यशस्वी पालकत्व

    08-Apr-2024
Total Views | 88
Parenthood
 
काळ बदलला आहे, बदलत्या काळाबरोबर जीवनातील अनेक क्षेत्रात बदल होत आहेत. तसेच ते पालकत्वाच्या बाबतीत देखील झाले आहेत. आज धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या पाल्याकडे आणि पालक म्हणून स्वत:कडे हवे तसे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे बरेचदा माहित असलेल्या पद्धतीने पालक अपत्याचे संगोपन करतात. यात काहीही वावगे नसले, तरी हल्लीची पिढी बदलल्याने त्यांच्या समस्या काय हे जाणून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. पाल्याच्या नेमक्या गरजा ओळखून, त्याची ताकद होण्यासाठी काय करावे याचा या लेखातून घेतलेला आढावा....

मुलांचे संगोपन करणे ही एक कला आहे. आज आपल्याला आपले बालपण आठवते, आपले आई-वडील आठवतात. आपल्या मुलांचे संगोपन करताना जेव्हा आपण आपले बालपण आठवतो, तेव्हा एक पिढीचा व सुमारे २५ ते ३० वर्षांचा काळ लोटलेला असतो. पूर्वी तीन-चार भावंडं असायची व ती एकमेकांच्या सोबतीने मोठी व्हायची. घरची गरिबी जरी असली तरी, सर्व कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आई-वडिलांबद्दल आदर होता. त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिले जायचे. वडिलांबद्दल भीतीयुक्त आदर होता. कुटुंबाचे वातावरण जर चांगले असेल, तर अशा मुलांचे व्यक्तिमत्व खुलून येते. ते ज्या क्षेत्रात जातात तेथे यशस्वी होतात आणि अग्रेसर होतात.गेल्या पिढीतील पालकत्व व आजच्या पिढीतील पालकत्व यात फरक पडला आहे. मुलांची संख्या एक किंवा दोन वर आली आहे. टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप यामुळे या मुलांना सर्व गोष्टी लवकर कळू लागल्या आहेत. आर्थिक सुबत्ता जरी वाढली असली तरी स्पर्धाही वाढली आहे. शिक्षण अधिक खर्चिक झाले आहे. रोजगार निर्मिती कमी होत चालली आहे. आज अनेक मुलांचे आई-वडील नोकरीनिमित्त घराबाहेर जातात.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे यातील बर्‍याचशा मुलांना पाळणा घरात ठेवले जाते. इच्छा असूनही पालक आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा काचेच्या वस्तूंच्या बॉक्सवर जसे लिहिलेले असते ‘हॅन्डल विथ केअर’, पालकत्वदेखील असेच असते. आपल्या पाल्यांना वेगवेगळ्या वयात काळजीपूर्वक हाताळावे लागते. एक भावनिक नाते त्याच्याशी जोडले जावे, अशी अपेक्षा असते.बाळाचे आगमन : गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेणे, गरोदरपण हे तणावमुक्त असावे. बाळंतपणासाठी नाव चांगल्या हॉस्पिटलमध्ये टाकावे. अंगावर स्तनपान, डिलीवरीनंतर लवकरात लवकर सुरू करावे व ते पुढे काही महिने चालू ठेवावे. सुरुवातीस काही आठवडे बाळास फक्त मातेच्या दुधावर ठेवावे. बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ होताना बघणे हे पालकांना वेगळाच आनंद देऊन जाते. बाळाचे लसीकरण व्यवस्थित पूर्ण करणे. त्यात आर्थिक कारणाने हयगय करू नये.शालेय जीवन : हल्ली शाळेतील प्रवेशाचे वय कमी कमी होऊ लागले आहे. ’प्ले ग्रुप’च्या नावाखाली वयाच्या दोन वर्षांनंतर त्याला शाळेत धाडले जाते. इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई बोर्ड, कॉन्व्हेंट स्कूल अशा महागड्या शाळांची निवड केली जाते.


आपले प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले म्हणून आपल्या पाल्याचे शिक्षण चांगल्यात चांगल्या शाळेत व्हावे, अशी पालकांची इच्छा असते. पुढे प्राथमिक शाळेसाठी वर्षाकाठी लाखभर रुपये फी देण्यास ते तयार असतात. मराठी माध्यमात मुलांना घालणे किंवा महानगरपालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यमात टाकणे हे त्यांना कमीपणाचे वाटते. चुकीची निवड व पाल्यांवर दडपण टाकणे यामुळे आयुष्यास वेगळे वळण लागू शकते. या वयात खर्चिक शाळेपेक्षा भावनिक नाते जास्त महत्त्वाचे असते. वैवाहिक जीवन हे सुखकारक असावे. आपल्या वाईट सवयी, आपल्यातील भांडणे हे लहान मूल मूकपणे बघत असते व त्यातून त्याचा स्वभाव घडतो. तणावाखाली वाढणारे मूल भित्रे राहते व पुढील स्पर्धात्मक जीवनात ते मागे पडते.शाळा निवडीतील चूक मुलाला आयुष्यभर त्रास देऊ शकते. शालेय वयात शक्य असल्यास मुलाचा अभ्यास स्वत: घ्यावा. महागडी शिकवणी व क्लासची सवय सहसा लावू नये. मुलांची कुवत पाहून त्याच्याकडून अपेक्षा धरावी. अभ्यासतल्या मागासलेपणास अनेक कारणे असू शकतात. आपले मूल हे सर्व गुणदोषासकट स्वीकारावे हे सर्वांत उत्तम. मुलाला परीक्षेत अपयश आल्यास त्याबद्दल सहानुभूती दाखवावी, त्याला धीर द्यावा. अपयश पचवूनच तो पुढे यशाचे शिखर गाठेल.

पौगंडावस्थेतील समस्या : पौगंडावस्थेत मुलांमध्ये व मुलीमध्ये अनेक शारीरिक बदल होतात. शरीरातील संप्रेरकामुळे मानसिकबद्दलदेखील घडतात. या काळात अपालकाचे पाल्याशी चांगले भावनिक नाते असल्यास या अवस्थेचा त्रास होत नाही. या पिढीसाठी अनेक प्रलोभने आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामचा प्रभाव, फेसबुकवरील मैत्री, या सर्वांतून चुकीचा मार्ग अवलंबिला जाण्याची शक्यता असते. आपल्या पाल्याचे असणारे मित्र-मैत्रिणी यांच्याशी संपर्क असावा. आपला पाल्य कुसंगतीत तर नाही ना याविषयी पालकांनी सतर्क राहावे.सेकंडरी शाळेतील मुलांमध्ये व्यसनाधिनता वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. सिग्रेट, मावा, तंबाखू ही व्यसने सेकंडरी शाळेच्या मुलांमध्ये आढळतात. त्याचप्रमाणे अफू, गांजा, म्याव-म्याव, एसएसडी यासारख्या ड्रग्जचे सेवनही शालेय वयात दिसू लागले आहे. ४० वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अशा अनेक मुलांवर उपचार करण्याची व त्यांना समुपदेशन करण्याची मला संधी मिळाली. अशा मुलांबद्दल सहानभुतीने उपचार केल्यास ही मुले पुढे आयुष्यात चांगले नाव कमवू शकतात.पौगडावस्थेत मुला-मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण असणे नैसर्गिक आहे. पण त्याला मर्यादा असाव्या. सध्या आपण शालेय जीवनातल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बघतो. काळ बदललेला आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना दिसतो.
 
अमेरिकेतील पौगंडावस्था : अमेरिकेत शालेय शिक्षण मोफत आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मुले व मुली आपल्या पालकांचे घर सोडतात व स्वतंत्र राहू लागतात. पुढील शिक्षण ते आपल्या कमाईतून करतात. या काळात अनेक विद्यार्थी लिव्ह इन रिलेशनमध्ये आढळतात. विशीच्या आतच यातील काही मुले लग्न करतात. मुलपण त्यांना कमी वयात होतात. २५ ते ३० वयाचे होईपर्यंत त्यांच्यातील बर्‍याच जणांचा घटस्फोटही झालेला असतो. या जीवनपद्धतीचे अनेक तोटे आहे. मुक्त जीवनपद्धती असल्यामुळे अनेक वाईट सवयी लागू शकतात. दारु, तंबाखू, अफू, गांजा ही व्यसने तरुण पिढीत जास्त दिसतात. यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होताना आपल्या देशात दिसू लागले आहे. हे घातक आहे व पालकांनी याबाबत सतर्क राहावे.लिव्ह इन रिलेशन हा न पटणारा प्रकार आहे. लग्न संस्थाच यामुळे धोक्यात येऊ शकते. नुकतेच अयोध्येत प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा झाली. एक वचनी, एक पत्नीत्व राखणारे प्रभू रामचंद्र हे भारतीयांसाठी आदर्श पुरुष आहेत, अशी आध्यात्मिक परंपरा असलेल्या भारतीयांनी पाश्चात्य देशातील संस्कृतीचे अंधानुकरण करू नये.

‘सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस’(एसटीडी) : अनेक सेक्स पार्टनर असणार्‍या तरुणाईला या रोगाचा धोका जास्त आहे. एड्स आणि इतर गुप्तरोग यांचे प्रमाण तरुण पिढीत वाढू लागले आहे. एका १८ वर्षांच्या मुलाचा एड्सने झालेला मृत्यू पाहिला. त्या मुलाला एड्सची लागण कितव्या वर्षात झाली असेल? पुढे या आजारामुळे त्याचे आयुष्य अकाली संपले ही खरोखरीच शोकांतिका आहे.हे सर्व आसपास अस्तित्वात असले तरी परिस्थिती अगदीच निराशाजनक नाही. यशस्वी पालकत्वासाठी पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मुले आपल्याकडे आदर्श म्हणून पाहतात. आपले वागणे, बोलणे मुलांशी भावनिक जवळीक करणारे असावे. वडिलांची व्यसनाधिनता पुढे मुलांमध्ये आढळून येते.

