सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी
31-Oct-2024
Total Views | 40
डोंबिवली : शहराचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन आगामी काळात १५ डब्यांच्या लोकल डोंबिवलीसह कल्याण मधून सोडण्यासाठी मी आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना माहिती दिली आहे. लवकरच सकारात्मक बदल घडतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
डोंबिवलीच्या प्रवाशांशी नेहमीच रेल्वे प्रवासात चर्चा होत असते. पण, बुधवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रवाशांची खास भेट घेतली. तसेच आपला जाहीरनामा ही प्रवाशांना दिला. यावेळी प्रवाशांनी त्यांची गार्हाणी मंत्री चव्हाण यांच्या समोर मांडली. त्यामुळे प्रवाशांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर मांडणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
“कै. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांचे रेल्वे प्रवाशांशी असलेले अतूट नाते सर्वश्रुत आहे. ते जपण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत असून मला रेल्वे प्रवासातील अडचणी माहीत आहेत,”असे मंत्री चव्हाण म्हणाले. लांबपल्ल्याच्या गाड्या वेळेत येत नाहीत त्यावर चर्चा केली आहे. जास्तीत जास्त समस्या कशा सुटतील, यावर लक्ष देणार आहे. महिला स्पेशल लोकल कल्याण, डोंबिवलीमधून सोडण्यासाठी विशेष लक्ष घातले असल्याचे मंत्री चव्हाण यांनी महिला प्रवाशांना आश्वस्त केले.