पवारांच्या वक्तव्यामुळे इंडिया आघाडीत संभ्रमाची स्थिती; ठाकरे गटाची प्रतिक्रिया!
25-Aug-2023
Total Views | 371
मुंबई : अजितदादा आमचे नेते आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाकडुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचं नेतृत्व टिकवण्यासाठी शरद पवारांनी असं वक्तव्य केलं असावं, असं दानवे म्हणाले.
"निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय. मला जाहीरपणे काही वक्तव्य करता येणार नाही. मात्र आमच्यामध्ये, शिवसेनेत संभ्रम निर्माण होतो. स्पष्ट भूमिका समोर यायला पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटते."
"जे लोक राष्ट्रवादीत गद्दारी करून भाजप सोबत जातात आणि हे त्यांना नेता मानतात. इंडिया आघाडी काही फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनापुरती मर्यादित नसून देशपातळीवर आहे. पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. मात्र संभ्रम निर्माण होऊ शकतो. आम्ही आमची भूमिका अमच्या पक्ष प्रमुखाकडे सातत्याने मांडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या भूमिके बाबत आम्ही पक्षप्रमुखाकडे विचार मांडत असतो." असंही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं."