राजकीय प्रतिमा सावरण्यासाठी राजीनामा देणे ही स्टंटबाजी; भाजपचा केजरीवालांना टोला
भाजप गटनेते प्रविण दरेकरांची टीका
15-Sep-2024
Total Views | 20
मुंबई : "प्रतिमा मलीनतेतून सावरण्यासाठी राजीनामा देणे ही केवळ स्टंटबाजी आहे," अशी टीका भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केली आहे. भ्रष्टाचारामुळेच केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. आपली प्रतिमा जनतेच्या मनात मलिन झाली आहे. ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छित असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले कि, "उद्धव ठाकरे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत योजना कशी लागू करतात. त्याकरिता बजेट कसे करावे, सरकार कसे चालवावे हे ज्यांना समजले नाही. सरकार ज्यांना टिकवता आले नाही, स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्री हाताळता आले नाही, ते जनतेचे प्रश्न काय हाताळणार असे सांगताना 'मुंगेरीलाल के हसीन सपने' संजय राऊत बघताहेत तेच त्यांचे प्रमुख उद्धव ठाकरे बघताहेत," असा टोलाही दरेकरांनी लगावला.
"दरम्यान, सरकार महायुतीचेच येणार. त्यामुळे कुणीही अशा प्रकारच्या स्वप्नात राहू नये. स्वप्नात रममाण व्हायचे असेल तर त्यांना मोकळीक आहे. लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, सोयाबीन-कापूस निर्यातबाबत घेतलेला निर्णय असेल यामुळे जनमानस पूर्णपणे बदलला आहे," असेही त्यांनी सांगितले.
"५० वर्ष शरद पवार राजकारणात आहेत. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत, का पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. उलटपक्षी १९९४ साली जे १६ टक्के आरक्षण होते ते देऊन आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवली. राजकारणासाठी मराठा समाजाचा उपयोग करायचे. मराठा समाजासाठी त्यांनी कधीच भूमिका घेतलेली नाही. स्पष्टपणे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही एवढंही सांगण्याचे धाडस केले आहे," अशी टीका दरेकरांनी शरद पवारांवर केली.