यक्षयक्षिणी त्यांच्या साधकांना शक्यतो साहाय्यच करतात. यक्ष योनीतील जीव दीर्घजीवी असावे, असा लेखकाचा अंदाज आहे. कारण, लेखकाला जी यक्षिणी भेटली, ती आजपासून साधारणत: अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीची असावी. बोलणे न झाल्यामुळे तिची भाषा कोणती होती, हे समजायला मार्ग नव्हता. साधना सुरू केल्यावर, दुसर्याच दिवशी ती यक्षिणी समोरच्या वटवृक्षावरुन उतरली आणि लेखकासमोर उभी राहिली. अतिशय सुडौल, थोडे स्थूल, मजबूत शरीर, केतकीप्रमाणे तिचा गौरवर्ण होता. एक प्रकारचा सुवास तिच्या अंगाला येत होता.थोडा वेळ थांबून ती परत झाडावर जाऊन अदृश्य झाली. मला तिच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती. यक्षाचा अनुभव लेखकाला अजून आला नाही.
कूष्मांड
एकदा नदीवरुन घरी येत होतो. सायंकाळची वेळ होती. दुरुन नरकासारखा अतिशय घाणेरडा वास यायला लागला. एवढ्यात एका घळीतून, एक मोठा गोळा वळत माझ्याकडे आला. मी अतिशय घाबरलो. रामरक्षा सुरू झाली. काय चमत्कार! तो नरक, घाण मांसाचा गोळा मागे सरकू लागला आणि अदृश्य झाला. त्या गोळ्याला डोळा, तोंड होते असे वाटले. अंगावरील रोमांच घरी परत येईपर्यंत टिकले. कृष्मांडाचे दर्शन झाले. वेताळ अवस्थेचा कोणताच अनुभव स्वतंत्रपणे झाला नाही.
गंधर्व, अप्सरा
एकदा मध्यरात्री पलंगाच्या कोपर्यावर एक गंधर्व स्वर्गीय गाणे गात होता. हावभाव नाही की, ओढाताण नाही. लेखक स्वतः गायक असल्यामुळे त्याचे ते स्वर बराच काळ लेखकाच्या कानात घुमत होते. साधारणतः मालश्री रागासारखे ते स्वर वाटले. वीणा नसताना वीणावादन चालू होते. भाषा छंदास पण न समजणारी होती. तालावर सुंदर हेलकावे खात ते स्वर तरंगत होते. गंधर्वगान जसे सुंदर, तद्वत् त्याचे अस्तित्वच एकूण सुंदर, स्वर्गीय सुवासजन्य, कोमल आणि विभोर करणारे होते. मन उन्मन झाले. बराच वेळ भान हरपले होते. देहभानावर आल्यावर, ते रम्य स्वर्गीय स्वर अदृश्य झालेले दिसले. विशेष म्हणजे त्या स्वरांतून पंचमात्रात्मक प्रतीती येत होती. स्वरांना नाद तर होताच, पण स्पर्श, रस, गंध आणि स्वर्गीय रंग उमटत होते. तसा दिव्य अनुभव त्यानंतर आला नाही. गंधर्व अप्सरेचे दोनवेळा दर्शन घडले. बंगल्यामधील आवारात एक सुंदर स्वस्थ जोडपे, प्रणयाराधन करताना मला दिसले. मलाच संकोच वाटला. त्यांच्या अंगात हाडे नसावीत असे वाटले. अत्यंत कमनीय शरीर, गुलाबी कमळासारखा मऊ वर्ण, मऊ त्वचा, दृष्टीला त्या त्वचेचा स्पर्श, गंध व रसास्वाद येत होता. दिव्य सुगंधाने सारे वातावरण दरवळले होते. अंगाचा मखमली स्पर्श दुरुनच होत होता. अचानक सुंदर स्वरांच्या तारा झणाणल्या आणि ते दृश्य विरले.
गंधर्व योनी यक्ष योनीप्रमाणे भोगयोनी आहे. पण, यक्ष योनीच्या वरील उच्च योनी आहे. उच्च सत्कर्माची ती भोगयोनी असावी. सत्कर्मांचासुद्धा भोग भोगावाच लागतो. गायन, लेखन, सामाजिक कार्याचा अभिनिवेश, सत्कर्म वा धर्मकार्याचा अभिनिवेश, कलेचा दंभ, काव्याचा उन्माद इत्यादी कर्माचा भोग कोठे तरी भोगावा लागेल. हेच गीतेत म्हटले आहे.
