गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रमात प्रवेश करीत असताना, सर्वांचा निरोप घेतेवेळी ज्यांच्याशी संबंध आले व ज्यांनी ज्यांनी या मागील आश्रमात सहकार्य केले, त्यांचे धन्यवाद व्यक्त करणे हे वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणार्याचे कर्तव्य ठरते.
अभ्यादधामि समिधमग्ने व्रतपते त्वयि ।
व्रतञ्च श्रद्धां चोपैमीन्धे त्वा दीक्षितोऽहम्॥
(यजुर्वेद -२०/२४)
अन्वयार्थ
हे (व्रतपते अग्ने) नियमांचे पालन करणार्या प्रणेत्या, अग्नी देवा! (दीक्षित: अहम्) वाहनप्रस्थाच्या दीक्षेला प्राप्त होत मी (त्वयि) तुझ्यामध्ये स्थिर होऊन (व्रतम्) ब्रह्मचर्य, तप, स्वाध्याय-प्रवचन इत्यादी व्रतांना, तसेच त्यांचे मूलभूत तत्त्वे असलेल्या (श्रद्धाम्) सत्य धारणेला (च) आणि त्याच्या उपायांना प्राप्त होत आहे. यासाठी यज्ञाच्या अग्नीत जसे (समिधम् अभ्यादधामि) समिधेला अर्पण करतो, तसे विद्या व व्रतांना धारण करून मी आपल्या बुद्धीला ज्ञानाने प्रज्वलित करीत आहे.तसेच (त्वा) तुला आपल्या आत्म्यामध्ये धारण करीत नेहमीच (ईन्धे) स्वतःला प्रकाशित करतो.
विवेचन
व्रत धारण करणे असो की, एखादे धार्मिक कार्य असो, त्यासाठी विशुद्ध मनाने दृढ संकल्प, तीव्र वैराग्य व श्रद्धा या तीन गोष्टी असल्या पाहिजेत. यांच्याशिवाय ते ते कार्य सफल ठरू शकत नाही. क्षणिक वैराग्य किंवा सांसारिक कटकटींना कंटाळून वनात जाऊन बसणे, याला ‘वानप्रस्थ’ म्हणत नाहीत. त्यासाठी आपल्या आत्म्याची इच्छा (स्वेच्छा) व मनाची तयारी हवी. ज्या दिवशी मनात वानप्रस्थ ग्रहण करण्याची उत्कट अभिलाषा जागृत होईल, त्यादिवशी यजमानाने सकाळी लवकर उठून ईश्वराचे चिंतन व ध्यान करावे आणि आपण जी ऐतिहासिक दीक्षा घेणार आहोत, तिच्या दृढतेसाठी परमेश्वराकडे अंतःकरणपूर्वक प्रार्थना करावी. एक आश्रम सोडून दुसर्या आश्रमात जात असताना आत्मिक बळ मिळावे व उत्साह द्विगुणीत व्हावा, याकरिता भगवंताचे कृपासान्निध्य प्राप्त करावे.
वानप्रस्थी होऊ इच्छिणार्यांसाठी वरील मंत्र म्हणजे संकल्पधारणा होय. व्रतपती परमेश्वराकडे वानप्रस्थी म्हणत आहे - “हे परमेश्वरा, तू सर्व व्रतांचा अधिपती आहेस. सृष्टीच्या प्रारंभापासून ते आजपर्यंत सर्व प्रकारच्या नियमांचा पालन करणारा तू सर्वांचा नियामक आहेस. म्हणूनच हे अग्निदेवा! आज मी वानप्रस्थाश्रमाची दीक्षा घेत असताना तुझ्या व्रतांमध्ये स्थिर होत वनामध्ये आचरल्या जाणार्या अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, प्रवचन, ईश्वरप्रणिधान या व्रतांचे धारण श्रद्धेने करीन. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये समिधा समर्पित केल्या जातात, त्याचप्रमाणे विद्या आणि व्रतांना धारण करीत बुद्धीला ज्ञानाने प्रज्वलित करीत राहील. असे व्रताचरणाचे व संकल्पनांचे पाच ते सहा मंत्र आले आहेत. मंत्रातील आशय म्हणजे त्या यजमान वानप्रस्थ्याला बळ प्रदान करण्यासाठीचे ऊर्जावर्धक विचारच आहेत. एकदा केलेला संकल्प तुटू नये, यासाठी वेदमंत्रांत वर्णिलेले प्रेरणाप्रद अमृतवचन होत.
