नवी दिल्ली : (Colombia Withdraws Statement On Pak Casualties After India's Objections) भारत - पाकिस्तान संघर्ष सुरु असताना 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यातील मृतांविषयी कोलंबियाने संवेदना व्यक्त केल्या होत्या. मात्र कोलंबियाने आता यासंदर्भातील आपले विधान मागे घेतले आहे. शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली असणारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे गेल्यानंतर कोलंबियाला उपरती झाल्याचे समजते आहे.
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा जगासमोर पर्दाफाश करण्यासाठी तसेच दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका मांडण्यासाठी भारत सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांमध्ये पाठवली आहेत. यातील कोलंबिया दौऱ्यावर असलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत कोलंबिया सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केल्याबद्दल भारत कोलंबिया सरकारवर निराश आहे, असे ते म्हणाले.
"एकीकडे दहशतवादी आणि दुसरीकडे निष्पाप नागरिक यांची तुलना शक्य नाही. आपल्या देशावर हल्ला करणारे आणि स्वतःच्या देशाचे रक्षण करणारे यांच्यात कोणतेही साम्य नाही आणि कोलंबियाने आधी केलेल्या विधानात याच फरकाकडे दुर्लक्ष केले आहे," असे थरूर यांनी चेंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या दुसऱ्या आयोगाचे अध्यक्ष खासदार अलेजांद्रो टोरो यांना भेटल्यानंतर सांगितले. बोगोटा येथे कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ म्हणाल्या की, "आज आम्हाला मिळालेल्या स्पष्टीकरणामुळे आणि काश्मीरमधील खरी परिस्थिती, संघर्ष आणि घडलेल्या घटनेबद्दल आमच्याकडे असलेल्या तपशीलवार माहितीमुळे आम्हाला खूप विश्वास आहे, आम्ही संवाद सुरू ठेवू शकतो."
#WATCH | Colombia officially withdraws its earlier statement that it issued expressing condolences on the loss of lives in Pakistan after the Indian strikes; earlier, Shashi Tharoor, who is leading the all-party delegation, raised concern and said - we (India) were a little… pic.twitter.com/iVFmLUl1yP
भारताचा दृष्टिकोन आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर थरूर यांनी या प्रकरणावरील कोलंबियाच्या वक्तव्य मागे घेण्याच्या भूमिकेचे कौतुक केले. "उपमंत्र्यांनी अतिशय विनम्रपणे सांगितले की त्यांनी ज्या विधानाबद्दल आम्ही चिंता व्यक्त केली होती ते विधान मागे घेतले आहे आणि त्यांना या प्रकरणावरील आमची भूमिका पूर्णपणे समजली आहे, जी आम्हाला खरोखरच महत्त्वाची वाटते," असे थरूर यांनी कोलंबियाने त्यांचे पूर्वीचे विधान मागे घेतल्याबद्दल सांगितले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\