श्रावण मासातील अनेक व्रतांपैकी एक म्हणजे जीवतीचे व्रत. शुक्रवारी जीवतीची पूजा प्रत्येक घरातील सुवासिनी त्यांच्या लेकरांच्या दीर्घायुष्यासाठी मोठ्या भक्तीने करतात. तसेच श्रावण मासाचा शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या! मुलांच्या उत्तम भविष्यासाठी पिठोरीची पूजा केली जाते. या दोन्ही दिवसांचे महत्त्व्च विशद करणारे श्रावणगाथेतील हे अंतिम कथापुष्प...
ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुइणीला बोलावून आणलं. अगं अगं सुइणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन! सुइणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि सांगू लागली की, ’बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल, तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन!’ तिनं ‘होय’ म्हणून सांगितलं. नंतर ती सुइण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमूक अमूक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून ते तेथपर्यंत कोणाला काही कळणार नाही, असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्यांचं दंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली.
इकडे ब्राह्मणीण बाईचं पोट दुखू लागलं. सुइणीला बोलावणं आलं. त्याबरोबर ‘तुम्ही पुढं व्हा, मी येते,’ म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. ‘बाई बाई, तुझी आहे पहिली खेप, डोळे बांधलेस तर भिणार नाहीस. नाही बांधलेस तर भय वाटेल,’ असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सुइणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. ‘तुला वरवंटा झाला,’ असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोट लावलं, मनामध्ये दुःखी झाली, सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं.
इकडे ब्राह्मण बाईनं नेम धरला, श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, ‘जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो!’ असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागू लागली.
इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यावयाची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय-वासरं बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, ‘कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला!’ तेव्हा ती म्हणाली, ‘जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिईल काय?’ हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला,जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण पांचवी-सहावीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली. ‘कोण गं मेलं वाटेंत पसरलं आहे?’ जिवती उत्तर करिते, ‘अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला वलांडूं देणार नाही!’ मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते; त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसर्या दिवशी राजा चालता झाला. इकडे याचा मुलगा वाढता झाला.
पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, "घरी जा. सार्या गावातल्या बायकापुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपूट लागली. घरी आला, मोठ्या थाटाचं मावंदं केलं. त्या दिवशी शुक्रवार होता, गावात ताकीद दिली की घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, ‘मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल तर जेवायला येईन!’ राजानं कबूल केलं. जिथं तांदुळांचं धुणं होतं, ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली. दर वेळेस ‘जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो,’ असं म्हणे.
पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती, तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या. त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला, काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली, त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, ‘असं होण्याचं कारण काय?’ तिनं सांगितलं, ‘ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई!’ असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन, त्यांच्या सहित आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां-आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.