‘नाईट लाईफ’चे आकर्षण व पाश्चात्त्य संस्कृतीचा आंधळेपणाने स्वीकारताना नकळत एक पिढी आज बिघडत आहे. पालक आपल्या पाल्यापुढे हतबल होताना दिसतात.
नुकतेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने, दारूच्या नशेत आपली गाडी भरधाव वेगाने चालवत एक तरुण व तरुणीला चिरडले. या मुलाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला व पुढे त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. वडिलांनाही अटक करण्यात आली. मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अनेक पालक अस्वस्थ झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकांच्या नेमक्या जबाबदार्या काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात रेंगाळू लागला आहे.संताप, राग, दुःख, आक्रोश, भीती यांसह, अल्पवयीन मुलांमधील वाढती व्यसनाधीनता, नाईट लाईफ/कल्चर, अनधिकृत पब्ज व हॉटेल्स वीकेंड सेलिब्रेशनच्या संकल्पना, श्रीमंतीचा माज, बेपर्वाई, हलगर्जीपणा, भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, विविध यंत्रणांचा दूषित कारभार व पालकांच्या भूमिका व जबाबदार्या या विषयांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुख्य म्हणजे, अल्पवयीन मुले जेव्हा एखाद्या गुन्ह्यात अडकतात, तेव्हा पालकही त्या गुन्ह्यांत आरोपी म्हणून शिक्षेस पात्र ठरतात; याचे गांभीर्य पालकांना या घटनेनंतर जाणवू लागले आहे, हे विशेष. या घटनेच्या निमित्ताने हादरलेल्या पालकांनी काही विचार, कृती, स्वतःच्या वर्तनात/वृत्तीत दुरुस्त्या व कुटुंब म्हणून काही निर्णय घेण्याच्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. आपल्या कुटुंबात मुख्यत्वे आपल्या मुलांसह; या घटनेबाबत गांभीर्याने चर्चा करणे, कुटुंब म्हणून आपल्या पाल्यांकरिता काही दीर्घकालीन व कठोर निर्णयांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे, जे सगळे अनैतिक, बेकायदेशीर व मूल्यविरहित असते, त्या मार्गी जायचे नसते व त्यात तडजोडीही करायच्या नसतात; याचे भान मुलांच्या मनात पेरण्याकरिता त्यांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.
अडनिड्या वयातील मुलांच्या मनावर सोशल मीडियाचा होणारा परिणामही अनेक प्रश्न उभे करीत आहे. यातून मुलांमधील नको ते धाडस वाढीस लागत आहे. हिंसा, व्यसने, लैंगिक शोषण, गुंडगिरी, शस्त्रे बाळगणे या सगळ्या गोष्टी आज अल्पवयीन मुलांकडून घडताना दिसतात. याला कोणताही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थितीतील कुटुंबांचा अपवाद नाही. या सगळ्यातून मुलांची पावले सहज गुन्हेगारी (वृत्ती) विश्वाकडे वळतात. त्यामुळे मुलांना चांगली संगत, शिक्षण, छंद, करमणुकीची साधने, कौटुंबिक व सामाजिक कार्यातील सहभाग, नवीन विषयांची ओळख व चांगला दिनक्रम (झोपेची, उठायची, व्यायामाची, जेवणाची वेळ, इ) या सगळ्यात पालकांचे लक्ष हवे. आपला मेंदू हा जे शिकवू, ते शिकतो. त्यामुळे पालकांनी नेमके मुलांना काय शिकवायचे (अगदी लहान वयापासून), यावर काम करीत राहणे महत्त्वाचे असते.
