खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी घेतली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट
‘जल जीवन मिशन’ योजनेला पुरेसा निधी मिळण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी
14-Dec-2024
Total Views | 51
1
वाडा : हिवाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची खा. डॉ. हेमंत सवरा यांनी भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ ( Jal Jivan ) योजनेला पुरेसा निधी मिळावा. तसेच जिल्ह्यातील उर्वरित अनेक गावांचा या योजनेत समावेश करण्यात यावा. यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.
“जल जीवन मिशन’ हे ग्रामीण भारतातील सर्व घरांना वैयक्तिक नळाद्वारे स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघातील नागरिक दरवर्षी पाण्याच्या संकटाने त्रस्त आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागात ‘जल जीवन मिशन’चे काम सुरू आहे. परंतु, जिल्ह्यांतील काही भागांचा अद्यापही ‘जल जीवन मिशन’ योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही आणि जनता जलसंकटाने त्रस्त आहे. जिल्ह्यातील उर्वरित भागाचा ‘जल जीवन मिशन’ योजनेत समावेश करण्यात यावा. नद्यांना बंधारे बांधून योजनेसाठी पुरेसे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी,” अशा विविध मागण्या खासदार सवरा यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.
“पालघर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या महत्त्वपूर्ण समस्यांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय जलशक्ती मंत्री यांनी लगेचच योग्य त्या उपाययोजना संबंधित अधिकार्यांना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती खासदार सवरा यांनी दिली. तसेच, केंद्र सरकारच्या ‘जन जीवन मिशन’ योजनेमार्फत घराघरात पाणी पोहचावे, यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे,” असे खासदार सवरा यांनी निवेदनात म्हटले आहे.