संकल्प धारण केल्यानंतर वानप्रस्थाश्रमाच्या दीक्षेची योग्य व अनुकूल अशी तिथी निश्चित करावी. शक्य झाले, तर या दीक्षा संस्काराचा जाहीर कार्यक्रम निश्चित करण्यात यावा. समारंभपूर्वक दीक्षा कार्यक्रम पार पडला, तर इतरांना पण प्रेरणा मिळते व यजमान व्यक्तीलादेखील आपल्या वानप्रस्थी होण्याचे समाधान लाभते. या कार्यक्रमासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांसोबतच आप्तेष्ट व नातेवाईकांना अथवा मित्रांनादेखील निमंत्रित करावे. सर्वांच्या उपस्थितीत वानप्रस्थ दीक्षा घेणे म्हणजेच आपल्या भावी आश्रमी जीवनासाठी सर्वांची साक्ष घेणे! यामुळे आत्मिक दृढतादेखील वाढीस लागते. यासाठी यज्ञविधी व वानप्रस्थ संस्कार यांचे उत्तम ज्ञान असलेला एखादा विद्वान पुरोहित बोलावणे अगत्याचे ठरते. तसेच, ज्याच्याकडून आपण दीक्षा घेणार आहोत, तो दीक्षाप्रदातादेखील तत्त्वनिष्ठ संन्यासी अथवा ज्येष्ठ मुनी (वानप्रस्थी) असावा. संस्काराचे सर्व साहित्य एकत्र करून त्याची विधिवत मांडणी करावी.अग्निकुंड सजवण्यात यावा. वानप्रस्थाश्रम धारण करू इच्छिणार्या व्यक्तीकरिता करण्याकरिता साधे, स्वदेशी सुती शुभ्र कपड्यांचे धोतर, सदरा व पिवळ्या रंगाचे उपरणे व पादत्राणे हे साहित्य आणून ठेवण्यात यावे.
प्रारंभी संकल्प पाठ करून वेदोक्त स्वस्तिवाचन व शांतीकरण मंत्रांचे सामूहिक पठण करावे. अशा मंत्रोद्घोषामुळे परिसराला धार्मिक व अध्यात्ममय स्वरूप येऊन वातावरण मंगलमय बनण्यास मदत मिळते. त्यानंतर ऋत्विक् वरण, आचमन, अंगस्पर्श, अग्न्यादान, अग्नीप्रदीपन, समिधादान, जलप्रोक्षण, आघारावाज्यभागाहुती वगैरेंच्या माध्यमाने बृहत यज्ञविधी पूर्ण करावा. त्यानंतर स्थाळीपाकाच्या व तुपाच्या आहुत्या प्रदान कराव्यात. स्थाळीपाक म्हणजेच एका थाळीत घेतलेले मिष्ठान्न अथवा गूळ व तूप मिसळून बनविलेला भात (ओदन)! या आहुत्या प्रदान करण्यासाठी यजुर्वेदाच्या २२व्या अध्यायातील अनुक्रमे २०, ३२, ३३ व ३४ या चार मंत्रांचा विनियोग करण्यात यावा. या चार मंत्रात दर्शविलेल्या मंत्रांशासोबत यजमान वानप्रस्थी हा जवळपास ४३ आहुत्या देतो. ते मंत्रांश खालील प्रमाणे आहेत
काय स्वाहा! कस्मै स्वाहा!
कतमस्यै स्वाहा! आधिमाधीताय स्वाहा!
मनः प्रजापतये स्वाहा!
