धारावी प्रकरणात फडणवीसांचे महत्त्वाचे वक्तव्य - "कायदेशीर कारवाईत अडथळा...!"
अनधिकृत बांधकाम संबंधित लोक स्वतः हटविणार; उपमुख्यंमत्री तथा देवेंद्र फडणवीस यांची माहिती
21-Sep-2024
Total Views | 35
मुंबई, दि.२१ : (Dharavi) "मुंबई महानगरपालिकेला लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे पुढील २-३ दिवसांत अनधिकृत बांधकाम संबंधित लोक स्वतः काढतील. हे आश्वासन मिळताच बीएमसीची टीम याठिकाणांहून निघाली. कोणत्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करून कोणीही अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही.", अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यंमत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत धारावीतील कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली.
"अनधिकृत बांधकाम हटविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत. मुंबई महानगरपालिकेने या पुढील अनधिकृत बांधकामेही काढून टाकण्याची कारवाई सुरु केली होती. मागील वेळेस असं सांगण्यात आलं होतं की, हे बांधकाम ईदनंतर काढण्यात येईल सांगण्यात आलं. आजही बीएमसीची टीम या ठिकाणी गेली होती. त्यावेळी या लोकांनी आम्ही हे बांधकाम स्वतः पुढील २ ते ३ दिवसात काढतो, हे आश्वासन मिळताच बीएमसीची टीम या ठिकाणाहून निघाली. कोणत्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करून कोणीही अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही. मला विश्वास आहे की, संबंधितांनी बीएमसीला लेखी आश्वासन दिलं त्यानुसार ते कारवाई करतील.
"प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण हे आंदोलन करताना कोणतीही हिंसा होणार नाही. दोन समाज गट एकमेकांसमोर येणार नाहीत, समाजासमाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता त्या त्या समाजाच्या नेत्यांनी आणि आंदोलनातील नेत्यांनी घ्यायला हवी," असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आणि ओबीसी आंदोलनातील नेत्यांना केले.