Kurla Best Bus Accident : बेस्टच्या भाडे करार प्रणालीचे पाप उद्धव ठाकरेंच्या सेनेचे!
10-Dec-2024
Total Views | 185
मुंबई : (Kurla Best Bus Accident ) बेस्ट मध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष २०१८ ते २०२१ या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपने सदर प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताबाबत तातडीने योग्य निर्णय घेऊन मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना मदत करण्याची तसेच दोषीवर कडक कारवाई करण्याची विनंतीदेखील प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
बेस्ट चालक व कंत्राटदार यांच्या चुकीमुळे नागरिकांचा नाहक बळी
बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर शिंदे यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघाताविषयी लिहिले आहे की, या अपघातात बेस्ट चालक व कंत्राटदार यांच्या चुकीमुळे ज्यांचे नाहक बळी गेलेत अशा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना आपण तातडीने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि जखमी नागरिकांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी व खर्च बेस्ट प्रशासनाने उचलावा; तसेच जखमी नागरिकांना रुपये ५० हजार ते दोन लाख पर्यंत झालेल्या जखमेच्या प्रमाणात तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केलेली आहे.
...भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही
आजमितीस बेस्ट ताफ्यातील ३००० बेस्ट बसेसपैकी २००० बेस्ट बसेस या भाडेकरार तत्त्वावर वेट लिजवर चालविण्यात येतात. या भाडेकरार तत्त्वावर बसेसचा पुरवठा करणारा कंत्राटदारच सदर बससाठी चालक आणि वाहक यांची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की कंत्राटदाराने नेमलेले बस चालक हे नवीन असतात. आणि त्यामुळे त्यांना मुंबईच्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बसेस चालवताना अडचण येते. त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ नागरिकांनी बेस्टच्या अपघातात जीव गमवाला आहे हे बाब अत्यंत गंभीर आहे. याची सखोल चौकशी करून सदर घटनांसंदर्भात जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ एका वाहन चालकावर कारवाई करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही असा थेट इशारा त्यांनी या निवेदनपत्राद्वारे दिला आहे.