चित्तं विज्ञाताय आदित्यै स्वाहा!
अदित्यै मह्यै स्वाहा!
अदित्यै सुमडीकायै स्वाहा! सरस्वत्यै स्वाहा!
सरस्वत्यै पावकाय स्वाहा!
सरस्वत्यै बृहत्यै स्वाहा!
इत्यादी मंत्रांच्या माध्यमाने यजमान वानप्रस्थी हा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे. आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या समवेत राहिलो व ज्या ज्या वस्तूंचा उपयोग केला, गृहस्थाश्रम सोडून जात असताना या सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करणारे हे मंत्र आहेत. तसे मंत्राच्या शेवटी ‘स्वाहाकार’ उच्चारण करणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण, ‘स्वाहा’ शब्द हा यज्ञाचा अथवा त्या त्या संस्कारांचा आत्मा असतो. ‘स्वाहा’ या शब्दाचे सद्भावना अभिव्यक्ती, त्याग, बलिदान अथवा मधुर वचन असे वेगवेगळे अर्थ होतात. ‘स्व + आ + हा, सु + आह किंवा स्वं प्रति आह! आपल्या स्वतःच्या आत्म्याविषयी चांगले वचन उद्गारणे म्हणजे देखील ‘स्वाहा’ होय. आहोक् त्यागे या धातूपासून बनलेला ‘स्वाहा’ शब्द आपल्या स्वतःच्या स्वार्थभावनेला पूर्णपणे त्यागण्याचाही संकेत करतो.
याप्रसंगी वानप्रस्थी हा कुटुंबातील नातेवाईक आप्तजन व सर्व वस्तू पदार्थांविषयी सद्भावना प्रकट करीत आहे. गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रमात प्रवेश करीत असताना सर्वांचा निरोप घेतेवेळी ज्यांच्याशी संबंध आले व ज्यांनी ज्यांनी या मागील आश्रमात सहकार्य केले, त्यांचे धन्यवाद व्यक्त करणे हे वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणार्याचे कर्तव्य ठरते. क अक्षर म्हणजेच सुखविशेष! काय (चतुर्थी विभक्ती) म्हणजेच आतापर्यंत जे सुख मिळाले आहे, त्यांच्याविषयी... ज्यांच्याकडून सुख प्राप्त झाले, त्यांच्याविषयी... ज्यांनी कोणी सुख प्रदान केले, त्यांच्याविषयी... जे अध्ययन काही झाले त्यांच्याविषयी... मन व चित्त या सर्वांच्या प्रेरणेने जी वाणी आतापर्यंत कामास आली, अशा वाणीच्या विषयी! अशा सर्व विषयी देखील सद्भावना प्रकट करणे कर्तव्य ठरते. बरोबर आजपर्यंत मातेने सुख प्रदान केले, अशी सुख देणारी वंदनीय मातृशक्ती! त्याचबरोबर ज्ञान देणारी विद्यादेवी सरस्वती, पोषण करणारे सर्व लोक, तसेच इतर सर्वांच्या विषयी ‘सु + आह’ म्हणजे ‘स्वाहा.’ म्हणजेच सद्भावना व कृतज्ञता व्यक्त करीत मी सर्वांचा निरोप घेत आहे.
या समर्पणाच्या व सद्भावनेच्या आहुत्या प्रदान केल्यानंतर तेथे आमंत्रित असलेल्या दीक्षादात्या तपस्वी संन्यास्याने अथवा स्थितप्रज्ञ मुनीने नूतन वस्त्रे प्रदान करून वानप्रस्थ आश्रमाची दीक्षा द्यावी. त्यावेळी गृहस्थाश्रमाचे नाव बदलून ‘*** मुनी’ असे एखादे चांगले नामकरण करण्यात यावे. शेवटी उपस्थित ज्येष्ठ मंडळींनी पुष्पवृष्टी करून आशीर्वाद द्यावा व भावी वानप्रस्थ जीवनासाठी शुभेच्छा प्रदान कराव्यात!
प्रा. डॉ, नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८