मुंबई : मुख्यमंत्री पदाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांचे चुलते राज ठाकरे यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरळीत उमेदवार देईल, अशी घोषणा करीत राज यांनी आदित्यसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे विधानसभेला या मतदारसंघात सर्वाधिक चुरस पहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठेची दक्षिण मुंबईची जागा उबाठा गटाने राखली असली, तरी बालेकिल्ला असलेल्या वरळीत त्यांना मताधिक्य टिकवता आले नाही.
आदित्य ठाकरे यांना विधिमंडळ राजकारणात आणण्यासाठी २०१९ मध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा बळी देत, मागच्या दाराने विधानपरिषदेवर घेण्यात आले. त्यामुळे वरळीत एकूण तीन आमदारांचे बळ तयार झाले. लोकसभेला त्या बळाची प्रचिती येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात तसे घडले नाही.
वरळी विधानसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांना केवळ ६४ हजार ८४४ मते मिळाली. तर, शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी तब्बल ५८ हजार १२९ मते खेचली. दोघांमधील मतांचे अंतर हे केवळ ६ हजारांच्या आसपास असल्यामुळे उबाठा गटाने त्याचा मोठा धसका घेतला आहे. भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघाच्या जोरावर अरविंद सावंत विजयी झाले असले, तरी विधानसभेला वरळीत दगाफटका होण्याची भीती आहे.
मनसे मैदानात असल्यामुळे मराठी मतांचे विभाजन होईल. दुसरीकडे महायुतीचा उमेदवारही रिंगणात असेल. उबाठा गटातील एक मोठा नेता महायुतीच्या गळाला लागल्याच्या चर्चा आहेत. तो नेता मैदानात उतरल्यास चित्र बदलू शकेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परिणामी, आदित्यसाठी 'सेफ' केलेला मतदारसंघ एकाएकी 'अनसेफ' झाल्याने ठाकरेंच्या गोटात चलबिचलता वाढली आहे.
२००९ ची पुनरावृत्ती होणार?
२००९ चा अपवाद वगळता १९९० पासून वरळी विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांना ५२ हजार ३९८, तर शिवसेनेच्या आशिष चेंबूरकर यांना ४७ हजार १०४ मते मिळाली. त्यावेळेस मनसेच्या संजय जामदार यांनी तब्बल ३२ हजार ५४२ मते घेतल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. यंदा मनसे नेते संदीप देशपांडे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांना तिकिट मिळाल्यास २००९ ची पुनरावृत्ती होईल, अशी दाट शक्यता आहे.