किनवट : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात एका गोरक्षकाची हत्या झाल्याने सध्या वातावरण तणावाचे आहे. शेखर रामलु रापेल्ली या गोरक्षकाची हत्या झाली असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ते गोहत्या करणाऱ्यांवर पाळत ठेवत असल्याचे सांगितले जात आहे. या हत्येचा निषेध करण्यासाठी किनवट तालुक्यातील इस्लामपूर बाजारपेठ दि. २१ जून रोजी बंद पाळला जात आहे. इस्लापूर शहरात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या हत्येचा निषेध केला आहे.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात गुरांची तस्करी करणाऱ्या संशयित वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न करताना या गोरक्षकांची हत्या करण्यात आली. दि. १९ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास किनवट तालुक्यातील शिवणी गावाजवळ ही घटना घडली.पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, सात जण शेजारच्या तेलंगणा राज्यातून एका कार्यक्रमात सहभागी होऊन कारमधून परतत होते. यादरम्यान अवैधरित्या गुरे वाहून नेणारे वाहन पाहिल्यानंतर त्यांना संशय आला.त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला असता सुमारे १० ते १५ जण वाहनातून खाली उतरले आणि त्यांनी लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यात शेखर रामलु रापेल्ली या गोरक्षकांचा मृत्यू झाला.
दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ दि. २१ जून रोजी नांदेडमधील काही संघटनांनी बंदची हाक दिली आहे.