नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील रेल्वेसेवा अद्ययावत करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून या माध्यमातून आता आणखी ९ वंदे भारत गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२: ३० वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.
दरम्यान, या वंदे भारत गाड्यांमुळे ११ राज्यांतील दळणवळणाला चालना मिळेल. तसेच, पुरी, मदुराई आणि तिरुपती यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना वंदे भारत गाड्यांची सुविधा देण्यात येणार असून या गाड्या त्या त्या मार्गावर धावणाऱ्या सर्वात वेगवान गाड्या असतील आणि त्यांच्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल, असे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
९ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:
१) उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस
२) तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस
३) हैदराबाद-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस
४) विजयवाडा-चेन्नई (रेनीगुंता मार्गे) वंदे भारत एक्स्प्रेस
५) पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस
६) कासारगोड-थिरूवनंतपुरम वंदे भारत एक्स्प्रेस
७) राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस
८) रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस
९) जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस