राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर उत्तर प्रदेशातील व्यवसायात तेजी!
तमिळनाडूतून मजूर आपल्या राज्यात परतले
03-Feb-2024
Total Views | 156
लखनौ : तमिळनाडूतील तिरुपूरमध्ये बनवलेले कपडे आजूबाजूच्या जिल्ह्यांनाच नव्हे, तर देशाच्या इतर भागातही पुरवले जातात. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि नेपाळमधून येथे मोठ्या प्रमाणात मजूर येतात. स्थानिक मजुरांची कमतरता असल्याने, काहींनी बिहार आणि ओडिशामधून मजुरांना कामावर ठेवण्यासाठी एजन्सी उघडल्या. पंरतू, आता तिरुपूरचा वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे.
उत्तर प्रदेशातील कामगार मोठ्या संख्येने परतत आहेत. उत्तर प्रदेशातील विकासाच्या वाढत्या गतीमुळे त्यांना आता त्यांच्या मूळ राज्यातच कामाच्या संधी उपलब्ध होत आहेत. विशेषत: राममंदिर प्राणप्रतिष्ठापनेनंतर अनेक मोठ्या खासगी कंपन्या अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसरात गुंतवणूक करत आहेत. तामिळनाडूच्या वस्त्रोद्योगात अंदाजे ६ लाख स्थलांतरित कामगार आहेत, त्यापैकी १०% आता परतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी अनेक कपड्यांचे उत्पादन करणारे युनिट्स आहेत. कामगारांचा तुटवडा निर्माण होत असल्याने आता संघटना कामगारांच्या सुविधा वाढवण्यात गुंतली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमधील राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वेतनवाढ आणि वेळेवर पगार या सगळ्या युक्त्या आजमावल्या जात आहेत.
इतर राज्यांतून कापड उत्पादक उत्तर प्रदेश भागात येत आहेत, त्यामुळे कामगारांना येथे रोजगार मिळणे सोपे होत आहे. याशिवाय बिहार-ओडिशातील मजुरांनाही फायदा होत आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा हे देखील उद्योग भरभराटीचे आणि कामगार परत येण्याचे एक मोठे कारण आहे. तिरुपूरहून परतलेल्या मजुरांना त्यांच्याच राज्यात काम मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे हे मोठे यश मानले जात आहे.