मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : "इमर्जन्सी" चित्रपटाची स्क्रिनिंग संपन्न
16-Jan-2025
Total Views | 72
मुंबई : आणीबाणी ही देशाच्या इतिहासातील एक काळी रात्र आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी बीकेसी येथे अभिनेत्री कंगना रणौत दिग्दर्शित 'इमर्जन्सी' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री मंगल प्रभात लोढा, इमर्जन्सी चित्रपटाची संपूर्ण टीम यांच्यासह इतर आमदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कंगनाजींनी अतिशय महत्वपूर्ण विषयावर हा चित्रपट तयार केल्याने मी त्यांचे आणि इमर्जंसी चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करतो. आपल्या सर्वांसाठी आणीबाणी हे एक असे पर्व होते ज्यात सर्वांचे मानवाधिकार समाप्त करण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात माझे वडील जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते. त्यावेळी मी केवळ पाच वर्षांचा होतो आणि आम्हाला त्यांना भेटण्यासाठी कोर्टात किंवा तुरुंगात जावे लागत होते. त्यामुळे माझ्यासाठी त्या आठवणी महत्वपूर्ण आहेत."
"कंगनाजींनी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आणीबाणीचे पर्व समोर आणले आहे. कंगना स्वत: या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्या कायम प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देतात. त्या एक अष्टपैलू अभिनेत्री आहेत."
...त्यावेळी इंदिरा गांधी आमच्यासाठी व्हिलन होत्या!
"इंदिरा गांधी तेव्हा देशाच्या नेत्या होत्या. परंतू, आमच्यासाठी त्या खलनायकच होत्या. प्रत्येक कालखंडाची एक वेगळी कहाणी असते. इंदिरा गांधींनीसुद्धा देशासाठी चांगले काम केले आहे. आणीबाणी ही आपल्या देशाच्या इतिहासातील एक काळी रात्र आहे, असे मला वाटते. त्यामुळे ती आपल्या देशातील लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्याला आपली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर जोपर्यंत आपण लोकशाहीवर आलेल्या संकटांना आपल्या येणाऱ्या पीढीपर्यंत पोहोचवणार नाहीत तोपर्यंत लोकशाहीची किंमत काय आहे ते त्यांना कळणार नाही. इमर्जंसी हा त्याच प्रकारचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो," असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्वांना इमर्जंसी चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले.