मुंबई : पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणाचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत कुर्ला येथे 'घे भरारी' संस्थेकडून या प्रकरणाविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. 'घे भरारी' संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा भालेराव यांच्या नेतृत्वात कुर्ला टर्मिन्स बाहेर संदेश खाली प्रकरणाविरोधात आंदोलन करण्यात आले आहे.
विक्रोळीतील एकूण मंडळांनी एकत्र येत हे आंदोलन केले आहे. दै. मुंबई तरुण भारतच्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. तृणमूल काँग्रेसच्या शाहजहान शेख याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्या म्हणाल्या, जे कुणी अत्याचार करतात त्यांना शासन नक्कीच होईल, कारण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे.
हे वाचलंत का? >>>> संदेशखालीचे सत्य...
या आंदोलनादरम्यान उपस्थित महिलांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या सरकाराविरोधात टीकेची झोड उठविली. ममता बॅनर्जी हाय हाय म्हणत संदेशखाली येथील प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. महिलाओं पर अत्याचार, नही सहेगा हिंदुस्तान, अशा आशयाचे पोस्टर घेत महिला या आंदोलनात सहभागी झाल्या.
संदेशखालीमधील प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारी घटना असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्याचा निषेध करत आहोत. तसेच, संदेशखाली प्रकरणात न्याय मिळलाच पाहिजे, अशी मागणीदेखील या आंदोलनाच्या माध्यमातून महिलांनी केली आहे.
दरम्यान, विक्रोळी येथे स्वयम महिला मंडळ, विबोधी महिला मंडळ सखी महिला मंडळ यांनी एकत्र येत दि. ०९ मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मुमताज या महिलेने उत्स्फूर्त भाषणदेखील केले.
काय आहे संदेशखाली प्रकरण?
संदेशखालीतील महिला अत्याचाराचे अंगावर काटा आणणारे वास्तव यापूर्वीच समोर आले. कशा प्रकारे शेख आणि त्याची टोळी निर्धोकपणे महिलांच्या इज्जतीवर हात घालत होती, तृणमूलचे गुंड या महिलांना जणू त्या आपलीच खासगी मालमत्ता असल्यासारखा कसा उपभोग घेत होते, रात्री-अपरात्री त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन कशा प्रकारे अत्याचारांची मालिकाच सुरू होती, यासंबंधीच्या विकृत घटनांनी देशाला लाज आणली.
प्रत्यक्षदर्शी, शेखच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेण्यासाठी, सहा सदस्यांची ‘सत्यशोधन समिती’ संदेशखालीत दाखल झाली. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती, निवृत्त पोलीस महासंचालक, पत्रकार, महिला आयोगाच्या माजी सदस्य अशा कायद्याचे पुरेपूर ज्ञान असलेल्या संवेदनशील मंडळींचा समावेश. या ‘सत्यशोधन समिती’ने आपल्या दौर्यानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आणि त्यातून समोर आलेले संदेशखालीतील प्रत्यक्षदर्शींनी मांडलेले वास्तव हे त्याहूनही चिंताजनक!