मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची अकाली बातमी १५ जुलै रोजी समजली. अत्यंत वाईट अवस्थेत त्यांचा मृतदेह तळेगावमध्ये ते राहात असलेल्या घरामध्ये आढळून आला. महाजनींच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या मुलाला अर्थात गश्मीर महाजनीला लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. इतका मोठा नट असून तो सगळ्यांपासून दुर इतके महिने का राहात होता असा प्रश्न विचारुन गश्मीर आणि त्याच्या घरच्यांवर ताशेरे ओढले जाऊ लागले. आता या सगळ्यावर गश्मीरने मौन सोडले असून इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याने व्यक्त होत ट्रोल करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
काय आहे गश्मीरच्या स्टोरीमध्ये?
गश्मीर महाजनी याने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, एका कलाकाराला कलाप्रमाणे राहू द्या. मी आणि माझे सहकारी शांत राहू. जरी आम्ही शांत राहून मला / आम्हाला द्वेष आणि शिव्या देत असाल तरी आम्ही कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचे स्वागत करतो. देव दिवंगत आत्म्यास शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते आणि आम्ही त्यांना तुमच्यापैकी कोणापेक्षाही चांगले ओळखतो. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी याबद्दल सांगेन.
देखणा नट....
रवींद्र महाजनी यांचा जन्म पुण्यात झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या रवींद्र यांच्यावर वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आली. मधुसूदन कालेलकर यांच्या 'जाणता अजाणता' या नाटकातून महाजनींना अभिनयाची संधी मिळाली. याच नाटकाचा प्रयोग पाहून दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी रवींद्र महाजनींना 'झुंज' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडले आणि तिथून त्यांची अभिनयाची खरी कारकिर्द सुरु झाली. रवींद्र महाजनी यांनी मराठीच नव्हे तर हिंदी आणि गुजराती मनोरंजनसृष्टीतही काम केले होते. त्यांचे ‘झुंज’,’लक्ष्मीची पाऊले’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘कळत-नकळत’, हे चित्रपट विशेष गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले होते. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने महाजनी यांनी १९७५ ते १९९० चा काळ त्यांनी गाजवला. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट प्रेक्षकांना दिले. रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली.