नवीन स्टार्ट अप धोरण देशातील आधुनिक धोरण ठरणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : सिडबी (SIDBI) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

    16-Jan-2025
Total Views | 62
 
Fadanvis
 
 
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation,Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीपकुमार डांगे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी, मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर यासह स्ट्राइड व्हेंचर्स आणि स्ट्राइडवनचे संस्थापक इशप्रीत सिंग गांधी, आयआयटीचे माजी विद्यार्थी कल्याण चक्रवर्ती, गो इंडिया च्या व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता, महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप या कार्यक्रमात उपस्थित होते.
 
याप्रसंगी सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांच्या तरतूदीचा सामंजस्य करार करण्यात आला. डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स आयटीआय गोवंडीचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्ट अप विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा ४७१ स्टार्टअप होते. आज देशात १ लाख ५७ हजार स्टार्टअप आहेत. महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६ हजार स्टार्टअप आहेत. आपण असे अभियान राबवित आहोत ज्यामध्ये महिला स्टार्टअपमध्ये सर्व पदांवर असतील. देशात जास्त महिला डायरेक्टर असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "उद्योजक, दूरदर्शी गुंतवणूकदार, धोरणकर्ते, इन्क्युबेटर्स, विद्यापीठे हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत. इज ऑफ डूईंग बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यात पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासनाबरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे. उद्योग सुरू करताना मुंबई पुणे मध्ये पोषक वातावरण आहे. मुंबई निधीमध्ये आघाडीवर असून पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र आहे. आपली टियर-२ आणि टियर-३ शहरे महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत. नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत."
 
नोकरी निर्माण करणारी विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स बनवणार!
 
"विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. ग्रामीण भागातील नवकल्पना असलेल्या तरुणांचा उद्योगात सहभाग वाढवणार असून उद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग, कायदेशीर साहाय्य इत्यादी सेवा देणाऱ्या इन्क्युबेटर्सना स्टार्टअप सुरू करण्यासाठी सहकार्य करणार. शासकीय आणि खाजगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बनवणार," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
एआय हे तंत्रज्ञानातील भविष्य!
 
"एआय स्टार्टअपचे सक्षमीकरण करून उत्कृष्ट तेचे केंद्र बनतील. एआय हे तंत्रज्ञानातील भविष्य आहे. ए आय तंत्रज्ञान हे स्टार्टअपसाठी मोठे योगदान देणारे ठरणार आहे. यामुळे केवळ उद्योगाच्या संधी नाही, तर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. राज्याला स्टार्टअपमध्ये आघाडीवर आणण्यासाठी राज्य शासनासोबत काम करा, असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले.
 
महाराष्ट्र स्टार्टअपची राजधानी बनणार!
 
यावेळी बोलताना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कौशल्य विकास विभागाला गती दिली आहे. राज्यातील स्टार्टअपला जगात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. जगात भारत देशाला एक नंबर बनवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सर्व स्टार्टअप देशाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील."
 
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक महिला स्टार्टअप!
 
नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर म्हणाल्या की, "महिलांनी उद्योगात आघाडीवर येण्यासाठी शासकीय नियमांचे कोणतेही अडथळे नाहीत. उद्योगांच्या अनेक संधी शासनामार्फत उपलब्ध आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याने महिलांचे सक्षमीकरण होत आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल असून त्याचा राज्यातील महिलांना नक्की लाभ घ्यावा. राज्यात सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले महाराष्ट्र हे राज्य आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121