तमानपत्रे, नियतकालिकांत त्यांचे विपुल लिखाण प्रसिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे ‘घराणी प्राण्यांची’ या पुस्तकाचे लेखन ‘महाराष्ट्रातील वन्य सस्तन प्राणी’, ‘निसर्गपूर्ण’ या पुस्तकांचे त्यांनी संकलनसुद्धा केले आहे. “माझे क्षेत्र केवळ वन्यजीव अथवा व्याघ्रप्रकल्प एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, निसर्गाचा मित्र बनविणे हे उद्दिष्ट आहे,” असे ते आवर्जून सांगतात.
 
‘देवराई फाऊंडेशन’चे रघुनाथ ढोले यांच्या सहकार्याने दरवर्षी हजारो रोपांचे मोफत वाटप केले जाते. “रघुनाथ ढोले ‘जीविधा’च्या ‘ओळख निसर्गाची’ या अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या बॅचला असताना ढोले यांच्याशी स्नेह जुळला. आमच्या वर्गाची बहुतांश व्याख्याने प्रकाश गोळे आणि प्रा. द. महाजन सरांनी घेतली. आज या क्षेत्रात मी जे काही काम करतो ते गोळे सरांमुळेच,” असे राजीव पंडित अभिमानाने सांगतात.
 
कान्हे फाटा येथील हायस्कूल, चाकणमधील हायस्कूल तसेच, तळेगाव परिसरातील तीन शाळांमध्ये त्यांनी निसर्ग मैत्री शिबिरे आयोजित केली आहेत.शिवाय, ‘स्कूल गार्डन’ ही संकल्पना त्यांनी वडगाव मावळ परिसरातील २८ शाळांच्या आवारात मुलांच्या मदतीने वनस्पती लागवड करून यशस्वीरित्या अमलात आणली. ‘वारसा मावळचा’ अंतर्गत त्यांनी परिसरातील शालाबाह्य युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी किल्ले, लेण्या व प्राचीन मंदिरांची माहिती दिली. यातून त्यांनी पूरक रोजगार व्यवसायाची क्षमता निर्माण केली.
 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ‘ग्रामकोश’ हा महत्त्वाचा उपक्रम त्यांनी यशस्वी केला. यात दहा ते १४ वयोगटातील मुलांनी आपल्या गावाची व परिसराची सर्वांगीण माहिती गोळा करायची, संकलित करायची व आपल्या भाषेत लिखाण करून पुस्तिका बनवायची, अशी संकल्पना होती. आठ खेडेगावातील मुलांकडून असा कोश तयार करून घेतला.
 
कायदेशीर लढाईत यश मिळविल्याचे उदाहरण देताना राजीव पंडित यांनी ‘देवराई फाऊंडेशन’, ‘निसर्गसेवक संस्था’ व ‘जीविधा’ने ताम्हिणी घाटातील सहा अनधिकृत बांधकामे तोडण्यात यश मिळविल्याचे नमूद केले. सामाजिक कार्य करताना २०१९ साली ‘कोरोना’ लॉकडाऊनच्या काळात ‘जीविधा’ व ‘नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थांनी समाजात आवाहन करून रक्कम जमा केली. त्या रकमेतून अनेक अभयारण्यांत ५२० गाईड व वनमजुरांना एक महिन्याला पुरेल, इतकी अन्नधान्याची मदत करण्यात आली.
 
प्लास्टिक व ई-कचरा संकलनातदेखील ‘जीविधा’चा पुढाकार असतो. त्यांनी प्लास्टिक व ई-कचरा संकलन ‘जीविधा’ कार्यालयात सुरू केले आहे. आपल्या सर्वांना विनंती की, आपल्या घरातील प्लास्टिकचा कचरा स्वच्छ करून ‘जीविधा’च्या कार्यालयात आणून द्यावा. आमच्याकडे जमा झालेला कचरा आठवड्यातील ठरावीक दिवशी जेजुरी येथील ‘रूद्र इनव्हायर्नमेंट सोल्युशन कंपनी’च्या ‘केशव सीता फाऊंडेशन’ तसेच, ‘पूर्णम इकोव्हिजन’ यासारख्या सामाजिक संस्थांना देण्यात येतो. या जमा झालेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो. त्यांच्या या कामगिरीची दखल अर्थात अनेक संस्थांनी घेतली आहे. ‘स्नेहालय संस्था’, अहिल्यानगर यांचा ‘कै. धनंजयराव गाडगीळ निसर्ग संवर्धन पुरस्कार’ व ‘ग्रीन आयडॉल’ पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी राजीव पंडित यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
अतुल तांदळीकर
 
 
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२१०१९३१३ )
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121