गंधर्व लोकात म्हणजे गंधर्व अवस्थेत गेल्याशिवाय, साधकाला गंधर्व अप्सरा दर्शन होऊ शकत नाही. आपतत्त्व म्हणजेच एका अर्थाने गंधर्वलोक होय. आपतत्त्वात वस्तू पाण्यात कंपायमान होणार्या सावल्यांप्रमाणे दिसतात. या आपतत्त्वाची धारणा करणारे ते गंधर्व, तर आपतत्त्वातून सरणार्या त्या अप्सरा होत. आपतत्त्वाच्या साधनेद्वारे सिद्धी प्राप्त होत असतात. म्हणून, सिद्धींचे साकारदर्शन म्हणजे अप्सरा होत. तपस्व्याने अप्सरांच्या मोहात सापडू नये, असे म्हणतात. म्हणजेच, योग्याने सिद्धींच्या मागे लागू नये हा त्याचा अर्थ. देवता दर्शनाच्या अगोदर गंधर्व अप्सरा दर्शनाचा लाभ होतो. कारण, देवतादर्शनाच्या अती निकट आपतत्त्वातील ही दर्शन अनुभूती असते. ज्या धर्मांत मानवी दर्शनाचा विरोध दर्शविला आहे, अशा निराकार पंथातील साधकांना मानवी आकार जरी नाही दिसला, तरी तत्त्वदर्शनाची सर्व दृश्य व अनुभव अवश्य येतील. गंधर्व दर्शनाचे अवस्थेत, प्रत्येक साधकाला एक समयावच्छेदे करुन दिव्य स्पर्श, सुगंध, रस, वर्ण व आकार याचा अनुभव येईलच. निराकार अनुभवापेक्षा साकार अनुभव म्हणजेच, दर्शन अधिक सुखकारक व आनंदमय असते. पण, या दिव्य योनी असल्यामुळे त्यांचा अनुभव कोणत्यातरी रुपाने येईलच.
कारणदेहावस्था
कारणदेह वा कारणजगत इच्छेच्या पलीकडील विशाल दिव्य जीवन आहे. येथे इच्छा केवळ बीजरूपाने शिल्लक राहते. या अवस्थेत साधकाला, इच्छा करण्याची आवश्यकता राहात नाही. मन नावाची अवस्था येथे पूर्णांशाने नसते. म्हणून या कारण जगतात, बरी वा वाईट कर्मे नसतात. त्यामुळे या अवस्थेत साधक सापेक्ष भावाचे वर राहतो. ऋग्वेदीय नासदीय सुक्तांत याचे वर्णन आहे. ‘नासदासीन्नो सदासीत्तदानी.’ कारणदेह संबंधित जग प्रकाशमय म्हणजे ज्ञानमय असते. अज्ञान नावाची अवस्था येथे नाही. त्यामुळे येथे राग, लोभ, काम, क्रोध, मत्सर इत्यादी संस्कार फलांना मुळीच स्थान नाही. कारणदेहाला आकार किंवा वर्ण नसतो. ही एक स्पंदनात्मक अवस्था आहे. परंतु, या अवस्थेतील साधकाला सर्व अवस्थांचे ज्ञान आणि संकल्प असतो. कारण, देहावस्था वा कारण जगताचा संबंध, जडजगताशी अतिशय दुरान्वयाने म्हणजे जवळजवळ तुटल्यासारखाच असतो. म्हणून या जगतात वावरणारा जीवात्मा बंधनापासून मुक्त असतो. नासदीय सुक्तात या अवस्थेचे शब्दापलीकडील वर्णन आहे.
नासदासीन्नोसदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुहकस्य शर्मन्नम्भः किमासीत गहन गभीरम् ॥
कारण अवस्थेत स्थलकाल आणि वर्तमानसुद्धा नसते. परंतु, ही बद्ध अवस्थाच आहे. कारण, शरीरालासुद्धा मृत्यू असतो. परंतु, त्याचे कालमापन युगयुगापर्यंत असू शकते. या अवस्थेतील साधक पुनः जन्म घेऊ शकतो. गुरू गोविंदसिंगाचे असेच उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जन्माबद्दल लिहिलेल्या ‘विचित्र’नाटकात, स्वतःच्या जन्माचा कारणदेहापासूनचा इतिहास लिहिला आहे. ते वर्णन करतात, हेमकुष्ट पर्वत है जहाँ । सप्तशृंग शोभित है तहा ॥ तहँ हम अधिक तपस्या साधी। महाकाल कालीका अराधी ॥ तप साधत हरी मोही बुलायो। हम कहि के इहलोक पठायो । मै अपनासुत तेहिं निवाजा। पंथ प्रचुर करिबेको काजा ॥ तब मैं जगत जनम धरि आयो ।
योगिराज हरकरे