यशस्वी पालकत्वासाठी काही सूचना

१) आपल्या पाल्याला वेळ द्या : आई-वडील दोघेही नोकरीला असले तरी घरी थोडा वेळ आपल्या मुलासोबत घालवावा. शक्य असल्यास सर्वांनी जेवण एकत्र घ्यावे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यात आई-वडिलांनी कमी वेळ घालवावा म्हणजे त्यांना आपल्या पाल्याशी संवाद साधता येईल. सकाळी लवकर उठणे, थोडा व्यायाम स्वत: करणे व आपल्या पाल्यासदेखील थोडासा व्यायाम करायला लावणे. सूर्यनमस्कार हा सर्वांत उत्तम व्यायाम प्रकार आहे. नियमित केल्यास याचे फायदे आयुष्यभर मिळतात. सूर्यनमस्कार करण्याचे वय आठ वर्षे ते ८० वर्षे आहे. आपल्या शिक्षकांमार्फत सूर्यनमस्कार व्यवस्थित शिकून घेणे.
 
२) कुठलीही अपेक्षा न बाळगता आपल्या मुलावर प्रेम करा. प्रत्येक मुल हुशार असतेच असे नाही. काहींचा कल खेळाकडे व कलेकडे असतो. अशा मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावी. त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे. खेळाचे चांगले मार्गदर्शक उपलब्ध असतील, तर त्यांचा अवश्य लाभ घ्यावा. प्रत्येकजण सचिन तेंडुलकर होणार नाही पण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणे काय चुकीचे आहे?

३) शारीरिक खेळांकडे व मैदानी खेळांना प्रोत्साहन द्यावे : हल्लीची पिढी ही संगणक पिढी आहे. मैदानात जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. मोबाईलचा मर्यादित वापर जरुर करावा पण त्याच्या आहारी जाऊ नये.
४) गुरुजनांचा आदर : आपल्या पाल्यांना शिक्षकांचा आदर करण्यास शिकवावे. शिक्षकांवर टीका करणे, त्यांची चेष्टा करणे या गोष्टी पालकांनी टाळाव्या. आपल्या यशामध्ये गुरूंचे मार्गदर्शन व त्यांचा आशीर्वाद यांचा मोठा वाटा असतो.

५) आपल्या मुलासाठी सर्व सुखसोयी उपलब्ध करा - काही प्रमाणात त्यांचा गैरवापर होईल हे गृहीत धरुन चला.

६) शालेय जीवनापासूनच त्यांच्यावर छोट्या छोट्या जबाबदार्‍या देण्यास सुरुवात करणे. बाजारहाट करणे, वह्या पुस्तकांची निगा राखणे, शालेय साहित्य सर्व एका ठिकाणी ठेवणे, गृहपाठ नियमित करणे या गोष्टींची त्यास सवय लावावी.

७) सुट्टीमध्ये मुलाला सहलीसाठी घेऊन जा. नातेवाईकांच्या घरी घेऊन जा. त्यांना वेगवेगळ्या लोकांना भेटू द्या. स्पर्धेत भाग घेण्याची सवय लावावी.
 
८) स्वत:ची कामे स्वत: करण्याची त्यांना सवय लावावी. शाळेतील मुलांना त्यांचे पालक जेवण भरवताना दिसतात, अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात.

९) चुकीला क्षमा करणे : एखादी चूक झाल्यास शिक्षा करणे हा त्यावरील उपाय नाही. त्याला समजून घेणे व पुढील मार्गदर्शन करणे. अपयश आल्यास धीर देणे व त्यातून मार्ग काढणे.

१०) मुलांचे कौतुक करणे : आपल्या बालपणाची तुलना मुलाच्या बालपणाशी करू नये. काळ बदलला आहे. थोडे आपणास बदलावे लागले, तर थोडेफार बदल मुलांमध्ये होतील. अभ्यासातील यशाबोरबरच कला, खेळ या क्षेत्रातील यशाचेदेखील कौतुक करावे. चारचौघात मुलांचा अपमान करण्याचे टाळावे.

या काही सूचना येथे दिल्या आहेत. आपल्या कौटुंबिक वातावरणाप्रमाणे यात थोडाफार बदल करावा. पालकत्व म्हणजे त्याग - आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी त्याग केला होता, म्हणून आपण आयुष्यात यशस्वी झालो. या त्यागाची परतफेड आपण करू शकलो नाही. कारण, आज आई वडील हयात नाहीत. आपल्या पाल्याचे जीवन यशस्वी करून या ऋणाची परतफेड करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पाल्याच्या यशात देवाचा आशीर्वाद आहे, देवाचे आभार मानण्यास विसरू नका. आपणास यशस्वी पालकत्वासाठी शुभेच्छा!

डॉ.मिलिंद शेजवळ



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121