दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालय मार्गदर्शक तत्त्वे आणणार
स्वयं-नियमन आणि १ लाख रूपयांचा दंड कुचकामी
14-Aug-2023
Total Views | 112
नवी दिल्ली : दूरचित्रवाणी वाहिन्यांचे स्वयं-नियमन कुचकामी ठरले आहे. त्यामुळे आता न्यायालय टीव्ही चॅनेलचे नियमन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या स्वंय-नियमनाविषयी सुनवाणी झाली. यावेळी हे स्वयंनियमन कुचकामी ठरल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.
न्यायालयाने यावेळी म्हटले की, दूरचित्रवाणी वाहिन्यांची रचना मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाने अपलिंकिंग आणि डाउनलिंकिंग मार्गदर्शक तत्त्वे पाहिली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्यात येईल. मात्र, आता स्वयं-नियमन प्रभावी ठरत नसल्याने न्यायालय नवी नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. यावेळी न्यायालयाने एनबीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल वृत्तवाहिन्यांना ठोठावल्या जाणार्या १ लाख रूपयांच्या दंडाविषयीदेखील नाराजी व्यक्त करून त्याविषयी सुचना मागविल्या आहेत.
१ लाख रुपयांचा दंड प्रभावी नाही – सरन्यायाधीश
दूरचित्रवाणी वाहिन्या स्वयं-नियमन करतात, यावर या न्यायालयाकत उपस्थित असलेला एकही व्यक्ती विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी याप्रकरणी तपास होणे गरजेचे आहे. सध्या नियम मोडल्यास १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. मात्र, हा दंड करताना दूरचित्रवाणी वाहिन्या एका दिवसात किती रूपये कमावतात हा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे जोपर्यंत नियम कठोर होत नाहीत, तोपर्यंत दूरचित्रवाणी वाहिन्या त्यांचे पालन करणार नाहीत, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.