भारतीय लोकशाहीवरील कलंक म्हणजे आणीबाणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
25-Jun-2023
Total Views | 93
नवी दिल्ली : भारतीय संविधान आणि मूल्यांच्या विरोधी असलेली आणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीवरील कलंक आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात लादण्यात आलेल्या आणिबाणीस यंदाच्या वर्षी ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी आणिबाणीवरून काँग्रेसवर निशाणा साधला.
इजिप्त दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटद्वारे म्हणाले की, ज्यांनी आणीबाणीचा प्रतिकार केला आणि आपली लोकशाही भावना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व शूर लोकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणिबाणीचा काळा कालखंड हा आपल्या इतिहासातील कधीही न विसरता येणारा काळ आहे. तो आपल्या संविधानाच्या आणि मूल्यांच्या पूर्णपणे विरुद्ध होता, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, १९७५ साली याच दिवशी एका कुटुंबाने सत्ता गमावण्याच्या भीतीने लोकांचे हक्क हिरावून आणि लोकशाहीची हत्या करून देशावर आणीबाणी लादली होती. सत्तेच्या स्वार्थासाठी लादलेली आणीबाणी ही काँग्रेसच्या हुकूमशाही मानसिकतेचे प्रतीक आहे आणि कधीही न संपणारा कलंक आहे. त्या कठीण काळात लाखो लोकांनी अनेक यातना सहन करून लोकशाही पुनरुज्जीवित करण्यासाठी संघर्ष केला, त्या सर्व देशभक्तांना मी मनापासून सलाम करतो; असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.