वीरचंद राघव गांधी यांचे घर हा वारसा, तो नष्ट होऊ देणार नाही!
- मंत्री मंगल प्रभात लोढा; म्हाडाच्या कंत्राटदाराला घेतले फैलावर
23-Jun-2024
Total Views | 40
मुंबई : शिकागो येथील ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार राहिलेल्या दिवंगत वीरचंद राघव गांधी यांचे घर हा वारसा आहे. तो आम्ही नष्ट होऊ देणार नाही. हे आम्ही ठेकेदारालाही समजावून सांगितले असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
१८९३ साली शिकागो येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांच्यासह भारताकडून सहभागी झालेले दिवंगत वीरचंद राघव गांधी यांचे कुटुंब मुंबईतील चकला स्ट्रीट, मस्जिद बंदर येथे राहते. तेथे काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.
म्हाडाच्या कंत्राटदाराने तेथे पोहोचून घर दुरुस्त करण्याऐवजी पाडण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी तात्काळ मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी संपर्क साधून, या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार मंत्री लोढा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले, शिकागो येथील ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार राहिलेल्या दिवंगत वीरचंद राघव गांधी यांचे घर हा वारसा आहे. तो आम्ही नष्ट होऊ देणार नाही. हे आम्ही ठेकेदारालाही समजावून सांगितले आहे. मंत्रालयात या विषयावर म्हाडाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, वीरचंद राघव गांधी यांचा वारसा जपण्यासाठी आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी म्हाडा आणि समाजघटकांचे पूर्ण सहकार्य घेतले जाईल, असे आश्वासन मंत्री लोढा यांनी दिले.