पुणे : अंजली दमानिया जाणीवपुर्वक आमच्या पक्षाला आणि नेत्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधण्याची आवश्यकता आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी केला आहे. पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना उमेश पाटील म्हणाले की, "पुण्यातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यासंदर्भात योग्य दिशेने कारवाई होत आहे. या दुर्घटनेतील अपराध्यांना मदत करु पाहणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. ब्लड सँपलमध्ये फेरफार करणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाई करण्यात आली आहे. कायद्याच्या प्रक्रियेनुसार योग्य कारवाई होत आहे. जर यात कुणाचा हस्तक्षेप असता तर अशा पद्धतीची कारवाई होताना दिसली नसती."
"परंतू, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हादेखील एक अन्याय आहे. अंजली दमानिया यांचा बोलविता धनी कोण आहे, हे तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांची नार्को टेस्ट करण्याची आणि त्यांचेच कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची आवश्यकता आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रात गेल्या ८-१५ दिवसांत वेगवेगळ्या गंभीर स्वरुपाच्या घटना घडलेल्या आहेत. यात घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, डोंबिवली स्फोट, उजनीमध्ये पर्यटकांची बोट बुडाली अशा अनेक घटना घडल्या. या सगळ्या दुर्घटनांमध्ये अंजली दमानिया कुठेही संवेदनशील असल्याचं दिसत नाही. या दुर्घटनांच्या संदर्भात राज्य सरकार, पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि राज्याच्या प्रमुखाला प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार आहे. परंतू, जाणीवपूर्वक पुण्यातल्या अपघातप्रकरणी सुपारी घेऊन आमच्या पक्षाला आणि नेत्याला टार्गेट करण्याचा उद्योग काही नेत्यांनी चालवला आहे. त्यामुळे अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधण्याची गरज आहे," असेही ते म्हणाले.