ठाणे : पुरोगामित्वाचे ढोल बडवित इतरांना तत्वज्ञानाच्या गप्पा मारणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाडांना ठाण्यात विद्यार्थ्यानी चक्क 'जय श्रीराम' च्या घोषणांनी प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.०५ ऑगस्ट) गडकरी रंगायतनमध्ये विद्यार्थी वर्गासाठी एका गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरकार विरोधी टिमकी वाजवणाऱ्या आव्हाडांना विद्यार्थ्यानी जय श्रीराम च्या घोषणा देऊन चपराक लगावली. विद्यार्थ्याचा पवित्रा बघुन आव्हाड व त्यांच्या समर्थक हबकलेले दिसले.दरम्यान, आव्हाडांचा विद्यार्थ्यानी चांगलाच पाणउतारा केल्याबाबत शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी, ही एकप्रकारे आव्हाडांना वाढदिवसाची गिफ्ट असुन अशी बाश्कळ बडबड कराल तर जनतेकडुन असेच प्रत्युत्तर भविष्यात मिळेल. अशी टीका केली.
आ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने गडकरी रंगायतन मध्ये विद्यार्थी गुण गौरव सोहळा आयोजित केला होता. हा कार्यक्रम विद्यार्थी गुण गौरवाचा असतांना त्यात आव्हाडांनी सेक्युलरिजम,भिडे गुरुजी,मणिपूर विषय,व्हेज-नॉनव्हेज वाद असले विषय आपल्या भाषणात काढल्याने विद्यार्थी चांगलेच वैतागले. विद्यार्थ्यानी आव्हाडांना जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यानी एकप्रकारे आपली नाराजीच व्यक्त केल्याची चर्चा कार्यकर्माच्या ठिकाणी रंगली होती.
यावर शिंदे गटाने सुद्धा निशाणा साधला आहे.नरेश म्हस्के यांनी तर ट्वीट करून आव्हाडांचा चांगलाच समाचार घेतला. हे आव्हाडांना ठाण्यातील युवकांनी दिलेलं गिफ्ट आहे.भाषणात त्यांनी मोठमोठ्या गप्पा मारत नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली.मात्र त्यांना तरुण पिढीने दिलेलं हे उत्तर आहे आज तरुणांचा कल कुठे आहे हे दर्शवत असुन फार मोठी चपराक तरुणांनी त्यांना दिली आहे.सर्व तरुण हे नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत, याचीच ही एक झलक आहे. यापुढे आव्हाड जिथे जिथे बाष्कळ बडबड करतील तिथे जनता असेच त्यांना जय श्रीराम ने प्रत्युत्तर देतील. असा टोलाही शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.