कहाणी मंगळागौरीची

    06-Aug-2025
Total Views |

श्रावण म्हणजे विविध व्रतवैकल्यांचा महिना. यामध्ये नववधूंसाठीचे व्रत म्हणजे मंगळागौर होय! श्रावण महिन्याच्या मंगळवारी हे व्रत केले जाते. पतीच्या दिर्घायुष्यासाठी नवपरिणीता महिला हे व्रत करतात. दिवसभर उपवास करून, मंगळागौरीचे पूजन केल्यानंतर रात्रभर मंगळागौर जागवली जाते. त्यानिमित्ताने फुगड्यांपासून पारंपारिक नृत्यांचे सादरीकरणही होते. अनेक खेळ खेळले जातात. याच मंगळागौरी व्रताची महती सांगणारे श्रावणगाथेतील हे तिसरे कथापुष्प...

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लक म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही, म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा तिने झोळीत घातली, गोसाव्यांचा नेम मोडला. तो बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा त्याने शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले, गोसाव्यांनी उःशाप दिला. गोसावी म्हणाले, "आपल्या नवर्याला सांग. निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्रं परिधान कर, रानात जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल.” असं बोलून, गोसावी चालता झाला. तिने आपल्या पतीस घडलेले वर्तमान सांगितले. वाणी रानात गेला. घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरेजडिताचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्त आहे. मनोभावे पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली घरदारं आहे, गुरं-ढोरं आहेत, वन द्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, "तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे, तर ते तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे!” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.

देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, भर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपला मोटेत आंबा एकच आहे. असं चारपाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली, मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला, दिवसामासीं वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली, दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीस जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी म्हणू लागली, "काय द्वाड आहे, काय द्वाड आहे!” तेव्हा ती मुलगी म्हणाली, "माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळा-वंशामध्ये कोणी द्वाड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु, हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आई-बापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू, म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा-भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं, गोरज लग्न लावलं. उभयतांना गौरीहरापाशी निजविलं, दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अगं अगं मुली, तुझ्या नवर्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे! तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला, भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिर्हाडी गेला. मामा-भाचे मार्गस्थ झाले.

दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना, आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल, त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक जेवू लागले.

इकडे मामा-भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली, यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली, त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले, गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ, परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा! ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितलं, त्यांनी पालखी पाठविली. आदरातिथ्यानं घरी पाय धुताना मुलीनं नवर्याला ओळखलं, नवर्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवांचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामा-भाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा सासर-माहेरची, घरची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा! ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली, साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.