औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली म्हणून होणारी दंगल थांबली!
- प्रकाश आंबेडकरांच खळबळजनक वक्तव्य
26-Jun-2023
Total Views | 414
नवी दिल्ली : औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली म्हणून होणारी दंगल थांबली. असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. नवी दिल्ली येथे प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले की, मी कबरीवर फुल चढवली, माझ्या निर्णयामुळे जी दंगल झाली असती ती थांबली. अनेकजण कबरीवर गेले आहेत. तसेच त्यांची यादीही माझ्याकडे आहे, असं आंबेडकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "औरंगजेबाने त्याच्या भावाचीही हत्या केली, पण त्यात क्रुरता नव्हती. शिवाजी महाराजांच्या बाबतीतही क्रुरता दिसली नाही. पण संभाजी महाराजांसोबत केलेली क्रुरता आपल्या डोळ्यासमोर आहे, इतिहास आपल्यासमोर आहे. औरंगजेबाला ही क्रुरता कोणी करायला लावली, का करायला लावली हा संशोधनाचा विषय आहे. या देशात औरंगजेबाने 54 वर्षे राज्य केलं हा इतिहास तुम्ही नाकारू शकत नाही. तो सुफी म्हणूनच गेला हे देखील नाकारता येत नाही. या सुफीझममुळेच उग्रवादी उठाव भारतात दिसत नाही. त्याने अनेक चांगल्या गोष्टी केल्या हे आपण नाकारू शकत नाही."
"संभाजीराजे संगमेश्वरला का गेले यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबपर्यंत कशी पोचली, जयचंदमुळे असा इतिहास आहे. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोचवली. संभाजीराजेंची हत्या मुस्लिम धर्माशी सहमत नाही, त्यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली. आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका, शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा."
"मी कुठल्याही व्यक्तीच्या जातीचा उल्लेख आजिबात करणार नाही. ती व्यक्ती म्हणून होती, औरंगजेबाकडे काही समाजातील माणसं होती आणि शिवाजी महाराजांकडेही तशी माणसं होती. माणसं ही माणसं म्हणून बघा त्याची जात म्हणून बघू नका. चांगल्या बाजूचं गुणगाण गायलं पाहिजे वाईट बाजू सोडल्या पाहिजेत. मुस्लीमांना कडवटपणा हिंदूचा कडवटपणा उभं करणं चालंलं आहे ते थांबलं पाहिजे.हिंदू मुस्लिम, जैन हिंदू हा वाद जो देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो तो बरोबर नाही. एका समूहाला दुसऱ्या समूहाशी भिडवण्याचा पर्याय थांबला पाहिजे." असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.