चारित्र्यसंपन्न व मूल्याधिष्ठीत आयुष्याकरिता आपल्या दैनंदिन जीवनात संयम, शिस्त व मूल्ये ही हवीच. मुळात पालकांच्या दैनंदिन जीवन व्यवहारात या गोष्टी नसतील, तर अनेक प्रश्न हे मुलांपासून सुरू होऊन, संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य बाधित करतात. आपल्या पाल्याच्या सामाजिक, भावनिक, मानसिक, सांस्कृतिक व बौद्धिक जडणघडणीत पालकांचा सहभाग हा हवाच. भावभावनांचे व्यवस्थापन व प्रकटीकरणाची कौशल्ये पालकांनी आपल्या दैनंदिन कृतीतून मुलांना शिकवायची असतात, तरच आपली मुले आयुष्याचा हा वस्तुपाठ नेमकेपणाने शिकतात व तसे वागतातही.आपल्या मुलांचे यश हे नक्कीच ‘सेलिब्रेट’ करायचे असते; मात्र ‘सेलिब्रेशन’चे स्वरूप हे नैतिकतेच्या सीमा ओलांडता कामा नाहीत, याचे भान पालकांना व पालकांनी मुलांना देणे आवश्यक असते. मुलांना प्रमाणाबाहेर स्वातंत्र्य दिल्यास, नेमके काय घडते; हे आज अनेक पालकांना या घटनेच्या निमित्ताने कळले आहे. ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसते’ हे आपल्या मुलांना वयाच्या विविध टप्प्यांवर समजावून सांगणे पालकांचे कर्तव्य असते.
पूर्वी ’अंधाराच्या आत घरात’ किंवा ‘कामाशिवाय बाहेर न जाणे’ हे वळण कुटुंबातील सर्वांना लागू असे. मुख्य म्हणजे, कुटुंबाच्या सामाजिक नीतिमत्तेचा तो एक निकष असे. मृत्युमुखी पडलेली मुले व या गुन्ह्यात अडकलेल्या सगळ्याच मुलांच्या कुटुंबातून नेमके हे सूत्र शिकवायचे राहून गेले का? समाज बदलत असला; तरी ही सभ्य व सुसंस्कृत कुटुंबांची व्याख्या आपल्या सोयीनुसार बदलून चालणार नाही, हेच या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही मुद्द्यांचा विचार पालकांनी करणे आवश्यक आहे.
१. हल्ली अगदी लहान वयात मुलांना व्यसनांची सवय लागतेय. ‘सेलिब्रेशन’ म्हणून अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात दारू व तत्सम व्यसने केली जातात. यानिमित्ताने मुलांची व्यसनांशी सहज मैत्री होते. ही सहजता अशा घटनांमध्ये रूपांतरित होते. खरंच व्यसनांची ओळख करून देणे गरजेचे आहे का? ‘सोशल स्टेटस’ म्हणून व्यसनांपेक्षा अनेक चांगल्या गोष्टी मुलांना शिकविता येऊ शकतात, नाही का?
२. हल्ली मुलांचे वयात येण्याचे वय खूप कमी झाले आहे. त्यातून वाढीस लागणारे विरुद्धलिंगी आकर्षण, कुसंगती, गुन्हेगारी प्रवृत्ती विकसित होणे, मुलांचे लैंगिक आयुष्यही खूप लहान वयात सुरू होताना दिसते. पालकांच्या दुर्लक्षातून अल्पवयीन मुलांकडून गुन्ह्याच्या घटना घडतात. आज सोशल मीडियावर उपलब्ध अर्धवट दिशाभूल करणारी माहिती व विविध प्लॉटफॉर्मवर उपलब्ध सिनेमांमुळे, मुलांचे नेमके रोल मॉडेल कोण, हे लक्षात येते. मुलांच्या ‘स्क्रीन टाईम’वर ही पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आज मुलांकडे माहितीचे भांडार आहे, पण त्या माहितीचे विश्लेषण करण्याचा अनुभव अथवा ती प्रगल्भता मुलांकडे नाही.
३. मुलांच्या मजेच्या कल्पना या देखील वारंवार तपासणे व त्यातील अवास्तव व अनैतिक कल्पनांना पूर्णविराम देणे आवश्यक असते. काळ बदलत असताना मुलांना स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी शिकविणे, हे पालकांचे आद्यकर्तव्य आहे. मुलांना वेळ देणे, त्यांच्याशी रोज संवाद साधणे, त्यांच्या जगण्याच्या नेमक्या कल्पना समजून घेणे, त्यांच्या इच्छा, अपेक्षा, गरजा स्वप्न समजून घेणे व गरजेप्रमाणे ते दुरुस्त (वास्तविक) ही करणे, त्यांचा मित्र परिवार, स्वभाव, एखाद्या गोष्टीत धाडस करण्याची कुवत/वृत्ती हे देखील तपासणे पालकांचे काम असते. आपले मूल वाममार्गी लागणे असो अथवा त्याच्या हातून गैरकृत्य घडणे असो, या दोन्ही गोष्टी पालकांचे व मुलांचे भावविश्व व भविष्य उद्ध्वस्त करण्यास पुरेसे असते.
४. मुलांनी आपल्या आयुष्यात गंभीर चुका-गुन्हे करू नयेत, याकरिता कुटुंबातून प्रतिबंधनात्मक काम पालकांनी करायचे असते. आपल्या मुलांची विचार करण्याची पद्धती, स्वभाव दोष, वर्तणूक दोष, याकडे दुर्लक्ष करू नये. मुलांना आयुष्य जगताना पाळायचे संकेत, समाजभान व नियम (कायदे) त्या-त्या वयानुसार समजावून सांगा. मुलांची गरज जाणून समुपदेशक, डॉक्टरांकडे नक्की न्या. मुलांच्या वाढीत प्रतिबंधनात्मक कार्याचे विशेष महत्त्व असते.
५. दैनंदिन जीवनातील मूल्ये-व्यवहार याबाबत पालकांनी जागरूक असावे. खोटे बोलू नये, चोर्या करू नये, फसवणूक करू नये, अनैतिक वागू नये, कायद्याचे उल्लंघन करू नये. या गोष्टी प्रत्येक कुटुंबात शिकविल्या जातात. मात्र, ज्या पालकांचा या गोष्टी कृतीत आणताना तोल जातो; तेथे मुले संभ्रमित होतात व त्यांचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरू होतो. दैनंदिन जीवनातील मूल्ये ही सात्त्विक व शांत आयुष्य जगण्यास बळ देणारी असतात.
६. श्रीमंतीचा देखावा करणे म्हणजेच आयुष्य आहे, असे मानणार्या पालकांची संख्या आज गतीने वाढत आहे. ‘मी, माझे, मला’ या शब्दांचा अर्थ थेट कुटुंबातील सदस्यांमध्येे वाढीस लागलेली स्वकेंद्रित व भोगवादी वृत्तीचे दर्शन घडविते. दुसर्याचा विचार, कृतज्ञता व सहानुभूती हे शब्द आज कौटुंबिक संवाद व नात्यांमधून हरवले आहेत. अनेकदा श्रीमंतीचा देखावा अथवा ’मी श्रीमंत आहे’ हे दाखविण्याच्या स्पर्धेत अनेक पालकही रमलेले दिसतात. त्यामुळे मुलांमध्येही या स्पर्धेची बीजे नकळतपणे पेरली जातात. आपल्या मुलांना खर्या श्रीमंतीचे निकष सांगा. चांगली व पारदर्शक नाती, सकस मैत्री, आत्मसन्मान व आत्मनिर्भरता या गोष्टींमधील श्रीमंती समजावून सांगा.
७. आपली कुटुंब संस्था ही अत्यंत सक्षम व प्रत्येक सदस्याला फुलण्यास, बहरण्यास व नात्यांच्या ओलाव्यात रमण्यास ‘स्पेस’ देणारी संस्था आहे. मात्र, या संस्थेवर आक्रमण करणारे चुकीचे विमर्श आज एक मोठे आव्हान उभे करीत आहेत. चुकीच्या विमर्शांना दाराबाहेर ठेवण्याचे कसब, आज प्रत्येक कुटुंबाने शिकणे आवश्यक आहे.
८. मध्यमवर्गीय असोत किंवा उच्च मध्यमवर्गीय असोत, अशा घटनांना सामोरे जाण्याची वेळ आली, तर अनेक अंगाने कुटुंबाचे नुकसान होते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
९. सृजनता व कल्पकता वाढीस लागेल, अशा उपक्रमांची ओळख मुलांना करून द्या.
१०. आपल्या मुलांच्या सवयी, त्यांची दैनंदिन देहबोली, संवाद व दिनक्रमाकडे डोळसपणे लक्ष द्या.
स्मिता कुलकर्णी
(लेखिका प्रांत कुटुंब प्रबोधन मंडळ सदस्य (अध्ययन व संशोधन आयामप्रमुख) आहेत.