मुंबई, दि.२२ :मालाड पश्चिमेला इन्फिनिटी मॉलच्या मागील बाजूस असलेल्या लगुन रोड ते मालवणी दरम्यान उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. याची पायाभरणी लोकसभा निवडणुकीनंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे लिंक रोड चिंचोली बंदर ते काच पाडा, मीठचौकी नाक्यापर्यंतची वाहतूक कोंडी टळणार आहे.
मुंबई शहर व उपनगरातील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने नवीन रस्त्यांसह दोन भाग एकमेकाला जोडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळही वाचला असून वाहतूक कोंडीतूनही त्यांना काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे. सध्या अंधेरी ते बोरिवलीपर्यंत जाणाऱ्या स्वामी विवेकानंद मार्गावर (एस. व्ही. रोड) मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक अंधेरी डी. एन. नगर येथून गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मालवणी आदी भागात जाण्यासाठी लिंक रोडचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यात या रस्त्याच्या मधोमध मेट्रो मार्ग असल्यामुळे रस्त्याची रुंदी ही कमी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अजूनच वाढ झाली आहे.
लिंक रोडवर चिंचोली बंदर ते काचपडा नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळे गोरेगाव ते मालवणी जाण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने इन्फिनिटी मॉलच्या हॉलच्या मागून जाणाऱ्या लगून रोड ते मालवणी दरम्यान उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ व इंधन वाचणार असून वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे. या पुलासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मीठ चौकी उड्डाणपुलाचे कामही ५० टक्के पूर्ण
लिंक रोडवर मीठ चौकी जंक्शनवर उड्डाणपूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर येथील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचा दावा पालिकेच्या पूल विभागाने केला आहे.